Maharashtra Flood : सीना नदीचे रौद्ररूप, राष्ट्रीय महामार्गच गिळंकृत केला, सर्व्हिस रोडही वाहून नेला, रस्त्यावरच विहिरीसारखा खड्डा

Sina River Flood : गेल्या आठवड्यापासून राज्यात अतिवृष्टीचा कहर दिसून आला. पावसाच्या मोगलाईने आणि नद्यांच्या महापूराने ग्रामीण भागात मोठे नुकसान झाले आहे. सीना नदीच्या रौद्ररुपाने अनेकांना भयभीत केले आहे. सीना नदीची पूराने मोठे नुकसान झाले आहे.

Maharashtra Flood : सीना नदीचे रौद्ररूप, राष्ट्रीय महामार्गच गिळंकृत केला, सर्व्हिस रोडही वाहून नेला, रस्त्यावरच विहिरीसारखा खड्डा
विहीर नव्हे सर्व्हिस रोड
| Updated on: Sep 28, 2025 | 9:47 AM

Solapur-Ratnagiri National Highway : गेल्या आठवड्यापासून राज्यात अतिवृष्टीचा कहर दिसून आला. पावसाच्या मोगलाईने आणि नद्यांच्या महापूराने ग्रामीण भागात मोठे नुकसान झाले आहे. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पात्र सोडले आहे. या नद्यांनी जवळपासची शेतीच नाही तर गावं, वस्त्या आणि रस्ते गिळंकृत केले आहेत. सर्वात मोठा धोका हा शहरातून वाहणाऱ्या नद्यांचा आहे. या नद्यांना गटारगंगेचे स्वरूप आले होते. या नद्यांनी आता स्वतःच स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. अतिक्रमणं, अनधिकृत इमारती, वस्त्या पाण्याखाली आल्या आहेत. तर विकासाच्या नावाखाली नैसर्गिक प्रवाह वळवण्याचा प्रयत्न उधळलेला आहे.

विहीर नव्हे, सर्व्हिस रोड

सीना नदीला आलेल्या पुरामुळे राष्ट्रीय महामार्गाचा सर्व्हिस रोड अक्षरशः वाहून गेला आहे. सोलापूर कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील सर्विस रोडवर असलेला डांबरी रस्ता वाहून गेल्याने चार ते पाच फुटाचा खड्डा पडला आहे. सीना नदीच्या पुरामुळे नदी पात्र सोडून पाणी हिंगोली गावात घुसले. त्यामुळे सर्विस रोडचा रस्ता पूर्णपणे वाहून गेला आहे. याठिकाणी विहीरसदृश खड्डा पडला आहे. सर्व्हिस रोड आहे की विहीर की मोठं डबक अशी अवस्था झाली आहे.

गावात पूर्वी पाणी येत नव्हते मात्र पूल झाल्यापासून गावात पाणी यायला सुरुवात झाल्याचा आरोप हिंगोलीकरांनी केला आहे. आमचं पूर्ण गाव आता स्थलांतरित करावं अशी मागणीच गावकऱ्यांनी केली आहे. कारण आता दरवर्षी या पुराला आम्हाला समोरे हवे लागणार आहे. डांबरी रस्ता पूर्णपणे उखडून फेकला गेला आहे तर मग शेताची काय अवस्था असेल? शासनाने या गोष्टीचा विचार करुन आम्हाला योग्य तो मोबदला द्यावा अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली.

चाळीसगाव तालुक्याला मोठा फटका

जळगावच्या चाळीसगाव तालुक्या मोठा तडाखा बसला आहे. शहरातील धुळे रोड परिसर जलमय झाला आहे.. धुळे रोड वरील आदर्श कॉलनीतील अनेक नागरिकांच्या घरात व दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. स्थानिक तरुणांकडून वयोवृद्धांचे रेस्क्यू केले जात आहे. नद्यांनी धोक्याची धोक्याची पातळी ओलांडली असून नदी नाल्यांना मोठा पूर आला आहे. धुळे रोड परिसरातील अनेक लोक आपल्या घरांमध्ये अडकून पडले आहेत.

अहिल्यानगरमध्ये पण पावसाचा हाहाकार

अहिल्यानगर दक्षिण जिल्ह्यात ठीक ठिकाणी रात्रभर पाऊस सुरू असल्याने काही ठिकाणची वाहतूक ठप्प झाली. नद्या नाल्या ओसांडून वाहत असून काही ठिकाणी गावात नदीचे पाणी शिरले आहे.नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील आणि जेऊर गावात नदीचे पाणी शिरल्याने जनजीवन ठप्प झाले आहे. कामाशिवाय बाहेर पडू नका असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

बदनापूर तालुक्यात फळबागा पाण्याखाली

जालना जिल्ह्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला असून जिल्ह्याच्या विविध भागात मध्यरात्री कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. बदनापूर तालुक्यातल्या वाकुळणी यासह आसपासच्या परिसरात पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या फळबागेत गुडघाभर पाणी साचलय.जिल्ह्याच्या विविध भागात मागील आठवड्यापासून पाऊस हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांचा देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कपाशी सोयाबीन यासह फळबागांना देखील मोठा तडाखा बसत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.आज जालना जिल्ह्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला असल्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे जिल्हाभरातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.