
Rohit Pawar on Praful Patel And Sunil Tatkare: अजितदादा पवार यांचा बारामती विमानतळावर अपघाती मृत्यू झाला. तेव्हापासून हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप आमदार रोहित पवार हे करत आहेत. तर त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा अडथळा असल्याचा आरोपही करण्यात येत होता. रोहित पवारांचा पटेल-तटकरेंवरील रोष सतत दिसून येत आहे. आता तर त्यांनी त्यांचावर गंभीर आरोप केला आहे. अजितदादांचा मृत्यू झाल्यानंतर पटेल आणि तटकरे यांना राष्ट्रवादी पक्षाचा ताबा घ्यायचा होता. राष्ट्रवादीवर कब्जा करायचा होता असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. थोड्याच वेळात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे या आरोपांना पत्रकार परिषदेतून उत्तर देणार असल्याची माहितीही समोर येत आहे.
रोहित पवारांचा आरोप काय?
काही दिवसांपूर्वी आमच्याकडे अजितदादा पक्षाचे कागद आलेत. त्यानुसार, 10 मार्च 2026 राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी पत्र काढलं. या पत्रात सुनेत्रा काकीनी एक वाक्य म्हटलं आहे अजितदादा अपघात 28 जानेवारी रोजी झाला तेव्हापासून मी राष्ट्रीय अध्यक्ष होईपर्यंत कोणी निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार केला असेल तर तो गृहीत धरू नये असे त्यात म्हटले आहे असे रोहित पवारांनी स्पष्ट केले.
निवडणूक आयोगाच्या पत्रात काय?
तर अजितदादा अपघात झाल्यानंतर 16 फेब्रुवारी 2026 रोजी 18 दिवसांनी अजितदादा पक्षाकडून निवडणूक आयोगाकडे एक पत्र पाठवण्यात आले. यावर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, ब्रिजमोहन श्रीवास्तव यांच्या स्वाक्षर्या आहेत. घटनेत बदल करून कार्याध्यक्ष यांच्याकडे पूर्ण अधिकार असतील असे सांगण्यात आलं. याबाबतची माहिती सुनेत्रा काकींना मिळाली असावी त्यामुळे त्यांनी लगेच पत्रव्यवहार केला असा दावा रोहित पवारांनी केली.
पियुष गोयल यांच्या वक्तव्यावरून निशाणा
यावेळी रोहित पवार यांनी पियुष गोयल यांच्या वक्तव्याचा आधार घेतला. हा घटनाक्रम झाल्यानंतर लागलीच वक्तव्य येतं की प्रफुल्ल पटेल अध्यक्ष झालेत, याकडे पवारांनी लक्ष वेधले. हा प्रकार त्याचाच भाग असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. पियुष गोयल यांनी सारवासारव करत चुकून बोललो असं सांगितलं होतं. त्यावरून हे सिद्ध होतं की प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना पक्ष ताब्यात घ्यायचा होता असा आरोप रोहित पवार यांनी केला. सुनेत्रा काकींना एवढंच सांगायचं आहे की राजकारण वंगाळ झालंय. अवती भोवती असलेल्या लोकांची काळजी घ्यावी, असे पवार म्हणाले.
पक्ष ताब्यात घेण्याची अगोदरच तयारी?
सुनेत्रा पवार काय करतात हे बघावं लागेल. तटकरे, पटेल यांना गोड बोलायची सवय आहे. हे जे पत्र देण्यात आलं आहे. त्यावरून असं दिसतं की अजितदादा अपघात झाल्यानंतर पक्ष ताब्यात घ्यायचा होता की आधीच तयारी केली आहे का? याचा तपास आता व्हायला हवा होता, अशी मागणीही त्यांनी केली. या पत्रव्यवहारानंतर राष्ट्रीय अध्यक्ष/कार्याध्यक्ष याबतचा लिखाणात बदल करण्यात आला का याबाबत माहिती नाही. मूळ पक्ष मिळावा याबाबत आम्ही काहीच करत नाही, कोर्टात गेलेलो नाही. तारीख द्या म्हणून आम्ही मागितलं नाही, यावरून तुम्हीच ठरवा, अशी पुस्ती त्यांनी जोडली.
रोहित पवारांकडून संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न
रोहित पवार यांच्याकडून केवळ संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अजित पवार गटातील मोठ्या नेत्याने दावा केला आहे. प्रफुल पटेल यांच्या अधिकाराबाबत आरोप करणारे जे पत्र आहे ते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडणूक आयोगातील आणि कोर्टातील कायदेशीर काम पाहण्यासाठी देण्यात आले होते. कोर्टातील सुनावणी किंवा निवडणूक आयोगातील तारखांना सतत राष्ट्रीय अध्यक्ष यांना उपस्थित राहता येत नसल्यामुळे तसे अधिकार अजित पवार यांनीच आधीच राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांना दिले असल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली. अजित पवार कोर्टात अथवा निवडणूक आयोगात स्वत: जात नव्हते. त्यावेळी प्रफुल पटेल यांना अधिकार असल्यामुळे त्यांच्यामाध्यमातून कामकाज पाहिलं जात होतं, असा खुलासा बड्या नेत्यानं केला आहे.