
Sharad Pawar-Ajit Pawar Meeting: राज्यातील महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीची कामगिरी अत्यंत सुमार दिसली. होम पिचवर, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादींचा दारूण पराभव झाला. भाजपच्या झंझावात या ठिकाणचा राष्ट्रवादीचा बुरूज ढासळला. दरम्यान महापालिका निवडणुकीनंतर आज सकाळीच अजितदादांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले. कृषी प्रदर्शनाच्या उद्धघाटनाला आलेल्या अजितदादांनी या प्रश्नाला बगल दिली नाही तर थेट उत्तर दिले.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची बैठक झाली का या प्रश्नाला अजितदादांनी थेट उत्तर दिले. अशी कुठलीही बैठक झाली नाही. असे सांगत दादांनी या विषयावर भाष्य टाळले. तर आज कृषी प्रदर्शन २०२६ चं उद्धघाटन होतं. आपण इथले लोकप्रतिनिधी आहोत. कुलगुरू येणार होते. मला सांगण्यात आले की शरद पवार पण आले आहेत. त्यामुळे आम्ही तिथं त्यांच्या घरी गेलो. मला पण शेतीची आवड आहे. कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोतच. सध्या तरी आम्ही महायुती म्हणून काम करतोय. केंद्रात पण एनडीएचं सरकार आहे आणि इथं महायुतीचं सरकार आहे, असे अजितदादांनी सांगितले.
जिल्हा परिषद निवडणुकीत एकत्र?
गौतम अदानी येऊन गेल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का असे विचारले असता, गौतम अदानी हे उद्योगपती आहेत. ते एआय सेंटरच्या उद्धघाटनाला आले होते. त्यांचा याच्याशी संबंध काय असा सांगत कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत असे अजितदादांनी सांगितले. १२ जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. स्थानिक नेते याविषयीचा निर्णय घेतील.जिल्हा परिषद निवडणुकीबाबत स्थानिक नेत्यांना अधिकार देण्यात आले आहेत. स्थानिक कार्यकर्ते त्याविषयीची निर्णय घेतील असे अजितदादा म्हणाले.
पराभवाचं चिंतन करणार
शेवटी मतदार राजा हा सर्वात महत्त्वाचा असतो. प्रयत्न करणं हे प्रत्येक राजकीय पक्षाचं काम असतं. ज्याने त्याने भरपूर प्रयत्न केले. परंतू भाजपला अतियश चांगलं यश मिळालं. भाजपचं मोठं अभिनंदन, मनापासून कौतुक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपनं या निवडणुका लढवल्या.त्याला खूप चांगला प्रतिसाद झाला. इतरांचा पराभव झाला. माझं स्वतःचं असं गणित आहे की, पराभवानं खचून जाऊ नये.पुन्हा आपलं काम करत राहायचं असते. सगळेच म्हणत होते की राष्ट्रवादीला चांगलं वातावरण आहे. पण पराभव का झालं याचं सर्व मिळून चिंतन करू. आमचे अंदाज चुकले, अशी प्रतिक्रिया अजितदादांनी महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर दिली.
ईव्हीएमवर अनेकांनी आक्षेप घेतल्याबाबत अजितदादांनी महत्त्वाचे वक्तव्य केले. ते म्हणाले की मला यामध्ये पडायचं नाही. काय होतं की पराभव झालं की ईव्हीएमला दोष द्यायचा आणि यश आलं की ईव्हीएमबाबत बोलायचं नाही, असं अजितदादा म्हणाले. तर बोटावरील शाई पुसल्याप्रकरणी अजितदादांनी भाष्य करणे टाळले.