ठाकरेंचे खासदार फुटणार का? संजय राऊतांच्या विधानाने मोठी खळबळ; म्हणाले खासदार पत्र घेऊन…
मिळालेल्या माहितीनुसार एकीकडे ठाकरे यांचे खासदार फूटण्याची शक्यता लक्षात येताच ठाकरेंच्या पक्षात मोठ्या हालचाली वाढल्या आहेत. खासदार संजय राऊत थेट दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.

Sanjay Raut On UBT MP : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे यांच्या पक्षात पुन्हा एकदा फूट पडणार आहे, असा दावा केला जातोय. शिंदे यांच्या पक्षाकडून ऑपरेशन टायगर राबवले जात आहे. याच ऑपरेशअंतर्गत ठाकरेंचे काही खासदार फुटणार आहेत, असे म्हटले जात आहे. आता तर ठाकरेंचे काही खासदार थेट वेगळा गट स्थापन करून लोकसभा अध्यक्षांना तसे पत्र देणार आहेत, असा दावा केला जातोय. ही बाब समोर येताच ठाकरे यांच्या पक्षात हालचाली वाढल्या आहेत. ठाकरेंनी 14 जून रोजी नुकतेच सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला पाच खासदार गैहजर होते. त्यानंतर आता काही खासदार नवा गट स्थापन करणार असल्याचे म्हटले जात आहे. असे असतानाच आता ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी समोर येत सगळं काही सांगून टाकलं आहे. त्यांनी खासदारांच्या फुटीबाबत मोठं भाष्य केलं आहे.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
संजय राऊत यांनी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. शिवसेनेचा एकच गट आहे. तो खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्त्वाखाली काम करतो आहे. आता समजतंय, कळतंय, खासदार फुटू शकतात हे गेल्या दोन वर्षांपासून आम्ही ऐकत आहोत. काल सगळेच खासदार हे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात होते. आज सकाळी पुन्हा एकदा आमचं खासदारांसोबत बोलणं झालं आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
अध्यक्षांना पत्र द्यायला गेले असतील तर….
तसेच, आज उद्धव ठाकरे आणि संजय देशमुख यांच्यातही काही कामानिमित्त चर्चा झाली आहे. आणखी दोन खासदारांना ठाकरे बोलले आहेत. तरीदेखील काही खासदार हे लोकसभा अध्यक्षांना पत्र द्यायला गेले असतील असं वाटत असेल तर पत्राचा मसुदा आल्यावरच आपण बोलुयात, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
संजय राऊत थेट दिल्लीला जाण्याची शक्यता
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार एकीकडे ठाकरे यांचे खासदार फूटण्याची शक्यता लक्षात येताच ठाकरेंच्या पक्षात मोठ्या हालचाली वाढल्या आहेत. खासदार संजय राऊत थेट दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ठाकरे यांच्या काही खासदारांनी शिंदे यांच्या पक्षाचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतली आहे, असे सांगितले जातेय. त्यामुळे आता नेमके काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
