Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान दुर्घटनेत डोंबिवलीच्या लेकीचा मृत्यू, फ्लाइट क्रू रोशनीची भेट ठरली अखेरची; गोरेगावच्या एका कुटुंबाचाही मृत्यू
अहमदाबादमधील मेघानी परिसरात झालेल्या एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत अनेक प्रवासी मृत्युमुखी पडले. या दुर्घटनेत डोंबिवली येथील 27 वर्षीय रोशनी सोनघरे या एअर क्रू सदस्याचाही समावेश आहे. रोशनी लहानपणापासूनच एअर क्रू बनण्याचे स्वप्न पाहत होती आणि तिने स्वप्न पूर्ण केले होते. तिचा मृत्यू संपूर्ण कुटुंबासाठी आणि डोंबिवलीकरांसाठी मोठा धक्का आहे. या दुर्घटनेने शोक व्यक्त होत आहे.

गुजरातच्या अहमदाबादमधील मेघानी परिसरात काल दुपारी ( 12 जून) एअर इंडियाचे विमान कोसळून भीषण अपघात झाला. त्यावेळी विमानात 242 प्रवासी होते. अहमदाबाद एअरपोर्टवरून टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या काही क्षणातंच हे विमानत मेघानी परिसरातील नागरी वस्तीतील इमारतीवर कोसळले. त्यामुळे मोठी जीवित हानि झाली असून अक्षरश: हाहा:कार उडाला आहे. विमानामधये भारतीय प्रवाशांसह ब्रिटन, पोर्तुगीज आणि कॅनडाच्या नागरिकांचाही समावेश होता. तसेच ज्या इमारतीला धडकून हे विमान कोळसले त्या बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहाती अनेक विद्यार्थ्यांनीही जीव गमावला. विमानातील प्रवासी आणि वसतीगृहातील काही विद्यार्थी अशा एकूण 265 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे देशभरातूनच नव्हे तर जगभरातून शोक व्यक्त होत आहे.
दरम्यान याच दुर्घटनेमध्ये महाराष्ट्रातील डोंबिवली येथील एका तरूणीचाही मृत्यू झाल्याचे समोर आला आहे. अहमदाबाद विमान दुर्घटनेत डोंबिवलीकर असलेल्या 27 वर्षीय रोशनी सोनघरेने जीव गमावला. ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानात फ्लाइट क्रू म्हणून कार्यरत होती. मात्र कालच्या भीषण अपघातामध्ये तिने अखेरचा श्वास घेतला.
लहानपणापासूनच होते एअर क्रू बनण्याचं स्वप्न
मिळालेल्या माहितीनुसार, रोशनी सोनघरे ही डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ परिसरातील नव उमीया कृपा सोसायटी मध्ये आपल्या आई-वडिल आणि भावासोबत सोबत राहत होती. तिचे वडील राजेंद्र, आई राजश्री आणि भाऊ विघ्नेश हे एकत्रच राहत होते . मुंबई ग्रँड रोड परिसरात राहणारे हे कुटुंब दोन वर्षांपूर्वी डोंबिवलीत स्थायिक झालं होतं . रोशनी हिचा भाऊ विघ्नेश हा एका खाजगी शिपिंग कंपनीमध्ये काम करतो तर आई-वडील हे घरीच असतात. रोशनीचे शिक्षण मुंबईत झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजेंद्र सोनघरे व त्यांचे पत्नी राजश्री हिने आपल्या दोन्ही मुलांना शिकवले.

रोशनीला लहानपणा पासूनच एअर कृ बनायचं होतं. जिद्द आणि मेहनत करत तिने तिचं हे स्वप्न पूर्ण केलं. काल आई-वडिलांचा निरोप घेऊन ती अहमदाबादला गेली व अहमदाबादच्या फ्लाईटने ते लंडनच्या दिशेने निघाली होती .मात्र याच विमानाचा अपघात झाला व रोषणाईचा दुर्दैवी मृत्यू झालाय. त्यामुळे कालची रोशनीची भेट अखेरची ठरली. डोंबिवलीकर लेकीचा विमान अपघातात जीव गेल्याने हळहळ व्यक्त होत असून तिच्या कुटुंबियांच्या शोकाला तर पारावर उरलेला नाही. सध्या तिच्या घराजवळ तिच्या नातेवाईक आणि डोंबिवलीकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. दरम्यान कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनीही तिच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबियांना धीर दिला. रोशनीचा भाऊ आणि तिचे वडील हे अहमदाबादला निघाले असून तिची आई दुःखात बुडाली आहे.
आजारी आईला भेटण्यासाठी आलेल्या मुलाच्या कुटुंबावरही काळाचा घाला
दरम्यान याच दुर्घटनेत मुंबईतील आणखी चार जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतल्या गोरेगावच्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला. गोरेगावचे जावेद अली, त्यांची पत्नी आणि दोन लहानग्या मुलांचा विमान क्रॅश झाल्यामुळे मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, जावेद अली हे गेल्या 12 वर्षापासून लंडनमध्ये वास्तव्यास होते, ते तिथेच नोकरीही करत होते. जावेद अली यांचं लग्न ब्रिटिश नागरिक असलेल्या तरुणीशी झालं आणि ते तिथेच स्थायिक झाले. त्यांना दोन लहान मुलंही होती. जावेद अली यांच्या आईची तब्येत बरी नसल्याने, तिची भेट घेण्यासाठी ते कुटुंबासह 7 दिवसांच्या सुट्टीवर मुंबईत आले होते. आणि काल पुन्हा लंडनला जात होते. मात्र त्याच वेळी विमान अपघात झाला आणि काळाने त्यांच्यावर घाला घातला.
जावेद आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य –
जावेद अली 37 वर्षे, मरियम अली 35 वर्षे, अमीन अली -4 वर्षे, झियान अली – 8 वर्षे
