काँग्रेसला संपवण्याचा विचार करणाऱ्यांना निवडणुकीतून जनतेचे चोख उत्तर : नाना पटोले
निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना पटोले म्हणाले की, विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा लोकशाहीत जनता हीच मोठी असते, जनतेचा विश्वास महत्त्वाचा असतो. आम्ही जनतेचा विश्वास पुन्हा संपादन करू शकलो. काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्यापूर्वीही संघर्ष केला आणि स्वातंत्र्यानंतर देश उभा करण्यासाठीही संघर्ष केला.
मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीत काँग्रेसला मिळालेले यश हे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, त्यांनी मेहनत घेतल्यानेच या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाची कामगिरी चांगली झाली असून, ही तर सुरुवात आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले.
विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन
निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना पटोले म्हणाले की, विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा लोकशाहीत जनता हीच मोठी असते, जनतेचा विश्वास महत्त्वाचा असतो. आम्ही जनतेचा विश्वास पुन्हा संपादन करू शकलो. काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्यापूर्वीही संघर्ष केला आणि स्वातंत्र्यानंतर देश उभा करण्यासाठीही संघर्ष केला.
भारतीय जनता पक्षाची धोरणे ही शेतकरीविरोधी
परंतु मागील काही वर्षात सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाची धोरणे ही शेतकरीविरोधी, कामगारविरोधी, बहुजनविरोधी आणि देश विकायला निघालेली आहेत आणि याला फक्त काँग्रेस पक्षच थोपवू शकतो. संविधान, लोकशाहीचे रक्षणही काँग्रेसच करू शकतो ही जनतेची धारणा आहे म्हणूनच त्यांनी काँग्रेस पक्षावर विश्वास टाकलेला आहे. या यशाबद्दल पटोले यांनी राज्यातील जनता व कार्यकर्ते यांचे आभार मानले आहेत.
भाजपला काँग्रेसने धोबीपछाड दिला
नागपूरमध्ये भाजपचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान केंद्रीय मंत्री, आरएसएसचे मुख्यालय आहे. तेथे भाजपला काँग्रेसने धोबीपछाड दिलेला आहे. पंचायत समित्यांमध्येही काँग्रेस पक्षच सरस ठरला. केंद्रातील सरकार हे महाराष्ट्राशी दुजाभाव करत आहे. नैसर्गिक संकट आलेले असताना गुजरातला एक हजार कोटी रुपये दिले जातात, पण महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली जातात हे महाराष्ट्रातील जनतेला पटलेले नाही.
जनतेचेही काँग्रेसला मतदानाच्या रुपाने भरभरून आशीर्वाद
आजचे यश हे कार्यकर्त्यांचे यश आहे, जनतेनेही काँग्रेसला मतदानाच्या रुपाने भरभरून आशीर्वाद दिला. या यशामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये लढण्याची आणखी ऊर्जा निर्माण झाली असून महाराष्ट्रात पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाला एक नंबरचा पक्ष करण्याचा निर्धार केला होता, त्याची प्रक्रिया सुरू झाली. महाराष्ट्रात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. राज्यात आणि केंद्रात काँग्रेस हाच पर्याय आहे. काही लोक काँग्रेसला संपवायचा विचार सातत्याने करत असतात, त्यांना जनतेने या निकालातून चोख उत्तर दिलेले आहे, असे प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले.
संबंधित बातम्या
गड भाजपच्या दिग्गज नेत्यांचा पण मुसंडी काँग्रेसची, नागपूर झेडपीला काँग्रेसला दणदणीत यश