तुम्ही अभिनेत्री व्हा आणि उमेदवारी अर्ज भरा… सुशांत शेलार यांचा सुषमा अंधारे यांना टोला
सुषमा अंधारे यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर देताना सुशांत शेलार यांनी जोरदार टीका केली. त्यांनी सुषमा अंधारे यांना चांगलेच सुनावले आहे.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अभिनेता सुशांत शेलार यांनी माजी संचालक विजय पाटकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. तसेच, अभिनेत्री नीलम सामंत (शिर्के) यांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्या नेत्या सुषमा अंधारे यांचाही शेलार यांनी खरपूस समाचार घेतला.
“तुम्ही अभिनेत्री व्हा”
सुषमा अंधारे यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर देताना सुशांत शेलार यांनी जोरदार टीका केली. नीलम सामंत या पहिल्यापासून अभिनय क्षेत्रात काम करत आहेत, एक अभिनेत्री असल्याने त्यांना ही निवडणूक लढविण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्यांना कोणीही विरोध करू शकत नाही, असे शेलार यांनी स्पष्ट केले. सुषमा अंधारे यांना लक्ष्य करत शेलार म्हणाले, “मग तुम्ही अभिनेत्री व्हा आणि तुम्ही सुद्धा उमेदवारी अर्ज भरा. केवळ मान अशी आणि तशी केल्यामुळे आपण स्वतःला अभिनेत्री समजता का?” असा खोचक सवाल करत त्यांनी अंधारे यांची खिल्ली उडवली.
विजय पाटकर यांच्यावरही निशाणा
यावेळी शेलार यांनी विजय पाटकर यांच्यावरही निशाणा साधला. न्यायालयाने विजय पाटकर यांचे संचालकपद रद्द केले आहे. त्यामुळे त्यांना जाणीवपूर्वक उमेदवारी अर्ज भरू दिला जात नाही, हे पाटकर यांचे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. त्यांनी असे खोटे आरोप करू नयेत, असे शेलार म्हणाले. पाटकर यांच्या काळात झालेल्या ‘मानाचा मुजरा’ या कार्यक्रमात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. १५ ते १६ लाखांचा असलेला हा कार्यक्रम तब्बल ५७ लाखांत दाखवण्यात आला असून, ऑडिटमध्ये १० लाख ७८ हजार रुपयांचा फरक समोर आला आहे. विजय पाटकर हे सध्या नैराश्यातून (फ्रस्टेशन) असे बोलत असल्याचे शेलार म्हणाले. तसेच, पाटकर यांना नक्की कोणत्या मंत्र्याने कॉल केला होता, हे त्यांनी जाहीर करावे, असे खुले आव्हानही शेलार यांनी दिले.
चित्रपट महामंडळाच्या कामकाजाबाबत बोलताना शेलार यांनी सांगितले की, गेल्या १० वर्षांत चित्रपट महामंडळाच्या महानगरातील कार्यालयाच्या निमित्ताने इमारती उभ्या करण्यात आल्या आहेत. गेल्या ८ वर्षांत न्यासाने (ट्रस्टने) खर्चावर नियंत्रण आणले असून प्रत्येक खर्चाची माहिती देण्याच्या कडक सूचना करण्यात आल्या होत्या. यामुळे पारदर्शकतेसाठी सर्व विकासकामे थोड्या वेळासाठी थांबली होती, असे स्पष्टीकरणही सुशांत शेलार यांनी यावेळी दिले.
