दर शनिवार-रविवारी भोंदू बाबा अशोक खरात कुठे जायचा? धक्कादायक माहिती समोर
नाशिकच्या मिरगाव परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश झाला आहे. बेकायदा शस्त्र बाळगणे, शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावणे आणि दहशतीच्या जोरावर शोषण करणे अशा गंभीर आरोपांखाली आता पोलीस कसून चौकशी करत आहेत.

नाशिक जिल्ह्यातील मिरगाव परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून स्वतःचे साम्राज्य निर्माण करणाऱ्या स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात याचे काळे कारनामे संपता संपत नसल्याचे पाहायला मिळत आहे. आता त्याचे अनेक कारनामे सध्या बाहेर पडताना दिसत आहेत. आध्यात्मिक गुरुचा बुरखा पांघरून मिरगाव परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या खरातची सध्या पोलीस चौकशी करत आहेत. त्याच्यासोबतच त्याच्या फार्म हाऊसवरील कर्मचाऱ्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
आता स्थानिकांनी दिलेल्या धक्कादायक माहितीनुसार, अशोक खरात हा दर शनिवारी आणि रविवारी न चुकता मिरगाव येथील आपल्या आलिशान फार्म हाऊसवर वास्तव्यास असायचा. त्याची जीवनशैली एखाद्या सराईत गुंडासारखी असल्याचे समोर आले आहे. दररोज सकाळी तो १० ते १२ किलोमीटर सायकलिंग करत असे. मात्र, सायकलिंग करताना तो आपल्या कंबरेला उघडपणे बंदूक लावून फिरत असे. या शस्त्राच्या प्रदर्शनातून त्याने संपूर्ण मिरगाव परिसरात आपली दहशत बसवली होती, ज्यामुळे कोणीही त्याच्याविरुद्ध ब्र काढण्यास धजावत नव्हते.
शेतकऱ्यांचे शोषण आणि खोटे गुन्हे
खरातवर केवळ भोंदूगिरीचेच नव्हे, तर गंभीर स्वरूपाचे आर्थिक आणि फौजदारी गुन्हे करण्याचे आरोप आहेत. आपल्या दहशतीचा वापर करून त्याने परिसरातील अनेक गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्याचे बोलले जात आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देण्यास विरोध केला, त्यांना धमकावणे आणि त्यांच्यावर विविध कारणांनी खोटे गुन्हे दाखल केले. तसेच त्यांना न्यायालयीन कचाट्यात अडकवण्याचे काम खरातने केले असल्याची तक्रार पीडित शेतकऱ्यांनी केली आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आता तपासाचा वेग वाढवला. त्यातच पोलिसांनी कालच खरातच्या फार्म हाऊसवर धाड टाकून तेथील मुख्य वॉचमन, इतर कर्मचारी आणि फार्म हाऊसच्या परिसरात असलेल्या मंदिराच्या पुजाऱ्याची कसून चौकशी करण्यात आली. खरातच्या अनुपस्थितीत तेथे कोण-कोण येत असे आणि तेथे काही अनैतिक प्रकार घडत होते का, याचा शोध पोलिस घेत आहेत. तसेच, त्याच्याकडे असलेल्या शस्त्राचा परवाना आहे की नाही, याचीही पडताळणी केली जात आहे. या कारवाईमुळे लवकरच या प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
