किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी… खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी जिद्द नाही सोडली… कुसुमाग्रजांच्या कवितेतून ती प्रतिक्रिया बोलकी
Uddhav Thackeray Social Media Post: कमी शब्दात अधिक आशयघन मांडणी उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियातील पोस्टच्या माध्यमातून केली. लढाई संपलेली नाही आणि संपणार ही नाही हेच विचार त्यांनी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या काव्यपंक्तीतून त्यांनी पक्ष फुटीनंतर हिरारीने मांडले आहेत.

Uddhav Thackeray Social Media Post Viral: शिवसेना काय आहे? हे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडियातील एका पोस्टमधून पुन्हा एकदा अधोरेखित केले. त्यांनी एक आशयघन विचार मांडला. 2022 नंतर पुन्हा एकदा उद्धव सेनेला सुरूंग लागला. पक्षात बंड झाले. 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन्याच्या हालचाली सुरू केल्या. शिवसेनेत सतत फुट पडत आहे. आज शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिन आहे. त्याचवेळी उद्धव ठाकरे हे समाज माध्यमातून व्यक्त झाले. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा एक फोटो पोस्ट केला. त्याखाली त्यांनी कविवर्य कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांची ती मनाला बळ देणारी आणि करारी विचार मांडणाऱ्या कवितेच्या सुरुवातीच्या ओळी शेअर केल्या. या ओळीतून त्यांची जिद्द समोर आली आहे. अजून लढाई संपलेली नाही आणि संपणार ही नाही. आपण पुन्हा नव्याने सर्व काही घडवू असा इशाराच त्यांनी या काव्यपंक्तीतून दिला आहे.
काय आहे उद्धव ठाकरे यांची ती पोस्ट?
उद्धव ठाकरे यांच्यावर पक्षाची जबाबदारी आल्यापासून आघात त्यांच्यासाठी नवीन नाहीत. शिवसेनेवर सतत हल्ले सुरू आहेत. शिवसेना अनेकदा फुटली आहे. इतकच नाही तर उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधत गेल्या काही वर्षात अनेकांनी वेगळा घरोबा केला आहे. तर एकनाथ शिंदे यांनी अशात सर्वात मोठे बंड केले आहे. त्यानंतर आता स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढवल्यानंतर जे खासदार निवडून आलेत. त्यातील 6 खासदारांनी बंडाळी केली. त्यामागील कारणं अद्याप समोर यायची आहेत. पण ऑपरेशन टायगर फत्ते झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सहा जणांनी पक्ष नेतृत्वाविरोधात बंड पुकारले आहे.
‘किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी, काळोखावर खोदित बसला तेजाची लेणी’
ही सर्व वजाबाकी होत असताना उद्धव ठाकरे यांनी मात्र गोळाबेरीज पुन्हा मांडली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यात मराठीतील सुप्रसिद्ध कवी, वि. वा शिरवाडकर यांच्या त्या प्रसिद्ध कवितेच्या सुरुवातीच्या ओळी लिहित त्यांनी मोठा संदेश दिला आहे. कितीही संकटं आली तरी आता थांबायचे नाही. नवीन काही तरी घडवत राहायचं, असा संदेश त्यांनी या ओळीतून दिला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा तो फोटो आणि त्याखाली कविवर्य कुसुमाग्रजांच्या त्या ओजस्वी ओळीतून त्यांनी परिणामकारक संदेश आज वर्धापन दिनाच्या काही तास अगोदर दिला आहे. ही पोस्ट समाज माध्यमात व्हायरल झाली आहे. त्यांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून उंच भरारी घेण्याचाच संदेश जणू या काव्यपंक्तींच्या माध्यमातून दिल्याचे मानले जात आहे.
