2000 पानांचे पुरावे, भाजप नेत्यांची 17 भ्रष्टाचाराची प्रकरणं, संजय राऊतांची नवी मोहीम काय?
Sanjay Raut News | राहुल कुल यांच्या भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याप्रमाणेच भाजप नेत्यांच्या १७ साखर कारखान्यांतील भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्याकडे असल्याचा दावा राऊत यांनी केलाय.
नवी दिल्ली | भाजप आमदार राहुल कुल (Rahul Kul) हे अध्यक्ष असलेल्या भीमा (Bhima) पाटस सहकारी साखर कारखान्यावर संजय राऊत यांनी 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. मी कोणत्याही वैयक्तिक हेतूने हे आरोप केले नाहीत, तर माझ्याकडे या भ्रष्टाचारासंबंधी सर्व पुरावे आहेत. फक्त राहुल कुलच नव्हे तर भाजपच्या 17 ते 18 नेत्यांविरोधात, त्यांच्या साखर कारखान्याविरोधात पुरावे आहेत. यासंदर्भातील तब्बल 2000 पानांचे पुरावे मी गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Fadanvis) यांच्याकडे पाठवले आहेत, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांविरोधातच भाजप कारवाई करते. बाकीचे लोक धुतल्या तांदळाचे आहेत का, असा सवाल राऊत यांनी केलाय. पुढील काही दिवसात अशी अनेक प्रकरणं बाहेर काढणार असल्याचं सूतोवाच राऊत यांनी केलंय. भ्रष्टाचाराची प्रकरण बाहेर काढणाऱ्या किरीट सोमय्या यांच्यावरही राऊत यांनी हल्लाबोल केला. नवी दिल्लीत आज राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
2 हजार पानांचे पुरावे, 17 प्रकरणं…
संजय राऊत म्हणाले, आज 2 हजार पानांचे पुरावे आज फडणवीस यांना पुरावे मिळतील. संजय राऊत म्हणाले, भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यात जनतेची लूट कशी झाली आहे, यासंदर्भातील सगळा अहवाल मी ऑडिट रिपोर्टसह गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. समाज माध्यमांतूनही माहिती दिली आहे. भीमा पाटस कारखान्याचे चेअरमन राहुल कुल आहेत. साधारण 17 कारखान्यांची प्रकरणं माझ्याकडे आहेत. त्यातलं हे पहिलं प्रकरण आहे. भाजपचे जे विशिष्ट विरोधक आहेत. त्यांच्याविरोधात ईडी, सीबीआय, ईओडब्ल्यू च्या कारवाया जोरात आहेत. विशेषतः लहान उद्योजक, साखर उद्योग.. आम्ही सगळे त्यातून पिळून निघालो आहोत. यांच्यामागे चौकशीचे फेरे लावता. मग आपल्या सरकारमध्ये जे आहेत, गटात जे आहेत, त्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज कुणी उठवायचा?, असा सवाल संजय राऊत यांनी केलाय.
सोमय्या सांगतो….
भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचारचं प्रकरण मी किरीट सोमय्या यांच्याकडे चार वेळा पाठवलं. काही प्रमुख शेतकरी, सामाजित कार्यकर्ते किमान चार वेळा सोमय्यांकडे घेऊन गेले. सोमय्या त्यांना सांगतात, शिवसेना, राष्ट्रवादीचं असेल तर घेऊन या. बाकी कोणत्याही भ्रष्टाचाराला हात लावणार नाही. त्या शेतकऱ्यांनी मला सांगितलं, 500 कोटी लुटले आहेत. मी एक टेस्ट केस केली. सोमय्या इतकच सांगतो, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची प्रकरणं आणा.. मी ईडी, सीबीआयकडे नेईन.. असा आरोप राऊत यांनी केलाय.
अडाणी प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी?
गौतम अडाणी प्रकरणावरून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी भाजपच्या या कारवाया सुरु आहेत ,असा आरोप राऊत यांनी केला. ते म्हणाले, भविष्यात अशा १७ ते १८ साखर कारखान्याची प्रकरणं मांडणार आहे. भाजपसोबत नसलेल्यांवर धाडी घालता, याचा अर्थ काय? भ्रष्टाचार फक्त भाजपचे विरोधी लोकच करतात का? गौतम अडानींचं प्रकरण आज पुन्हा संसदेत काढणार आहोत, आम्हाला टार्गेट करायचं अन् गौतम अडाणी प्रकरणाकडे दुर्लक्ष करायचं.. असं धोरण आहे.
फडणवीस म्हणाले होते…
देवेंद्र फडणवीस यांच्या एका वाक्याची राऊत यांनी आठवण करून दिली. देशातील 9 विरोधी पक्षाच्या नेत्यांनी प्रधानमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. तेव्हा तुम्ही भ्रष्टाचार करू नका, मग कारवाई होणार नाही, असं फडणवीस म्हणाले होते. . त्यांच्यासाठी हे एक प्रकरण आहे. देशात, राज्यात भ्रष्टाचार कोण करतंय, यासाठी हे प्रकरण दिलंय. आयएनएस विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली किरीट सोमय्यांनी लाखो-कोटी रुपये गोळा केले. ते पैसे राजभवनात गेलेच नाहीत. त्यासंदर्भात गुन्हा दाखल केला. सेशन कोर्टानं त्याला जामीन नाकारला. तो भूमिगत झाला. नंतर फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर या प्रकरणी त्याला क्लिनचिट द्यायला लावली. तुम्ही कोणत्या घोटाळ्याला पाठिशी घालता? तुम्हाला राज्य करण्याचा अधिकार नाही.