साखरेचे भाव वाढले, चहाचा कपही महागला, जिलेबी, मिठाईसह सर्वांचेच भाव वाढणार
साखरेच्या दरात वाढ झाल्याने चहा, मिठाई आणि जिलेबी महागली आहे. यामुळे सामान्य नागरिकांच्या बजेटवर ताण येत असून, छोट्या चहा विक्रेत्यांसह व्यावसायिकांनाही फटका बसला आहे. सणासुदीत ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. शासनाने यावर लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

सकाळची सुरुवात असो किंवा कामाच्या धावपळीतला छोटासा ब्रेक… चहाचा एक कप हा सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मात्र आता साखरेच्या वाढत्या दरामुळे चहाचा गोडवा कायम ठेवताना चहावाल्यांच्या तोंडाला मात्र घाम फुटू लागलाय. साखरेसोबतच दूध, चहापत्ती आणि गॅसच्या दरातही वाढ झाल्याने चहाचा कप महागलाय. दरवाढी अगोदर 8 रुपयांचा चहाचा कप आता 10 रुपये झालाय. याचा फटका थेट ग्राहक आणि छोट्या चहाच्या व्यवसायिकांना बसत आहे. केवळ चहाच नव्हे तर जिलेबी, मिठाईसह सर्व गोड पदार्थांचे भाव वाढणार असल्याचं व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना ऐन सणासुदीत मोठा फटका बसणार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी चहाच्या टपऱ्या आणि हॉटेल व्यवसाय हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून साखरेच्या भावात वाढ झाल्याने या छोट्या व्यावसायिकांचे गणित बिघडले आहे. एकीकडे दूध महाग… चहापत्ती महाग… व्यावसायिक गॅसचा खर्च वाढलेला आणि आता साखरेचे वाढलेले भाव… यामुळे एका कपामागे मिळणारा नफा दिवसेंदिवस कमी होत चालल्याची व्यथा चहा विक्रेते मांडत आहेत.
यवतमाळमध्ये कटिंग चहा 15 रुपयांना
साखरेचे दर वाढल्याचा फटका यवतमाळकरांनाही बसला आहे. यवतमाळमध्ये एरव्ही 10 रुपयाला मिळणारा कटिंग चहा आता 15 ते 20 रुपयांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सर्वसामान्याच्या खिश्यावर ताण येणार आहे. गॅसचे दर वाढल्याने आधीच चहाटपरी चालकांनी चहाच्या दरात 2 रुपये वाढ केली होती. आता साखर थेट 70 रुपयांवर येऊन पोहचल्याने चहाचा दर 15 ते 20 रुपये झाला आहे.
साखर कडू, व्यापारी चिंतेत
गेल्या दोन दिवसांपासून साखरेच्या दरात अचानक वाढ झाली असून, साखरेचे दर तब्बल 20 ते 22 रुपयांनी वाढून सुमारे 72 रुपये किलोपर्यंत पोचले आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून साखरेच्या बाजारभावात सातत्याने चढ-उतार होत असताना, मागील दोन दिवसांत दरात लक्षणीय वाढ झाली आहे. घाऊक बाजारातील वाढीचा परिणाम आता किरकोळ बाजारावरही जाणवू लागला आहे. त्यामुळे साखर खरेदीसाठी ग्राहकांना पूर्वीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
बाजारातील उपलब्ध साठा, पुरवठ्याबाबतची चिंता आणि आगामी सणासुदीच्या काळातील वाढती मागणी यामुळे साखरेच्या दरात तेजी आल्याचे व्यापारी सांगत आहेत. दरवाढीचा हा कल कायम राहिल्यास आगामी काळात साखरेचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. साखरेच्या वाढत्या दराचा थेट परिणाम गृहिणींच्या घरगुती बजेटवर होत आहे.
चहा, नाश्ता, मिठाई, बेकरी पदार्थ तसेच विविध खाद्यपदार्थांच्या निर्मितीत साखरेचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने त्याचा अप्रत्यक्ष परिणाम इतर वस्तूंच्या किमतीवरही होण्याची शक्यता आहे. आधीच वाढत्या महागाईमुळे त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना साखरेच्या दरवाढीचा आणखी एक आर्थिक फटका बसत आहे. दरम्यान, साखरेच्या वाढत्या दरावर शासनाने लक्ष ठेवून बाजारातील साठा, पुरवठा आणि दर याबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे. साखरेचा गोडवा टिकवून ठेवताना त्याची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गोड पदार्थांचे दर वाढणार
जिलेबीसह गोड पदार्थ महागणार आहे. नागपुरात सध्या चहा 10 रुपये कटिंगवरून 12 रुपये कटिंगवर गेला आहे. तर 240 रुपये किलोची जिलेबी 300 रुपये किलोवर जाण्याची शक्यता आहे. साखरेचा वापर होणाऱ्या सर्वच पदार्थांच्या दरात 10 ते 12 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. साखरेचा जुना स्टॅाक असल्याने सध्या तरी ग्राहकांना फार झळ बसणार नाही. मात्र 1 तारखेपासून नवीन साखर खरेदी केल्यावर सर्वच गोड पदार्थांचे रेट वाढणार आहे, असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.
