नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक काय? संजय राऊत यांच्या विधानाने खळबळ
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे की, अमित शाह यांना दिल्लीच्या राजकारणात आणणे ही नरेंद्र मोदींची सर्वात मोठी चूक होती. शाह यांच्या आगमनानंतर भाजप आणि देशाचे अधःपतन सुरू झाले. पहिल्या पाच वर्षांत यंत्रणांचा गैरवापर नव्हता, पण शाह यांच्यामुळे पक्ष फोडणे आणि यंत्रणांचा वापर सुरू झाला, असे राऊत यांनी म्हटले.

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. तेव्हा सुरुवातीच्या पाच वर्षात अमित शाह हे दिल्लीच्या राजकारणात नव्हते. त्यामुळे सर्व काही सुरळीत सुरू होतं. यंत्रणांचा गैरवापर होत नव्हता. पक्ष फोडले जात नव्हते. पण अमित शाह दिल्लीच्या राजकारणात आले आणि या सर्व गोष्टी सुरू झाल्या. तिथूनच भाजपचं आणि देशाचं अध:पतन सुरू झालं, असं सांगतानाच अमित शाह यांना दिल्लीच्या राजकारणात आणणं ही नरेंद्र मोदी यांची सर्वात मोठी चूक होती, असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
कोल्हापुरात दिनमान साहित्य उत्सव पर्व 2 मध्ये खासदार संजय राऊत यांची मुलाखत घेण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे आणि अमेय तिरोडकर यांनी राऊत यांची मुलाखत घेतली. यावेळी राऊत यांनी दिलखुलास गप्पा मारताना किस्से सांगत राजकीय भाष्यही केलं. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. तोपर्यंत अमित शाह दिल्लीच्या राजकारणात नव्हते. त्यानंतर पाच वर्षाने शाह दिल्लीत आले. अमित शाह यांना मोदींनी दिल्लीत आणलं ही मोदींच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. त्यानंतर पुढच्या पाच वर्षात त्यांचं आणि देशाचं अध:पतन सुरू झालं. आणि शिवसेना-भाजपचाही प्रवास संपला, असं संजय राऊत म्हणाले.
मोदींसाठी शाह काम का आदमी
तुम्ही अमित शाह यांच्यावर नेहमीच टीका करता. मोदींवर फार करत नाही. म्हणजे शाह वाईट आणि मोदी सज्जन आहेत, असं तुम्हाला सूचवायचं आहे का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर राऊत यांनी थेट उत्तर दिलं. मी नरेंद्र मोदी सज्जन आहे, असं म्हटलं नाही. राजकारणात मोदी सज्जन नाहीत. अमित शाहांशिवाय मोदी जेव्हा दिल्लीचं राजकारण करत होते. तेव्हा सर्व स्थिर स्थावर होतं. पक्ष फोडणं, राजकारण करणं नव्हतं. यंत्रणांचा गैरवापर या पहिल्या पाच वर्षात झाला नाही. आता कोणताही विधीनिषेध न पाळता न्यायालय, निवडणूक आयोगावर नियंत्रण मिळवून गुलाम केलं जात आहे. पक्षांतराला प्रतिष्ठा मिळवून दिली जात आहे. त्यासाठी सर्व यंत्रणांचा वापर केला जात आहे. हे सर्व पहिल्या पाच वर्षात नव्हतं. अमित शाह दिल्लीत आल्यावर हे सर्व सुरू झालं. कारण मोदींच्या दृष्टीने अमित शाह हे काम का आदमी होते. मोदींचं तसं स्टेटमेंट होतं. काम का आदमी म्हणजे अशा कामाचा माणूस, असं राऊत यांनी सांगितलं.
त्यांना आमची परवानगी हवी होती
मोदींना पंतप्रधान करण्यासाठी तेव्हाचे भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी तुम्हाला फोन केला होता. तुम्ही त्यावेळी एवढे महत्त्वाचे होते. मग तुम्हाला थेट तुरुंगात कसं टाकलं? असा सवालही राऊत यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी त्यावेळी घडलेल्या घटना सांगितल्या. राजनाथ सिंह यांच्यासोबत आमचे जिव्हाळ्याचे संबंध होते. दिल्लीत माझे सर्व पक्षीय संबंध होते. राजनाथ सिंह तेव्हा भाजपचे अध्यक्ष होते. आम्ही एनडीएत होतो. आमचे तेव्हा 18 खासदार होते. एनडीएतील आम्ही तेव्हा दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष होतो. 2014च्या निवडणुकी आधी राजनाथ सिंह यांनी नरेंद्र मोदींना पुढे आणले. त्यासाठी त्यांना एनडीएच्या घटक पक्षांची परवानगी हवी होती. इतकं प्रचंड बहुमत मिळेल याची त्यांना खात्री नव्हती. सरकार आलं तर आमच्या सर्वांच्या (घटक पक्षांच्या) पाठिंब्याने येईल, असं त्यांना वाटत होतं. म्हणून ते आम्हा सर्व घटक पक्षांची परवानगी घेत होते, असं राऊत म्हणाले.
मोदी माझी वाट बघत थांबले
मोदींसाठी पाठिंबा हवा होता म्हणून राजनाथ सिंह यांनी उद्धव ठाकरे आणि मला फोन केला. इतर घटक पक्षांनी मोदींचं स्वागत केलं होतं. शिवसेनेनेही मोदींचं स्वागत करावं असं राजनाथ सिंह यांचं म्हणणं होतं. मी दिल्लीत असल्याने उद्धव ठाकरेंनी मला स्वागताला जायला सांगितलं होतं. पीयूष गोयल यांचाही मला फोन आला. संजय भाई निकलो. मै बाहर खडा हूँ. आपका इंतजार कर रहा हूँ. मी गेलो. गर्दी होती. मी गेल्यावर मोदी म्हणाले, आता मला धीर आला. शिवसेना माझ्या पाठिशी आहे. त्यानंतर मी मोदींचं मी स्वागत केलं. खरंतर मोदींना लवकर जायचं होतं. पण ते माझी वाट बघत थांबले होते, असं राऊत म्हणाले.
मी आणि मनमोहन सिंग यांनीच…
नरकातील स्वर्ग हे माझं पुस्तक आहे. पक्षाचं नाही. शिवसेनेचा नेता म्हणून मला अटक केली. कारण मी भाजपच्या भूमिकांना विरोध करत आलो. मोदी पंतप्रधान झाले, त्यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. तेव्हा पहिली मीच स्टेटमेंट दिली. आजपासून देशाच्या अधोगतीला सुरुवात झाली. देशाच्या लोकशाहीचं काय होईल? असं मी म्हटलं. मोदींचा शपथविधी झाल्यावर मी बोललो होतो. त्यावेळी मी आणि मनमोहन सिंग दोघांनीच असं विधान केलं होतं, असंही त्यांनी सांगितलं.