भाई जगतापांच्या नेतृत्वात मुंबईत कात टाकतेय काँग्रेस? पाहा आजच्या मोर्चाची गर्दी!

| Updated on: Feb 07, 2021 | 11:01 AM

काँग्रेस नेते भाई जगताप यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर मुंबईत काँग्रेस अधिकच आक्रमक झाली आहे. (thousand of people gather in congress nishedh rally in mumbai)

भाई जगतापांच्या नेतृत्वात मुंबईत कात टाकतेय काँग्रेस? पाहा आजच्या मोर्चाची गर्दी!
काँग्रेसचा निषेध मोर्चा
Follow us on

मुंबई: काँग्रेस नेते भाई जगताप यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर मुंबईत काँग्रेस अधिकच आक्रमक झाली आहे. त्यातच केंद्र सरकारने इंधन दरवाढ आणि गॅस दरवाढ करून काँग्रेसच्या हाती आयतंच कोलीत दिल्याने भाईंनी हा मुद्दा हायजॅक करत आज मुंबईत प्रचंड ‘निषेध मोर्चा’ काढला आहे. संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील राजगृह या निवासस्थानावरून या निषेध मोर्चाला सुरुवात झाली असून सकाळी सकाळीच या मोर्चाला हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांनी हजेरी लावल्याने काँग्रेस मुंबईत कात टाकत असल्याचं दिसत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून हे शक्तीप्रदर्शन सुरू असल्याची चर्चाही सुरू झाली आहे. (thousand of people gather in congress nishedh rally in mumbai)

केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामण या आज मुंबईत येत आहेत. दादरच्या योगी सभागृहात त्यांचं भाषण होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाई जगताप यांनी काँग्रेसच्या नेतृत्वात मुंबईत निषेध रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्याच्या मंत्री वर्षा गायकवाड, चरणजीत सप्रा, नसीम खान आणि सचिन सावंत यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेते या रॅलीला उपस्थित आहे.

दादरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह या निवासस्थानापासून निघालेल्या या रॅलीला हजारो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित आहेत. या रॅलीत महिलांचा सहभाग सर्वाधिक आहे. सर्वांच्या हातात फलक असून त्यावर काँग्रेसच्या कार्यकाळात 2014मधील गॅस सिलिंडरचे भाव आणि आताचे गॅस सिलिंडरचे भाव लिहिण्यात आले आहेत. या फलकावर 2014मध्ये गॅस सिलिंडर 392 रुपयांना मिळत होता, आता त्याची किंमत 721 रुपये झाल्याचं लिहिलं आहे. ‘मोदी सरकार हायहाय’, ‘इंधन दरवाढीचा निषेध असो’, अशा घोषणा देत आंदोलकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला आहे. काँग्रेसच्या या मोर्चामुळे दादरमध्ये वाहतूक समस्या निर्माण झाली आहे. हे मोर्चेकरी सीतारामन यांचा ताफा अडवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गर्दीच गर्दी

काँग्रेसने सकाळी साडे नऊ वाजल्यापासूनच मोर्चाला सुरुवात केली. रविवार असतानाही एवढ्या सकाळी हजारो काँग्रेस कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले. बघावं तिकडे गर्दीच गर्दी दिसत होती. राजगृहापासून ते रुईया कॉलेज ते स्वामीनारायण मंदिरापर्यंत प्रचंड गर्दी होती. हातात फलक, झेंडे घेत मोर्चेकरी घोषणा देत असल्याने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. त्यामुळे काँग्रेसने मुंबईत कात टाकायला सुरुवात केल्याचं स्पष्टपणे दिसून येत होतं.

काँग्रेस कात टाकतेय

भाई जगताप हे कामगार नेते आहेत. लढाऊ आणि आक्रमक नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. काँग्रेसने त्यांची मुंबईच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. तेव्हापासून भाई जगताप हे आक्रमक झाले आहेत. काँग्रेसची भूमिका आक्रमकपणे मांडण्याचा ते सातत्याने प्रयत्न करताना दिसत आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची मरगळ झटकण्याचं काम त्यांच्याकडून सुरू आहे. त्यासाठीच त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच भाईंनी स्वबळाचा नारा देऊन महाविकास आघाडीला पहिला झटका दिला. त्यानंतर आझाद मैदानात डाव्या संघटनांनी पुकारलेल्या शेतकरी मेळाव्यात जाऊन त्यांनी काँग्रेसचा पाठिंबा जाहीर केला होता. तसेच राज्यपालांना भेटायला जाणाऱ्या शिष्टमंडळातही त्यांचं नाव होतं. मात्र, राज्यपाल मुंबईत नसल्याने त्यांनी रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन करत आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे भाई जगताप यांनी मुंबईत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरू केल्याचं सांगितलं जात आहे.

मोदी गरीब विरोधी

उद्योगपतींचा बजेट आहे. त्यामुळेच सीतारामण यांचे भाषण ऐकायला आज सर्व उद्योगपती उपस्थित आहे. अर्थसंकल्पात गरीबांसाठी काहीच नाही, मोदींनी गरीबांना काहीच दिलं नाही. ते गरीब विरोधी आहेत. त्यामुळेच त्यांच्याविरोधात आम्ही मोर्चा काढला आहे, असं काँग्रेसचे मुंबई कार्याध्यक्ष चरणजीतसिंह सप्रा यांनी सांगितलं.

उद्योगपतींना नव्हे आम्हाला बजेट चांगला कसा ते सांगा

निर्मला सीतारामण आज गरीबांना सांगायला आल्यात बजेट चांगला कसा आहे. हा बजेट चांगला कसा आहे हे आम्हाला सांगा. गरीबांना सांगा, असं आवाहन भाई जगताप यांनी केलं. निर्मला सीतारामण यांना भेटण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. पोलिसांना तसं निवेदन देणार आहोत, असं भाई जगताप यांनी सांगितलं. (thousand of people gather in congress nishedh rally in mumbai)

मुंबईत काँग्रेस विरुद्ध भाजप आमनेसामने

एकीकडे काँग्रेसने बजेटच्या निषेधार्थ प्रचंड मोर्चा काढलेला असतानाच दुसरीकडे निर्मला सीतारामण यांच्या स्वागतासाठी भाजपच्या युवा मोर्चाने बाईक रॅलीचं आयोजन केलं आहे. दादरमध्येच ही बाईक रॅली आणि मोर्चा असल्याने या निमित्ताने काँग्रेस आणि भाजप आमनेसामने उभे ठाकले आहेत. त्यामुळे या ठिकाणी पोलीस आणि राज्य राखीव दलाचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आल्याने दादरला पोलीस छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. (thousand of people gather in congress nishedh rally in mumbai)

 

संबंधित बातम्या:

आज अमित शाह कोकणात, आघाडीत ‘ऑपरेशन लोटस’ची भीती? काँग्रेसनं संधी दिली?

LIVE : मुंबईत काँग्रेस विरूद्ध भाजप आमने-सामने, काँग्रेसचं आंदोलन तर भाजपची स्वागतासाठी रॅली

तिनं आधी पोर गमावलं, नंतर नवऱ्याचा दंडुक्याचा मार, नंतर जीव, बीडचा खून आरसा दाखवणारा

(thousand of people gather in congress nishedh rally in mumbai)