मान्सूनचा रस्ता कुणी अडवला? अल निनोचा बागुलबुवा… या कारणांनी पाऊस रेंगाळला
Monsoon Alert: काळे ढग्गांची पांगलेली गर्दी पाहून सर्वांचाच हिरमोड होत आहे. शेतकरी , सामान्य माणसाचा आभाळाकडे डोळे लागले आहेत. पावसाने मोठी हुलकावणी दिल्याने चिंता वाढली आहे. या पावसाचा रस्ता आडवलाय तरी कुणी?

Monsoon Alert El Nion: आकाशात काळ्या ढगांची शाळा भरत असली तर पावसाची घंटा वाजलेली नाही. विजांचा कडकडा नाही की सोसाट्याचा वारा नाही. प्रत्येक जीव पावसाची मनधरणी करत आहे. पावसासाठी नवस बोलले जात आहे. तर कुठे धोंडी धोंडी पाणी दे चे हाकारे पिटले जात आहे. पण पाऊस जणू रुसला आहे. त्याचा रस्ता कुणीतरी आडवला आहे, केवळ अल निनोवर खापर फोडून चालणार नाही. या कारणामुळे पाऊस रेंगाळला आहे.
धावत धावत आला नि मग मंदावला
4 जून 2026 रोजी मान्सूनने केरळकडे आगेकूच केली. केरळमधील त्याची एंट्रीही दमदार होती. राज्यात त्यावेळी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लागली. अंदमानहून प्रवासाला निघालेल्या पावसाने दक्षिणेकडील काही राज्य व्यापली. पण नंतर उत्तरेकडे त्याची प्रगती मंदावली. हवामान तज्ज्ञांनी त्यासाठी अल निनो ला जबाबदार धरले. पण पावसाचा जोर ओसरायला केवळ हेच एक कारण नाही तर इतरही अनेक कारणं असल्याचे समोर आले आहे.
पावसाच्या रोज नवीन तारखा
गेल्या महिनाभरापासून पावसाची रोज नवीन तारीख समोर येत आहे. प्रत्येकवेळी पाऊस हुलकावणी देत आहे. हवामान तज्ज्ञ त्याचा सांगावा घेऊन येतात. पण तो प्रत्येकाला वाकुल्या दाखवत आहे. पावसामुळे यंदा राज्यात पेरण्या खोळंबल्या आहेत. तर काही शेतकऱ्यांनी वाफे काढले आहेत. पावसाची फसवी चाल त्यांच्या लक्षात आलीच नाही. आता पावसाचा 24-25 जूनचा नवीन सांगावा आहे. पण नवीन करारावर तो ठाम राहिल का याचा भरवसा नाही.
अल निनोच नाही ही सुद्धा कारणं
पश्चिम प्रशांत महासागरातील उष्णकटिबंधीय प्रणालीने मान्सूनचे बळ चोरले. मान्सूनला काळेशार ढग पांगले. त्यातच जगामी या उष्णकटिबंधीय चक्रीवादळाने मान्सूनचे अवसान गळाले.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले नाही. त्यामुळे मान्सून अपेक्षित टप्पा गाठू शकला नाही
बंगालच्या उपसागरात थंड वारे वाहून आणणारा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला नाही. ढगांची निर्मिती थंडावली
वेस्टर्न डिस्टर्बन्स मुळे उत्तर-पश्चिम दिशेला सातत्याने कोरडे वारे वाहू लागले. ढगांच्या निर्मितीत मोठा अडथळा आला
केरळमधून मान्सून पुढे जोमात सरकला नाही. त्याची वाटचाल मंदावली. त्यामुळे महाराष्ट्रासह पश्चिम घाटात पाऊस दाखल झाला नाही
दक्षिण राज्यातही पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले नाही. त्याचा फटका बसला
