“हॉटेल ग्रामपंचायत” मध्ये अघटित..रीलस्टार रोहिणीच्या मृत्यूच्या दिवशी काय घडलं?, घरच्यांनीच सांगितलं सगळं काही..
सोलापूरच्या मंगळवेढा येथील सोशल मीडिया रील स्टार रोहिणी पाराध्ये हिने हॉटेल ग्रामपंचायतच्या स्वयंपाकघरात आत्महत्या केली. पती निलेश पाराध्ये यांच्यासोबत हॉटेल उघडण्यावरून झालेल्या किरकोळ वादामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. तिच्या अकाली निधनाने चाहते आणि कुटुंबीय हादरले असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे सोशल मीडिया रील स्टार रोहिणी पाराध्ये हिने तिचं आयुष्य संपव्यामुळे प्रचंड खळबळ माजली. त्यांच्याच हॉटेलमधील स्वंयपाकाच्या खोलीत तिने ओढणीने गळफास लावून आपलं आयुष्य संपवलं. तिचा पती निलेश पाराध्ये याला ही गोष्ट समजताच त्याने तिला तातडीने रुग्णालयात नेलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं. तिच्या अकस्मात मृत्यूमुळे मोठी खळबळ माजली असून सोशल मीडियावरील लाखो चाहत्यांनीही हळहळ व्यक्त केली.
मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील रोहिणी पाराध्ये आणि तिचे पती निलेश पाराध्ये हे जोडपं सोशल मीडियावर रील स्टार म्हणून प्रसिद्ध होतं. “हॉटेल ग्रामपंचायत” या नावाने त्यांचा व्यवसाय सुरू होता, त्यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स होते. हॉटेलचा त्यांचा व्यवसायही चांगला सुरू होता, नवनव्या डिश ते आणायचे, ग्राहकांचा चांगला रिस्पॉन्स मिळत होता. याच हॉटेलमधून ते अनेक रील्सही तयार करून सोशल मीडिया अकाऊंटवर अपलोड करायचे, ज्याला मोठा रिस्पॉन्स मिळाला.
“हॉटेल ग्रामपंचायत” मध्ये नको ते घडलं
पण मंगळवारी याच हॉटेलमध्ये अघटित घडलं. रोहिणी यांनी याच हॉटेलच्या स्वयंपाकघरात ओढणीने गळफास लावून घेतला आणि आपलं आयुष्य संपवलं. ही बातमी क्षणार्धात वाऱ्याच्या वेगाने गावात पसरली. तिच्या पतीने तिला लगेच रुग्णलायात नेलं, मात्र काही उपयोग झाला नाही. रोहिणीच्या या कृतीने तिचे घरचे, कुटुंबीय, नातेवाईकही हादरले.
त्या दिवशी काय घडलं ?
तिचा मृत्यू झाला, तेव्हा नेमकं काय घडलं हे घरच्यांनीच सांगितलं. तिचे सासरे विलास पाराध्ये यांनी त्या दिवशीचा घटनाक्रम सांगितला. ” ही घटना घडली तेव्हा दुपारी मी ग्रामसभेला गेलो. ती आटोपल्यानंतर हसतखेलत बोलत पुढे चालत आलो. मात्र माझा फोन तिथेच, ग्रामपंचायतीमध्ये विसरल्याचं लक्षात आलं आणि मी मागे फिरलो. तुमचा फोन सतत वाजतोय, असं मला तिथल्या लोकांनी सांगितलं. आतमधला फोन घेतल्या क्षणी मला फोन आलं. समोरचा जे बोलला ते ऐकून मी हादरलो. असं असं ( आत्महत्येची) घटना घडली , अनुने फास घेतला, असं त्याने सांगितलं. तिला महिला हॉस्पिटलमध्ये लगेच ने असं मी सांगितलं. मी कोणालाच काही बोललो नाही आणि गाडला किक मारून हॉस्पिटलमध्ये गेलो” असा घटनाक्रम विलास पाराध्ये यांनी सांगितलं.
” तिथे महिला हॉस्पीटलमध्य तपासल्यानंतर, त्यांनी तिला सिव्हिलमध्ये न्यायला सांगितलं. गाडी खराब असल्याने मला जायला वेळ लागला. सरकारी दवाखान्यात नेल्याचं मला फोनवरून सांगितलं. मग मी तिथे पोहोचलो.तिथे तपासल्यावर डॉक्टरांनी विचारलं, तुम्ही कोण. मी म्हटलं मी तिचा सासरा आहे. मला थांबवलं , तपासून म्हणाले हे (आयुष्य) संपलंय, मला सही करायला सांगितली. पोलिस स्टेशनला कळवतो असंही त्यांनी सांगितलं. असं पाऊल उचलायला अचानक काय झालं हेच कळेना. त्यांचं हॉटेल व्यवसाय होता. चांगलं चालत होतं ना, सुखाने संसार सुरू होता… पण तिने अचानक असं पाऊल का उचललं, असं का सोडून गेली हे माहीतच नाही आम्हाला ” अशा शब्दांत तिच्या सासऱ्यांनी साश्रूनयनांनी भावना व्यक्त केल्या.
काय म्हणाले पोलिस ?
दरम्यान, प्राथमिक तपासात हॉटेल उघडण्याच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. या वादानंतर रागाच्या भरात रोहिणीने टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.या घटनेमुळे ब्रह्मपुरी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, सोशल मीडियावरही शोक व्यक्त केला जात आहे. रोहिणी पाराध्ये यांच्या मृत्यूप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार कौटुंबिक कारणातून घटना घडल्याचे दिसून येत आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डी यांनी दिली.
