Sugar Price Hike : बाजारात साखरेचा भाव गगनाला भिडला, आता शेतकऱ्यांचाही फायदा; कृषीमंत्री भरणेंनी सांगितलं कारण
बाजारात साखरेचा भाव गगनाला भिडला आहे. आता शेतकऱ्यांचाच फायदा होईल, असे कृषीमंत्री भरणे यांनी सोलापुरात सांगितले.

साखरेचे भाव गगनाला भिडल्याने सणासुदीच्या काळातच सर्वसामानांना मोठा झटका बसलाय. साखरेच्या दरात अचानक मोठी वाढ झाली आहे. अवघ्या 50 रुपये किलो रुपयांना विकली जाणारी साखर थेट 70 ते 80 रुपयांना विकली जाऊ लागली आहे. इथेनॉल उत्पादनामुळे साखरेच्या दरात वाढ झाल्याचं जाणकार सांगत आहेत. परंतु या साखर दरवाढीचा शेतकऱ्यांनाही फायदा होईल, असा दावा कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केला आहे. ते सोलापुरात बोलत होते.
राज्यातील काही भागात पावसाने फारशी हजेरी लावली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं आहे. धरणात पाणी असूनही कालव्यांची क्षमता असल्याने गरजेनुसार सर्वत्र पाणी देता येता नाही. त्यामुळे पावसासाठी विठ्ठलाला साकडे घालावे लागणार असल्याचे कृषीमंत्री भरणे यांनी सांगितले. पुढील काळात पाऊस पडल्यास साठवण तलाव, पाझर तलाव भरतील. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता कमी होऊ शकते, असा विश्वास भरणे यांनी व्यक्त केला. साखर दरवाढीवर भाष्य करताना भरणे म्हणाले, ‘साखरेचा भाव 75 रुपयांपर्यंत गेला. परंतु बँकांच्या कर्जामुळे साखर कारखान्यांकडे साखरेचा साठा पुरेसा नाही. ज्यामुळे ज्या कारखान्यात जास्तीचा साखर साठा आहे, त्यालाच फायदा होईल. तसेच शेतकऱ्यांनाही फायदा होणार आहे. साखर कारखान्यांकडे साठवणूक क्षमता कमी असल्याने त्याचा थोडा फायदा शेतकऱ्यांना देखील होईल, असे भरणे यांनी सांगितले.
सोलापुरात तरूणांशी संवाद साधताना भरणे काय म्हणाले?
आपल्या कृतीमुळे एखादा कोणी आनंदी होत असल्यास चूक काय? आता म्हणाल मी मंत्री आहे. वरातीत मुलं नाचत असतील, त्यांनी मला बोलावल्याने मुलांबरोबर नाचलो. एखाद्या भागात लहान मुले गोट्या खेळत असतील, त्यांनी मला गोट्या खेळण्यासाठी बोलावले. तरीही मी त्यांच्यासोबत जाऊनही खेळतो. माझ्या नाचण्याने मुलांना आनंद होतोय, तर मी का नाचू नये? लहान मुलांसोबत गोट्या खेळल्याने लहान मुलं आनंदी होताहेत. तर मी का खेळू नये? आयुष्य एकदात मिळत असते, मनमोकळेपणाने स्वत: ही आनंदी राहावे, तसेच दुसऱ्यांनाही आनंद द्यावा, असा कानमंत्र भरणे यांनी दिला. निमगावच्या वावडी महोत्सव आणि हिरकणी मेळाव्यात ते बोलत होते.
