केडीएमसीत पुन्हा एकदा कचरा प्रश्न पेटणार, स्थानिकांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा

अमजद खान

| Edited By: |

Updated on: Jul 05, 2021 | 3:07 PM

कल्याण डोंबिवली महापालिकेत पुन्हा एकदा कचरा प्रश्न पेटणार आहे. कल्याणमधील उंबर्डे घनकचरा प्रकल्पामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे.

केडीएमसीत पुन्हा एकदा कचरा प्रश्न पेटणार, स्थानिकांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा
Kalyan-Dombivli Municipal Corporation

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेत पुन्हा एकदा कचरा प्रश्न पेटणार आहे. कल्याणमधील उंबर्डे घनकचरा प्रकल्पामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणच्या कचऱ्यामुळे मोठी दुर्गंधी पसरत असून त्यावर माश्या भिरभिरत असल्याने गावकरी त्रस्त झाले आहेत. ही समस्या लवकरात लवकर सोडवा, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करु, अशा इशारा या ठिकाणच्या स्थानिकांनी दिला आहे. (Kalyan-Dombivli Municipal Corporation Garbage Issue locals warning of intense agitation)

नेमकं प्रकरण काय?

कल्याण डोंबिवली महापालिकेचा आधारवाडी डंपिंग ग्राऊंड बंद करण्यात आला आहे. हे डंपिंग ग्राऊंड बंद करण्यात आल्याने आता शहरातील गोळा करण्यात आलेला कचरा उंबर्डे प्रकल्पाच्या ठिकाणी प्रक्रियेसाठी टाकला जातो. या प्रकल्पाचे मॅनेजमेंट हे खासगी कंत्राटदाराकडून केले जाते.

मात्र गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी कचऱ्याचा डोंगर तयार झाला आहे. यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. याचा त्रास उंबर्डे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना होत आहे. तसेच या कचऱ्यावर अनेक माशा घोंघावत असल्याने त्याचा नागरिकांना त्रास होत आहे.

प्रकल्प बंद करण्याची स्थानिकांची मागणी

दरम्यान उंबर्डे घनकचरा प्रकल्प सुरु करण्यापूर्वी हा प्रकल्प बंदिस्त असावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र हा कचरा प्रकल्प बंदिस्त करण्यात आला नाही. त्याचबरोबर शहरातील सगळा कचरा याच ठिकाणी टाकला जाऊ नये. डोंबिवली आणि कल्याण शहरात दोन स्वतंत्र कचरा प्रकल्प असावेत. तसेच या ठिकाणी केवळ उंबर्डे येथील क आणि ब प्रभागातील कचरा टाकला जावा, अशी मागणी स्थानिकांनी केली होती.

या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक चिंतामणी लोखंडे यांच्या नेतृत्वात काही नागरिकांनी प्रत्यक्ष प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. या प्रकल्पामुळे मोठी दुर्गंधी पसरली आहे. तसेच ठिकठिकाणी माशाही घोघांवत आहे. त्यामुळे अनेक गावकरी त्रस्त आहेत. आम्ही आत्ता नक्की करु तरी काय, गाव सोडून जाऊ का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे. तसेच यातील अनेकांनी प्रकल्प चालवणाऱ्या खासगी व्यक्तीला जाब विचारला आहे.

तीव्र आंदोलनाचा इशारा

या प्रकल्पात केवळ 17 गाडी येण्याची परवानगी असताना जवळपास 200 गाड्या येतात. जर येणाऱ्या काळात लवकरात लवकर ही समस्या सुटली नाही, तर गावकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे केडीएमसीत आता कचरा प्रश्न पेटणार असण्याची चिन्हं दिसत आहे.

(Kalyan-Dombivli Municipal Corporation Garbage Issue locals warning of intense agitation)

संबंधित बातम्या :

कांदिवली पाठोपाठ नवी मुंबईतही बोगस लसीकरण, डॉ. मनीष त्रिपाठीसह 2 जणांवर गुन्हा दाखल

पाकिस्तानचा स्वस्त कांदा बाजारपेठेत, बांगलादेशच्या सीमा बंद, भारतीय कांदा उत्पादक अडचणीत

अंबरनाथच्या ओढ्यात हजारो मृत माशांचा खच, पोल्ट्री फार्मच्या कचऱ्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI