मराठवाड्यात किती कुणबी प्रमाणपत्र वाटप? शासनाकडून आकेडवारीच समोर, उपोषणापूर्वी मनोज जरांगेंचा तो मोठा आक्षेप
Manoj Jarange Hunger Strike : मनोज जरांगे पाटील यांनी अखेर 29 ऑगस्टपासून उपोषणाची हाक दिली आहे. थोड्याच वेळात अंतरवाली सराटीतून ते मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज जरांगेंची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी शासनाकडून मराठवाड्यात किती जणांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले याची आकडेवारी समोर आणण्यात आली आहे.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी पुन्हा राज्याच्या नकाशावर आले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून उपोषणाची हाक दिली आहे. थोड्याच वेळात ते या ठिकाणाहून मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज जरांगे पाटील यांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. त्यात काही तोडगा निघेल का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मराठा-कुणबी प्रमाणपत्र वाटपात अधिकारी खोडा घालत असल्याचे आणि त्याला बड्या नेत्यांचा पाठिंबा आहे, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला सरकारचे शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीला गेले होते. पण तोडगा निघाला नाही. जरांगेंनी मुंबईकडे कुच करण्याचा निर्धार व्यक्त केल्याने वातावरण तापले आहे.
मराठवाड्यात किती कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप?
दरम्यान सरकारने किती कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आली याची माहिती समोर आणली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणापूर्वी ही आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार, मराठवाड्यात 3 लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आले आहे. मराठवाड्यात 3 लाख 13 हजार 897 कुणबी प्रमाणपत्रे वितरित करण्यात आले आहे. कुणबी प्रमाणपत्रांची आकडेवारी 24 ऑगस्ट 2026 पर्यंतची आहे.
जरांगे यांचा आक्षेप काय?
या आकडेवारी मनोज जरांगे पाटील मात्र नाखूष असल्याचे चित्र आहे. कुणबी प्रमाणपत्रासाठी मराठवाड्यातून 3 लाख 14 हजार 498 अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील 524 अर्ज नाकारण्यात आले. 77 अर्ज अद्याप शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. 1 सप्टेंबर 2025 ते 24 ऑगस्ट 2026 पर्यंत 74 हजार 876 कुणबी प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत. सरकारच्या आकडेवारीवर मनोज जरांगे पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. अनेक पात्र लाभार्थ्यांचे अर्ज प्रलंबित असल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला आहे.
शिंदे सेनेत मोठी नाराजी
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे एकनाथ शिंदे असल्याचा आरोप वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी केल्यानं शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मराठा समाजाच्या नेत्यांना बदनाम करण्याचं काम सुरू आहे. यामागे नेमकं कोण अशी पक्षांतर्गत चर्चा सुरू झाली आहे. पक्षाकडून लवकरच याबाबत अधिकृत भूमिका मंत्री मांडणार असल्याची माहिती समोर येत आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरून सरकारमधील धुसफूस यानिमित्ताने समोर येत आहे. कुरघोडीचे राजकारणही समोर येत आहे. दरम्यान जरांगे पाटील आता कोणती भूमिका जाहीर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.
