मुंबईत ठाकरे बंधू का पिछाडीवर? त्यांचा कारभार जवळनं बघणाऱ्या मंत्र्याने सांगितलं खरं कारण
मुंबई महानगरपालिकेत ठाकरे बंधू पिछाडीवर का राहिले, यामागचं कारण एका मोठ्या मंत्र्याने सांगितलं आहे. मुंबई महापालिकेसाठी राज आणि उद्धव ठाकरे यांनी युती केली. मराठी माणूस आणि मुंबई या मुद्द्यांवर दोघं एकत्र आले.

मुंबई महापालिकेतील 227 जागांपैकी 130 जागांवर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती आघाडीवर आहे. तर ठाकरे बंधू 72 जागांवर आघाडीवर आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी तब्बल 20 वर्षांनंतर एकत्र आले. परंतु ठाकरे बंधूंना निकालात मोठा फटका बसल्याचं पहायला मिळतंय. यामागचं कारण एकेकाळी ठाकरे बंधूंचा कारभार जवळून बघणारे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं आहे. मुंबईकरांनी ठाकरे बंधूंना नाकारल्याची बरीच कारणं आहेत, असं ते म्हणाले.
“मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीचा बोलबाला आहे. काम आणि जनतेशी असलेला सक्रियपणा याला लोक स्वीकारतात. त्या पद्धतीचा कौल लोकांनी मुंबईत दिला. मराठी सर्वच आहेत, पण आमच्याकडून निवडून येणारा महापौर मराठी आणि हिंदूच होणार,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ठाकरे बंधूंच्या पराभवाबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले, “मुंबईकरांनी ठाकरे बंधूंना नाकारल्याची बरीच कारणं आहेत. ती एका वाक्यात सांगता येणार नाहीत. विकास आणि सुविधा जे कोणी देत असतील त्याला लोक स्वीकारतात हे मुंबईने सिद्ध केलं. ठाकरे बंधूंच्या पराभवाचं कारण त्यांचा निष्क्रियपणा आहे. मतदान आलं की सक्रिय होऊन चालत नाही. 24 तास लोकांमध्ये राहावं लागतं. राजकारणात निष्क्रियपणा सोडावा लागतो. जो सक्रिय राहील तोच जीवनात चालत राहील.”
मी ठाकरे बंधूंना एवढाच सल्ला देईन की त्यांनी जमिनीवर राहून काम करावं, असं ते पुढे म्हणाले. दरम्यान जळगाव महापालिकेतील 75 पैकी बारा जागा बिनविरोध झाल्यामुळे 63 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. जळगाव मधील महायुतीच्या विजयानंतर मंत्री गुलाबराव पाटलांनी कार्यकर्त्यांसोबत जल्लोष केला. विजयी उमेदवारांसोबत त्यांनी ठेकासुद्धा धरला. जळगाव महापालिकेवर महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे.
मराठी माणूस आणि मुंबई या मुद्द्यांवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत युती केली. ‘फुटाल तर संपाल’ असं भावनिक आवाहन उद्धव ठाकरेंनी या निवडणुकीत केलं होतं. युतीमध्ये मनसेनं केवळ 53 जागा लढवण्याचा निर्णय घेतला होता.
