Nagpur Paper Leak : एक विद्यार्थीनी वारंवार वॉशरुमला जात होती, त्यानंतर तीन पेपर फुटल्याचे समजले
राज्याची उपराजधानी नागपूर येथे रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र पाठोपाठ गणिताही पेपर फुटल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणातील तिघा आरोपींच्या मोबाईलचा डेटा डिलीट करण्यात आला होता. हा डेटा रिकव्हर करण्यात यश आले आहे. त्यानंतर आणखी गणिताचा पेपर उघडकीस आले आहे.

नागपूरात बारावीचा गणिताचा पेपरही फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र पेपरफुटीनंतर आता तिसरा गणिताचा पेपर फुटल्याची माहिती आरोपींच्या मोबाईल डेटा रिकव्हरीमधून उघड झाली आहे. या प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे. तर आणखी धक्कादायक माहिती म्हणजे अनेक परिक्षा केंद्रात बारावीच्या २५ प्रश्नपत्रिकेच्या लिफाफ्यात केवळ २४ प्रश्नपत्रिकाच होत्या, त्यामुळे पेपरफुटी आणि आणि काही केंद्रांवर एक प्रश्नपत्रिका कमी गेल्याच्या काय संबंध आहे का ? हाच सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
नागपूर बोर्ड हादरले
नागपुरात बारावीचे तीन पेपर फुटले आहेत. आधी रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र विषयाच्या पेपर लीक प्रकारात तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. ज्या व्हॅाटॲप ग्रुपवरुन या आरोपींनी प्रश्नपत्रिका फोडली आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली. त्या मोबाईलचा सर्व डेटा डिलीट केला होता. पोलीसांनी आरोपींच्या मोबाईलचा डेटा रिकव्हर केल्यानंतर गणिताची प्रश्नपत्रिकाही लिक झाल्याची माहिती उघड झाली आहे. आरोपींच्या चॅटींग रेकॉर्डमध्ये २१ फेब्रुवारीला गणिताची प्रश्नपत्रिका पेपरच्या वेळेआधी पाठवल्याचे स्पष्ट झाले आहे. सलग तीन विषयांचे पेपर फुटल्याने नागपूर बोर्ड हादरले आहे.
प्रश्नपत्रिका फुटली असे म्हणता येत नाही !
तीन पेपर लीक झाले, सहा जणांना अटक झाली आहे. पोलीस विभागाने तपासासाठी ‘एसआयटी’ही स्थापन केली आहे. पण नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे अधिकारी मात्र प्रश्नपत्रिका फुटली असे मानायलाच तयार नाहीत. “नागपूरात घडलेला प्रकार पेपरफुटीचा नाही. विद्यार्थ्यांनी गैरव्यवहार करण्यासाठी केलेला हा प्रकार. पण आम्ही तो प्रकार हाणून पाडला असे नागपूर बोर्डाचे अध्यक्ष डॅा. शिवलिंग पटवे यांनी म्हटले आहे.
बारावीच्या पेपरलीक प्रकरणात नागपूर बोर्डाचे स्वतंत्र चौकशी सुरु झाली आहे. बोर्डाचे अधिकारी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करीत असून दोषींवर कठोर कारवाई होणार आहे. तर दुसरीकडे नागपूर पोलीसांचे विशेष तपास पथक या प्रकरणाची सखोल चौकशी करीत आहेत. बारावीच्या पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपींना अटक झाली आहे. आज पोलिसांनी दिनेश कोटांगले या खाजगी ट्युशन क्लासेसच्या शिक्षकाला अटक केली आहे. तर प्रदीप जांगडे अनुदानीत शाळेच्या शिक्षकालाही ताब्यात घेतले आहे.
पेपरफुटी आरोपी अटक
या प्रकरणात आतापर्यंत एक्सेलेन्ट अकॅडमीच्या मुस्तफा खान , जुनेद मोहम्मद अब्दुल जावेद, निशिकांत मूल ,फरहान अख्तर आणि दिनेश कोटांगले यांना पोलीसांनी अटक दाखवली आहे. तर सरकारी अनुदानित शाळेतील शिक्षक प्रदीप जांगडे याला ताब्यात घेतले असून आज उशीरा त्याच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. याशिवाय एक आरोपी अल्पवयीन आहे.
‘एक्सआयआय’ नावाचा व्हाट्सअप ग्रुप, मुख्य सुत्रधार नेमका कोण?
आरोपी निशिकांत मुल याने परिक्षेच्या सरावासाठी २१ विद्यार्थ्यांचा ‘एक्सआयआय’ नावाचा ग्रुप तयार केला होता. सिव्हिल लाईन्स येथील सेंट उर्लूला येथील परीक्षा केंद्रावर एक विद्यार्थिनी वारंवार वॅाशरुममध्ये जात होती. संशय आल्याने तपासणी केली असता तिच्या स्मार्टफोन व्हॅाट्सएपवर बारावीची रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका आणि त्यांची उत्तरे मिळाली. यापूर्वी झालेला भौतिकशास्त्राचा पेपरंही त्यात होता. या प्रकरणात निशिकांत मुल आणि फरहान यांचा सक्रिय सहभाग होता. त्यामुळे गुन्हा दाखल करुन या दोघांना पोलिसांनी अटक केली. या आरोपीच्या चौकशीतून इतर आरोपींना अटक करण्यात आली. याचा मुख्य सुत्रधार नेमका कोण? याचा पोलीस शोध घेत आहेत.
