
Supriya Sule reaction on Sunil Tatkare And Praful Patel: शरद पवार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी विविध विषयावर मत मांडलं. त्यांनी रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेवर भाष्य करत वक्तव्य केले. त्यांनी अजितदादांच्या विमान अपघाताविषयी चौकशीची मागणी केली. त्याचवेळी राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत मोठे वक्तव्य केले. यावेळी पत्रकारांनी विलिनीकरणात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे आडकाठी आणत आहेत का, असा सवाल केला. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी हात जोडत रामकृष्ण हरी असं म्हटलं. त्यांनी जे अचूक टायमिंग साधलं, त्याची एकच चर्चा सुरू आहे.
जे काही सत्य आहे ते बाहेर येईल
रोहितची अस्वस्थता ही सहाजिक आहे. अशी मोठी घटना घडते तेव्हा अस्वस्थ वाटणे हे सहाजिक आहे. रोहित हे सातत्याने ती उत्तरं शोधत आहे. आमच्या घरात जे झालं, ते कुणाच्याही घरात होऊ नये हाच यामागचा विचार आहे. चौकशी ही पारदर्शक व्हायला पाहिजे ही तमाम महाराष्ट्राची मागणी आहे. अभ्यासपूर्वक फॉलोअप रोहित करत आहेत. जे काही सत्य असेल ते बाहेर येईल असे मला वाटते. ब्लॅक बॉक्सबाबत तांत्रिक माहिती मिळेलच याबाबत मला शंका नाही, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
विलिनीकरणावर आता काय बोलणार?
विलिनीकरणाबाबत बोलताना आज माझा भाऊ नाही. माझा दादा इतक्या मोकळ्या मनाचा होता, ते ऑफ दि रेकॉर्ड पत्रकारांशी सुद्धा बोलले आहेत. त्यामुळे या विषयावर मी काय बोलू? ते दुःख आम्हाला आयुष्यभर राहिलं. आता कुणासोबत काय खोटं करायचं, जे खरं आहे ते सर्वांनाच माहिती आहे. आता कशी कुणाची उणीदुणी काढायची. कामाला लागा हीच दादांना आता सर्वात मोठी श्रद्धांजली असेल. अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली. आम्ही कधी स्वतःसाठी राजकारण केलं नाही. आम्ही या देशाचे, राज्याचे सेवक आहोत. लोकांनी आम्हाला निवडून दिले. आमचं ऑबजेक्टिव्ह काय आहे तर लोकांची काम करावीत. मतदारसंघाचा विकास करावा. लोकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावं.
विमान अपघाताच्या चौकशीची मागणी
तर दादांच्या विमानाचा घातपात झालाय का या प्रश्नावर उत्तर देताना त्याच्यामुळेच आम्ही चौकशी आणि डेटा मागतोय. याप्रकरणी दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. त्यामुळे लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे.याप्रकरणी आम्हाला राजकारण करायचंच नाही. आमच्या घरातील कर्ता पुरुष गेला. हा राजकारणाचा विषयच नाही. दादा गेल्याने आम्ही सर्वच भावनिक आहोत. जगात माणुसकी उरली आहे की नाही. दादा गेल्यावर अजूनही विश्वास बसत नाही. आम्ही आता पुढे पाहतोय. या संपूर्ण अपघाताची चौकशी झाली पाहिजे हा एक भाग आणि दुसऱ्या भागात देशासमोरील आव्हानं, काम पूर्ण करणं अशा दोन्ही ठिकाणी आम्ही कारत असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. तर स्थानिक पातळीवर आम्ही एकमेकांना साथ देणार असे त्यांनी सांगितले.
तर शरद पवार हे राज्य सभेवर जातील का, याविषयावर त्यांनी मत मांडलं. महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही एकत्र असू. लवकरच महाविकास आघाडीची बैठक होईल. त्यात पुढील निर्णय होईल असं त्या म्हणाल्या. तर शरद पवार हे राज्यसभेवर जातील का या प्रश्नावर त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं. तर पत्रकारांनी अखेरीस तटकरे आणि पटेल यांच्या आडकाठीमुळे राष्ट्रवादीचं विलिनीकरण होत नाही का, असा सवाल केला. त्यावेळी हात जोडत सुप्रिया सुळे यांनी रामकृष्ण हरी असं वक्तव्य केलं.