हवी तर माझी ब्रेन मॅपिंग करा…मी जबाबदारीपूर्वक सांगतो, साहेबांच्या संमतीनेच पहाटेचा शपथविधी, धनंजय मुंडे यांचा खळबळजनक दावा
dhananjay munde on sharad pawar: आज सुनेला तुम्ही परकी म्हणत आहात. तुम्ही इतके निगरघट्ट कसा झाला की सुनेला परके म्हणू लागले. तुमच्या घरात देखील लेकी आहेत. एक निवडणूक जिंकायची म्हणून तुम्ही जर सुनेला परकी म्हणत असाल तर एवढी वेळ वाईट कोणावर येऊ नये.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी पुन्हा शरद पवार यांना घेरणारे विधान केले आहे. शरद पवार यांच्यावर घणाघाती हल्ला धनंजय मुंडे यांनी केला आहे. 2017 मध्ये दिल्लीत गणेश चतुर्थीच्या दिवशी कुठे? काय घडले होते, ते त्यांनी सांगितले. 2017 ला गणपती बसले त्या दिवशी दिल्लीत सगळे ठरले होते. माझ्यावर विश्वास नसेल, मी जर खोटे बोलत आहे, असे वाटत असेल तर माझी ब्रेन मॅपिंग करा. “दूध का दूध पानी का पानी” स्पष्ट होईल. दिल्लीला कुणाच्या घरी शिवसेनेला बाजूला कसे काढायचे याच्या बैठका झाल्या. साहेबांच्या (शरद पवार) संमतीशिवाय पहाटेचा शपथविधी झाला नव्हता, हे मी जबाबदारी पूर्वक बोलत असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
…तर आज असे घडले नसते
2014 ते 2019 मी विरोधी पक्ष नेता होतो. सगळ्यांच्या विरोधात बोललो. कुणाला घाबरलो नाही. 2019 ला भाजपसोबत दादांना नांदू दिले असते तर आज जे झाले ते झाले नसते? याला कारणीभूत कोण आहे? जो लोकांसाठी कष्ट करतोय त्याला खलनायक केले जात आहे. भाजपपासून शिवसेना तुम्ही बाजूला केली. परंतु शिवसेना शिवसेनापासून बाजू केली तर ही गद्दारी आहे का? 2014 ला तुम्ही भाजपला बिनशर्थ पाठिंबा दिला हे संस्कार? तुम्ही केले तर संस्कार आणि आम्ही केले तर गद्दार? असे प्रश्न धनंजय मुंडे यांनी विचारले आहे.
एवढी वेळ वाईट कोणावर येऊ नये
शरद पवारांचा थुंकी सुद्धा अजित पवार यांनी ओलांडली नाही आणि आज सुनेला तुम्ही परकी म्हणत आहात. तुम्ही इतके निगरघट्ट कसा झाला की सुनेला परके म्हणू लागले. तुमच्या घरात देखील लेकी आहेत. एक निवडणूक जिंकायची म्हणून तुम्ही जर सुनेला परकी म्हणत असाल तर एवढी वेळ वाईट कोणावर येऊ नये, असा हल्ला धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर केला.
इंदापुरातल्या बावीस गावामध्ये शेतीला पाणी नाही म्हणून गंभीर परिस्थिती आहे. आमच्या भागात प्यायला पाणी नाही. परंतु तुमच्या शेतीला पाणी मिळाले तर तुमचे पिढ्यानपिढ्या समृद्ध होतील. पण आम्हाला प्यायला पाणी मिळाले तर आमच्याकडचे लोक ऊस तोडायला येणार नाहीत. महाराष्ट्रात दिलेला शब्द पूर्ण करणारा एकमेव नेता म्हणेज अजित दादा आहेत, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.