‘…तर मीच विधानसभा निवडणूक लढणार नाही’; अजित पवारांनी बारामतीकरांना टाकलं कोड्यात!

वास्तविक हा निकाल निवडणूक आयोगाने दिला. विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिला. कागदपत्र काय आहेत यावर निकाल लागतो. खऱ्याचा, सत्याचा निकाल लागतो. हा निकाल आम्ही नम्रपणे स्वीकारला आहे. आम्ही ऊतमात केला नाही. ही परिस्थिती यायला नको होती, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. मोदींशिवाय देशाला पर्याय नाही. इंडिया आघाडी काढली, पण राहिली नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

...तर मीच विधानसभा निवडणूक लढणार नाही; अजित पवारांनी बारामतीकरांना टाकलं कोड्यात!
ajit pawar
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Feb 16, 2024 | 11:24 PM

प्रदीप कापसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 16 फेब्रुवारी 2024 : माझी शेवटची निवडणूक आहे, असं म्हणून काही लोक तुम्हाला मतदान मागतील. पण त्यांचं ऐकू नका. त्यांना भुलू नका, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर हल्ला चढवला होता. मात्र, अजित पवार यांनीच खुद्द आज मतदारांना सर्वात मोठं आवाहन केलं आहे. आम्ही जो उमेदवार देऊ त्याला विजयी करा. नाही तर उद्या मी विधानसभेला उभा राहणार नाही. मलाही माझे उद्योग आणि प्रपंच पडले आहेत. तुम्हीच जर मला साथ देणार नसाल तर काय?, असा सवालच अजित पवार यांनी केला. तेव्हा कार्यकर्त्यांमधून एकच वादा, अजितदादा असा नारा देण्यात आला. त्यावर अजितदादांनी हे मतपेटीतही दिसू द्या, असं आवाहन केलं. मात्र, अजितदादा यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांशी संवाद साधताना ही साद घातली आहे. आता मला ही बघायचं आहे. बारामती भावनेच्या पाठीशी उभे राहती की विकासाच्या मागे उभी राहते. बारामतीची आता खरी कसोटी आहे. जोपर्यंत महायुती एकत्र बसून कोण जागा लढणार हे ठरणार नाही तोपर्यंत उमेदवार जाहीर करत येणार नाही. आम्ही लवकरच बसू. तुम्ही एकमेकांशी संपर्क ठेवा. ज्यांना माझ्या बरोबर राहायचं आहे त्यांनी माझ्या बरोबर रहा. दबावात कोणी राहू नका, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

तुम्ही एकट पाडू नका

जेव्हा कोणाला अजित पवारांची गरज पडेल तेव्हा सांगतो अजित पवार काय ते, असा इशाराही अजितदादांनी यावेळी दिला. जर तुम्ही राष्ट्रवादी हे एक घर समजता तर मी अध्यक्ष झालो तर काय झालं? कोणी कोणाच्या पोटी जन्माला यावं हे माझ्या हाती आहे काय? मला माझ्या कुटुंबाने एकटं पाडलंय. तुम्ही पडू देऊ नका, असं आवाहनही त्यांनी केलं.

आम्ही काय चोऱ्यामाऱ्या करतो का?

आता राजकीय परिस्थिती वेगळी आहे. पक्ष आणि चिन्ह मिळालं आहे. लोक जास्त आहेत हे सगळं तपासून काही लाख प्रतिज्ञापत्र दिले. ज्यांना मिळाल नाही त्यांनी पक्ष चोरल्याचा आरोप केला. आम्ही काय चोऱ्यामाऱ्या करतो का? दरोडेखोर आहोत का आम्ही? हा पक्ष सगळ्यांनी मिळून काढला. आम्ही पण खारीचा वाटा उचलला ना? मी खासदार झालो आणि मला राजीनामा द्यायला सांगितलं. नंतर मी राजीनामा दिला आणि इकडे आमदार झालो, असं अजितदादा म्हणाले.

Follow Us