Heavy Rain Alert : राज्यात पावसाने 21 जणांचा मृ्त्यू, नाशकात ढगफूटीचा अंदाज,रेड अलर्टने शाळा-कॉलेज-मंदिर बंद
नागरिकांना हवामानाच्या इशाऱ्यामुळे अत्यंत गरजेच्या कामाशिवाय नागरिकांनी बाहेर पडूच नये. अनावश्यक प्रवास टाळावा असे आवाहन नाशिक जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रात गेले दोन ते तीन दिवस पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD)मंगळवार ७ जुलै रोजी नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यात पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या पाच दिवसात पावसाशी संबंधित वेगवेगळ्या अपघात आणि घटनेत २१ लोकांचा मृत्यू झाला आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर भागात येथे ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज असल्याने राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे.
नाशिकात रेड अलर्ट, शाळा-कॉलेज आणि मंदिरे बंद
हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर नाशिक जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलली आहेत. त्र्यंबकेश्वर सप्तशृंगी, इगतपुरी, पेठ, दिंडोरी आणि नाशिक ग्रामीण क्षेत्रातील सर्व शाळा आणि कॉलेजांना उद्या मंगळवारी ७ जुलै रोजी सुटी जाहीर केली आहे. या भागातील आठवडी बाजारांना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. याशिवाय भाविकांच्या सुरक्षेसाठी त्र्यंबकेश्वर मंदिर आणि सप्तश्रृंती मंदिरांना देखील एक दिवसासाठी बंद ठेवण्यात आली आहे.
300 मिमीपर्यंत पाऊसाची शक्यता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले हवामान विभागाच्या अंदाजानुसार नाशिकच्या काही भागात ३०० मिलीमीटरपर्यंत वेगवान पाऊस होऊ शकतो. तसेच काही भागात क्लाऊड बर्स्ट ( ढगफुटी ) होण्याचा अंदाज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकच्या स्थितीवर नजर ठेवून आहेत. त्यांनी प्रशासनाला संपूर्ण सतर्क राहण्याचे आदेश दिले असून तसेच बचावासाठी आपात्कालिन तयारी ठेवण्याचा आदेश दिले आहेत.
पावसाने झालेल्या मृत्यूंची संख्या 21 वर
मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असून त्या संलग्न अपघाती घटनात आतापर्यंत २१ जणांचे प्राण गेले आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पाणी तुंबणे आणि नद्यांना पूर येणे असा घटनांमुळे नागरिकांना सुरक्षित स्थळांवर हलवण्यात आले आहे.
पनवेल येथे 2 तरुणांचा मृत्यू
रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील गाडेश्वर धरण क्षेत्रात दोन युवक धबधब्यात आंघोळीसाठी गेले असता त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. येथे मिळालेल्या माहितीनुसार माथेरानच्या डोंगरात अतिवृष्टी झाल्याने अचानक नदीच्या पाण्याची पातळी वाढली, त्यामुळे अचानक आलेल्या जोरदार प्रवाहाने हे तरुण बुडाले. त्यांना स्थानिकांनी काठीच्या मदतीने वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतू त्यात यश मिळाले नाही. एका तरुणाचा मृतदेह सापडला आहे तर दुसऱ्या तरुणाचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्रशासन पूर्णपणे सज्ज
संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी सर्व आपात्काळी व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. संवेदनशील भागांमध्ये जेसीबी, पोकलेन आणि इतर अवजड यंत्रसामग्री तैनात करण्यात आली आहे. गरज भासल्यास लष्करी मदत मिळवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्यात आला असल्याचे नाशिकचे जिल्हा दंडाधिकारी आयुष प्रसाद यांनी म्हटले आहे.
नागरिकांना हवामानाच्या इशाऱ्यामुळे अत्यंत गरजेच्या कामाशिवाय नागरिकांनी बाहेर पडूच नये. अनावश्यक प्रवास टाळावा आणि केवळ अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनाही शेतात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
