तर भाजपसोबतही युती करायला तयार आहोत, प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधान; कुणाला इशारा?
भाजपला कमी लेखू नका. भाजप भांडणं लावण्यात आणि भांडणं लावण्यात कोणत्याही थराला जाईल. त्यांचा हा फंडा आहे. आपण सरळसरळ जिंकत नाही हे जेव्हा त्यांच्या लक्षात येतं तेव्हा त्यांची एक पॉलिसी आहे.
![तर भाजपसोबतही युती करायला तयार आहोत, प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधान; कुणाला इशारा? तर भाजपसोबतही युती करायला तयार आहोत, प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधान; कुणाला इशारा?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/01/27183802/prakash-ambedkar-33.jpg?w=1280)
लातूर : प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती केली आहे. मात्र असं असलं तरी त्यांनी आपले राजकीय दरवाजे सर्वांसाठी मोकळे ठेवले आहेत. भाजप जर मनुस्मृतीचा त्याग करत असेल तर आम्ही भाजपशीही युती करायला तयार आहोत. भारतात कोणीही कुणाचा शत्रू नाही. सर्वच भारतीय आहेत. फार फार तर टोकाचे मतभेद असू शकतात. पण भाजपने आमची अट मान्य केली तर त्यांच्याशीही घरोबा होऊ शकतो, असं वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भाजप यावर काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आजही सांगतो. कोणताही राजकीय पक्ष एकमेकांचा दुश्मन नाही. जे जे कार्यकर्ते, नेते, मतदार हे भारतीय आहेत. भारतीयांमध्ये दुश्मनी असू शकत नाही. टोकाचे मतभेद असू शकतात. आरएसएस आणि भाजपाशी आमचे टोकाचे मतभेद आहेत. आम्ही अनेकवेळा ते मांडलेही आहेत. भाजप आजही मनुस्मृती मानते. आमचा लढा मनुस्मृतीच्या विरोधात आहे. ते मनुस्मृती सोडून घटनेच्या चौकटीत काम करायला तयार असतील तर आम्ही त्यांच्या सोबत बसू शकतो, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/01/27132513/ketki-patil.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/01/27123649/uddhav-thackeray-2023-01-27T070635.283.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/01/27115414/WhatsApp-Image-2023-01-14-at-10.44.55-AM-8.jpeg)
प्रकाश आंबेडकर यांनी हे मोठं विधान केल्याने राजकीय वर्तुळातून तर्कवितर्क लढवले जात आहेत. यामागे प्रकाश आंबेडकर यांचा कुणाला इशारा आहे? असा सवाल केला जात आहे.
मनुस्मृती सोडा
मनृस्मृती सोडायची म्हणजे काय करायचं? तर महाडला बाबासाहेबांनी जे केलं होतं, तेच मोहन भागवत यांनी नागपूरला करावं. मनुस्मृती हा धर्मग्रंथ नाही. ती हिंदू धर्मातील सामाजिक, राजकीय व्यवस्था कशी असावी हे सांगणारा ग्रंथ आहे. त्यात भाजप, संघ बदल करणार असेल. तर त्याचं स्वागत करू, असं आंबेडकर म्हणाले.
त्यांनी बदलावं
तो बदल सरदार पटेलांनी जबरदस्तीने करून घेतला होता, तो संघ आणि भाजपने मनाने स्वीकारावा. ते बदलत असतील तर आमचा त्यांच्याशी कधीही राजकीय समझौता होऊ शकतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
इतिहास रिपीट केला
शरद पवार हे भाजपचे आहेत, असं विधान आंबेडकर यांनी केलं होतं. त्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. मी इतिहास रिपीट केला होता. आता बद्दल बोलत नाही. माझं विधान आऊट ऑफ कॉन्टेक्स्ट कोणी घेत असेल तर मी काय करणार?, असा सवाल त्यांनी केला.
भाजपची एकच पॉलिसी भांडणं लावा
भाजपला कमी लेखू नका. भाजप भांडणं लावण्यात आणि भांडणं लावण्यात कोणत्याही थराला जाईल. त्यांचा हा फंडा आहे. आपण सरळसरळ जिंकत नाही हे जेव्हा त्यांच्या लक्षात येतं तेव्हा त्यांची एक पॉलिसी आहे. ती म्हणजे भांडणं लावा, असं सांगतानाच लोकशाही वाचवायची असेल, हुकूमशाही येण्यापासून थांबवायची असेल तर सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं.