भविष्यात अशीच परिस्थिती राहिली तर… प्रताप सरनाईक यांचं सूचक विधान; एसटीबाबत मोठा निर्णय होणार?
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकताच पत्रकार परिषद घेतली. माध्यमांशी बोलताना त्यांनी देशातील इंधन वाढीवर वक्तव्य केले आहे. जर भविष्यात अशीच परिस्थिती राहिली तर काय होईल हे देखील सांगितले आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशातील इंधनाचे दर सतत वाढत असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी इंधनाचा तुटवडा देखील पडत असल्याचे चित्र आहे. काही पेट्रोल पंपावर लांबच्या लांब रांगा लागल्याचे दिसत आहेत. यावर आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेत वक्तव्य केले आहे. तसेच इंधनाची सतत वाढ होत राहिली तर त्याच्या भविष्यावर काय परिणाम होईल हे देखील त्यांनी सांगितले आहे.
किमान पाच लिटर डिझेलची दररोज बचत व्हायला हवी
पत्रकार परिषदेत प्रताप सरनाईक म्हणाले की, एसटी महामंडळाला चार कंपन्यांकडून डिझेल पुरवठा होतो. १० लाख ८७ हजार लीटर डिझेल लागते. हा पुरवठा थांबू नये, काही ठिकाणी पुरवठा कमी आहे. म्हणून या कंपन्यांना सूचना व विनंती केली आहे. एसटी महामंडळ ५५ लाख प्रवाशांना सेवा देते. महामंडळाचे नुकसान कुठेही होणार नाही, त्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली आहे. मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत. परंतु त्याच बरोबर आमच्या लोकांना एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनासुद्धा आम्ही सुचना केलेल्या आहेत की प्रत्येक आगारातून किमान पाच लिटर डिझेल हे दररोज बचत व्हायला हवी आणि त्यापद्धतीने 5 लीटर डिझेल आम्ही प्रत्येक आगारातून आम्ही बचत केली तर जवळजवळ आमचे एक हजार लीटर डिझेल हे दररोज बचत होऊ शकेल. त्यामुळे सध्याच्या डिझेल दरामुळे दररोज सुमारे एक लाख रुपयांची आमची आर्थिक बचत होईल.
पुढे ते म्हणाले, यासाठी आगार डिझेल बचतीची उद्धीष्ठे तातडीने निश्चित करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ज्या चालकांच्या चुकीच्या पद्धतीमुळे एक किलोमीटर प्रति लीटर 10 लिटरचे नुकसान होत असेल तर त्या वाहन चालकाला समुपदेशन करुन योग्य प्रक्षिण देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. बसेसची दैनंदिन तांत्रिक तपासणी व दुरुस्ती योग्य प्रकारे तर डिझेल कमी प्रमाणात जळेल तर तिथे आमची बचत होऊ शकेल. डिझेल बचतीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या चालकांचा सत्कार करण्यात यावा तसेच त्यांना प्रोत्साहन देण्यात येण्याची योजना चालू करण्याच्या सूचना महामंडळाच्या सर्वांना देण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांना विनंती
डिझेल दरवाढ होत आहे. त्याचा परिणाम उत्पन्नावर होत आहे. आजही दर स्थिर नाहीत. सध्या तरी शासनाच्या सूचनेप्रमाणे अंमलबजावणी करत आहोत. भविष्यात अशीच परिस्थिती राहिली तर दरवाढ करावी लागेल. आम्ही डिझेल वरील कर कपातीची मागणी राज्य व केंद्राकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे.
