पुण्यात पावसाचे तांडव, 4 जणांचा मृत्यू, 2 जण बेपत्ता, ऑरेंज अलर्टमुळे चिंता आणखी वाढली!
पुण्याला ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आल्याने वारकरी बांधवांनी देहू आणि आळंदी येथे न जाता पुण्यात यावे. वारकऱ्यांसाठी पुणे महानगरपालिकेने सोय केलेली आहे. महानगर पालिका शाळांना सुट्टी देण्यात आली आहे, अशी माहिती सुनेत्रा पवार यांनी दिली.

Pune Rain Update : जिल्ह्यात अनेक ठिकाणी तुफान पाऊस झाला आहे. या पावसामुळे पुणे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाल्याने प्रशसनाची ओढाताण होत आहे. दरम्यान, सध्याच्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता पुणेकर तसेच जिल्ह्यातील काही भागातील नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील स्थिती सध्या नेमकी कशी आहे, याचा आढावादेखील पुण्याच्या पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला असून त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. सुनेत्रा पवार यांनीदेखील नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
उपाययोजना करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेआधी त्यांनी जिल्ह्यातील पुरस्थितीचा आढवा घेतला. सध्या आम्ही नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत आहोत. सर्व उपाययोजना करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे, अशी माहिती सुनेत्रा पवार यांनी दिली. तसेच नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनाचे पालन करावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
वारकरी बांधवांनी पुण्यात यावे
कमी वेळात ज्यास्तीचा पाऊस झालाय. उद्या पुणे घाटपरिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.सर्व प्रकारच्या प्रशासनाकडून मदतकार्य सुरु आहे. 568 लोकांना बचावकार्य करून बाहेर काढण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. तसेच उद्या देहू आणि परवा आळंदी येथून पालखीचे प्रस्थान होत आहे. वारकरी बांधवांनी पुण्यात यावे असे आवाहनही सुनेत्रा पवार यांनी केले आहे.
खडकवासला धरणात 20.3 टक्के पाणीसाठा
एकूण चार व्यक्ती मयत आणि दोन व्यक्ती बेपत्ता झाल्या आहेत अशी माहिती समोर येत आहे. अडकल्या गेलेल्या नागरिकांना त्यांचे नातेवाईक किंवा घरी नेण्यात मदत करण्यात आली आहे. खडकवासला धरणात 20.3 टक्के पाणीसाठा झाला आहे. पुण्याला ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आल्याने वारकरी बांधवांनी देहू आणि आळंदी येथे न जाता पुण्यात यावे. वारकऱ्यांसाठी पुणे महानगरपालिकेने सोय केलेली आहे. महानगर पालिका शाळांना सुट्टी देण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
