नाशिकमध्ये पावसाचं तांडव! गोदावरी खवळली, रात्रीच्या अंधारात थरार.. इतक्या लोकांना काढले सुरक्षित बाहेर…नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Nashik Heavy Rain: नाशिकमध्ये पावसाचे तांडव सुरू आहे. त्र्यंबकेश्वरसह जिल्ह्यात ढगफुटसदृश्य पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गोदावरीला पुराचा धोका ओळखून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काय आहे मोठी अपडेट?

Nashik Heavy Rain Godavari River : नाशिक जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. तर येते 24 तासात जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा इशारा देण्यात आला आहे. धो धो पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गोदावरी नदी खळखळून वाहत आहे. अनेक छोटी छोटी मंदिरं ही पाण्याखाली गेली आहे. तर गंगापूर आणि इतर धरण क्षेत्रात मुसळधार पावसामुळे पाणी पातळी वाढली आहे. धरणातून विसर्ग होण्याची शक्यता आहे. महापूराचा धोका लक्षात घेता अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर आपत्ती व्यवस्थापन विभाग अलर्ट मोडवर आहे. जिल्ह्यातील काही भागात रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले. नागरिकांनी गरज नसताना बाहेर पडणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.
गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ
गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामामुळे गोदावरी नदीपात्र पूर्णता कोरडे होते. नाशिक सह त्रंबकेश्वर मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रात्रीपासून गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रासह शहर परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. धरणाचे दरवाजे उघडण्यात आले तर पाण्याचा मोठा विसर्ग नदी प्रवाहात येईल. प्रशासनाने नागरिकांना खबरदारीचा इशारा दिला आहे.
नांदूर-मधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग
आज नाशिक जिल्ह्यात पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. रात्रीपासून नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. सलग दुसऱ्या दिवशीही नांदूर मधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. दोन वक्रकार गेटमधून 3 हजार 228 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पावसाच्या पाण्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. पाण्याचा विसर्गात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. निफाडचे प्रांत अधिकारी शशिकांत मंगरूळ यांनी रात्री सायखेडा, चांदोरी, करंजगाव, शिंगवे या गावांना भेट देऊन सतर्क राहण्याचा दिला इशारा दिला आहे.
रात्री रेस्क्यू ऑपरेशनचा थरार
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी आणि इतर तालुक्यांना रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी इगतपुरी मंडळाची पाहाणी केली. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मेटघर गावात रात्री ते 12 वाजता पोहचले. तिथली परिस्थिती पाहता त्यांनी तातडीने 27 कुटुंबातील 100 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. इतर ठिकाणीही आपत्ती व्यवस्थापन पथक लक्ष ठेवून आहे.