‘दिल्लीतून मला बातमी आलीय, RSSला महाराष्ट्रात नेतृत्व बदल हवंय’, सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य

खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. "दिल्लीतून मला बातमी आलीय. RSS ला नेतृत्व बदल हवं आहे", असा मोठा दावा सुप्रिया सुळे यांनी केलाय.

दिल्लीतून मला बातमी आलीय, RSSला महाराष्ट्रात नेतृत्व बदल हवंय, सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
Chetan Patil | Updated on: Jun 07, 2024 | 7:51 PM

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी फडणवीस यांनी आपल्या पक्ष नेतृत्वाकडे उपमुख्यमंत्रीपदापासून आपल्याला मोकळं करण्याची विनंती केली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी मोठा दावा केला आहे. “ऑक्टोबरपासून महाराष्ट्र राज्यात आपलंच राज्य येणार आहे. दिल्लीतून मला बातमी आलीय. RSS ला नेतृत्व बदल हवं आहे. तुम्हाला झेपत नसेल आम्ही तयार आहोत. देशात जे चित्र तयार झालं ते आपल्यासाठी आशादायी आहे, असं मोठं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

“कार्यकर्त्यांना धमकी आली की, मला फोन येत होते. निष्ठेनं तुम्ही लढलात यांचं कौतुक आहे. आपण स्वाभिमानी लोक आहोत. तुतारी वाजवून आपण मोकळं झालो. जिथे जिथे तुतारी तिथे निवडणून आलो. 48 जागांपैकी 30 जागांवर निवडून आलो. साताऱ्याचे उमेदवार शंशिकांत शिंदे यांची जागा 30 ते 35 हजारांनी गेली. ती जागा गोंधळामुळे, चिन्ह्याच्या गडबडीमुळे पडली आहे. निवडणुक आयोगात आपण आक्षेप घेतला होता”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

‘मी पहिल्यापासून सांगत होते की…’

“त्यांचा बारामती, इतर ठिकाणी रडीचा डाव होता. सगळ्या संघर्षाचा काळात आपण काम केलं. आपण सगळ्यांनी विधानसभेसाठी कामाला लागायला हवं. विजय हा सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या कामामुळे शक्य झाला. सर्व तालुक्यात मोठ्या प्रमाणात धमक्या येत होत्या. पण कार्यकर्त्यांनी भीती बाळगली नाही. मी पहिल्यापासून सांगत होते की महाविकास आघाडीच्या 30 जागा येतील आणि तसं झालं”, असंदेखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.

“दुष्काळाची परिस्थिती अतिशय बिकट आहे. दुधाच्या भावाबद्दल मागणी येत आहे. पुढच्या आठ दिवसात सरकारने दुधाला निधी दिला नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी पुरंदर उपसा पाण्याचा विषय मार्गी लावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांच्याकडे त्यांचं भाषण सुरु असताना केलं. “आदर्श आई, शिक्षक सर्व ऐकलं होत. पण आदर्श घोटाळा ऐकला नव्हता. लोकांनी जागा दाखवून दिलीय”, असा देखील टोला सुप्रिया सुळे यांनी यावेळी लगावला.

Follow Us