राष्ट्रवादीतील धुसफूस शिगेला, मुंबईत असूनही पटेलांची दांडी, तटकरे आणि भुजबळांमध्ये बैठकीतच जुंपली, तर पार्थ पवार…
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही आलबेल नसल्याचे उघडकीस आले आहे. आज राष्ट्रवादीच्या महत्वाच्या बैठकीला वरिष्ठ नेते प्रफुल पटेल मुंबईत असूनही गैरहजर असल्याचे उघड झाल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.

अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची पक्षातील नाराजी वाढतच चालल्याचे चित्र आहे. पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार या मायलेकांनी घेतलेल्या काही निर्णयांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची फळी नाराज असल्याचे पुढे आले असतानाच आज राष्ट्रवादी पक्षाच्या महत्वाच्या बैठकीला वरिष्ठ नेते प्रफुल पटेल मुंबईत असूनही गैरहजर असल्याने विविध तर्कविर्तकांना उधाण आले आहे. त्यातच या बैठकीत ज्येष्ठे नेते छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांच्यातही भर बैठकी खंडाजंगी झाल्याचे वृत्त आहे.
मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी माजी आमदारांची महत्वाची बैठक पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली देवगिरी बंगल्यावर आयोजित करण्यात आली होती. पक्षाचे विधानसभेचे आणि विधान परिषदेचे आमदार या बैठकीला हजर होते. मात्र, मुंबईत असूनही वरिष्ठ नेते प्रफुल पटेल हे या बैठकीला गैरहजर राहिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या बैठकीला उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला त्यावरुन ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि तटकरे यांच्या खंडाजंगी झाल्याचेही म्हटले जात आहे.
आम्ही दोघेच टीकेचे धनी का?
सुनील तटकरे यांनी आपल्यावर आणि प्रफुल पटेल या ज्येष्ठ नेत्यांवर आणि पक्षावर टीका होत असताना पक्षातील इतर कोणताही नेता किंवा नेतृत्व आमचे समर्थन करत नसल्याची खंत यावेळी व्यक्त केली. दादांच्या निधनानंतर आम्ही पक्ष वाढवत असताना आम्ही दोघेच टिकेचे धनी का? असा सवालही त्यांनी केला. सुनील तटकरे यांच्या या मुद्यावर छगन भुजबळांनी आक्षेप घेतला. जे झाले ते झाले ते सोडून द्या आता पुढे जाऊया असा सल्ला भुजबळ यांनी तटकरे यांना दिला. त्यावरुन दोघात खंडाजंगी झाल्याचे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे तटकरे यांचे भाषण सुरू होण्यापूर्वीच पार्थ पवार यांनी बैठकीतून घेतला काढता पाय घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
आमदारांमध्ये या घडामोडीने चलबिचल
प्रफुल पटेल हे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत. त्याच्या पदावरुनही संभ्रम आहे. ते या देवगिरी बंगल्यावर झालेल्या पक्षाच्या महत्वाच्या बैठकीला गैरहजर राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा कारभार सुरु झाला आहे. मात्र, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना डावलेले जात असल्याचे पक्षातील दुसऱ्या फळीतील नेत्यांची भावना आहे. तसेच राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये या घडामोडीने चलबिचल होत आहे. या सर्व घडामोडीमुळे मध्यंतरी शरद पवार यांना भेटण्यासाठी काही आमदार आणि सुनील तटकरे गेल्याने पक्षामध्ये एकंदर गोंधळाचे वातावरण आहे.
