Sanjay Raut : असे काही भुंकणारे कुत्रे पाळून ठेवलेत भाजपने..निशिकांत दुबेंनी आदित्य ठाकरेंचं नाव घेताच संजय राऊतांची जिव्हारी लागणाी टीका
संसदेतील विशेष अधिवेशनादरम्यान महिला आरक्षण विधेयकावर काल चर्चा सुरू होती. मात्र त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत आणि भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्यात शाब्दिक वाद, चकमक झाली. निशिकांत दुबे यांनी आदित्य ठाकरे यांचं नाव घेत गंभीर आरोप केले, ज्यानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला होता.

संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरू असताना शिवसेना (ठाकरे) खासदार अरविंद सावंत आणि भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक उडाली. सावंतांनी ब्रिजभूषण सिंह आणि कुलदीप सेंगर यांचा उल्लेख करताच, दुबे यांनी आदित्य ठाकरेंचे नाव घेत गंभीर आरोप केले, ज्यामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ निर्माण झाला. याच मुद्यावर ठाकरे गटाचे खासदार, नेते संजय राऊत यांनी भाजपवर कडाडून टीका केली. भाजपने काही भुंकणारे कुत्रे पाळून ठेवलेत , मराठी माणसावर भुंकण्यासाठी. या महाराष्ट्रातील भाजपच्या मराठी नेत्यांना लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात राऊतांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला. काल पुन्हा एकदा भाजपच्या खासदाराने भाजपच्या विकृत मानसिकतेचं प्रदर्शन काल संसदेमध्ये केलं, अशी टीकाही राऊतांनी केली.
भारतीय जनता पक्षाचं ढोंग काल दिसलं
एक लक्षात घ्या की भारतीय जनता पक्ष हा महिलांना आरक्षण देण्यासंदर्भात, महिलांना त्यांचे हक्क देण्यासंदर्भात एक बिल सर्वानुमते मंजूर करावं अशी भूमिका काल पंतप्रधानांनी मांडली. महिलांच्या आरक्षणामध्ये आणि सुरक्षेच्या मुद्यामध्ये, महिलांवरील अत्याचाराच्या बाबतीत ज्या भाजपच्या एका नेत्याला न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे आणि तो तुरूंगात आहे. संसदेमध्ये भाजपचा एखादा खासदार जर त्याचं समर्थन करत असेल, तर या आरक्षणाच्या बिलावर चर्चा सुरू होण्याआधी त्यांनी त्या खासदारावर कारवाई केली पाहिजे. जो महिलांवर बलात्कार करून तुरूंगात गेलाय, त्याचं समर्थन पार्लमेंटमध्ये होत असेल तर ती अत्यंत गंभीर गोष्ट आहे. भारतीय जनता पक्षाचं कॅरेक्टर, चरित्र, ढोंग काय आहे हे याप्रकरणात दिसतंय. आम्हाला या विषयावर आता फार चर्चा करायची नाहीये. आम्ही त्यावर योग्यवेळी भूमिका घेऊ, असं राऊत म्हणाले.
नरेंद्र मोदींचा भाजप खालच्या पातळीवर गेला आहे
आदित्या ठाकरे यांचं नाव घेण्याचं भाजपच्या खासदाराला काहीच कारण नव्हतं. मुळात त्याने महाराष्ट्रात येऊन भाजपने या प्रकरणात कसा खोटा माहोल उभा केला होता आणि या सगळ्या प्रकरणातून सत्य काय बाहेर आलं, ते त्याने समजून घेतलं पाहिजे. फक्त ठाकरे कुटुंबाची आणि शिवसेनेची बदनामी करण्यासाठी जे कुंभाड रचण्यात आलं, त्यामध्ये आदित्य ठाकरेंना टार्गेट करण्यात आलं. काल पुन्हा एकदा भाजपच्या खासदाराने भाजपच्या विकृत मानसिकतेचं प्रदर्शन काल संसदेमध्ये केलं. अशा प्रकारे पार्लमेंटचा गैरवापर करणं हे अत्यंत दु:खद आहे. आणि नरेंद्र मोदींचा भाजप किती खालच्या पातळीवर गेला आहे, हे काल पुन्हा एकदा पाहिलं. तुम्ही कुलदीप सेनगरसारख्या बलात्कारी,महिलांवर अत्याचार करणआऱ्या तुमच्या नेत्याची बाजू मांडता. आणि दुसरीकडे तुम्ही लोकांकडे महिला आरक्षणासंबंधी समर्थन मागता, हे ढोंग आहे अशी घणाघाती टीका राऊतांनी केली.
काही भुंकणारे कुत्रे पाळून ठेवलेत भाजपने
महाराष्ट्रातील नेत्यांबदद्ल बाकीच्या राज्यातले जे नेते आहेत, निशिकांत दुबे नेहमी अशा प्रकारे काही ना काही विधानं करतात, केंद्र सरकार, लोकसभा अध्यक्षांकडून त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही, असा सवाल राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर ‘असे काही भुंकणारे कुत्रे पाळून ठेवलेत भाजपने, मराठी माणसावर भुंकण्यासाठी. या महाराष्ट्रातील भाजपच्या मराठी नेत्यांना लाज वाटली पाहिजे’ अशी जहरी टीका राऊत यांनी केली. जर दुसऱ्या एखाद्या भाजपच्या नेत्यावर आक्रमण कोणी केलं असतं तर आम्ही उभे राहिलो असतो असंही राऊत यावेळी म्हणाले. पण ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांवर, ठाकरे कुटुंबावर ज्यांनी या महाराष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण केलं , त्या कुटुंबावर अशा प्रकारे दुबे-फुबे सारखी लोकं बोलत असतील आणि भाजपचे लोक मजा बघ असतील, तर एक दिवस हे तुमच्यावरही उलटणार आहे , हे लक्षात ठेवा असा इशारा राऊतांनी दिला.
