Maharashtra Breaking News LIVE 17 February 2025 : हे चित्र पाहून मनाला वेदना होतात, जयंत पाटील असं का म्हणाले?
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 17 फेब्रुवारी 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

नवी दिल्ली आणि एनसीआर परिसराला आज पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपाचे केंद्र दिल्लीच्या जवळ होते. दिल्लीत पहाटे ५.३६ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी महापालिका निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. यानिमित्ताने सदस्य नोंदणी, हळदी कुंकू सभारंभ, जाहीर सभा असे विविध कार्यक्रम पार पडताना दिसत आहे. या कार्यक्रमाला अनेक वरिष्ठ नेते हजेरी लावताना दिसत आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी अपघात होत असून यात काहींना जीव गमवावा लागत आहे. तर काहीजण गंभीर जखमी होत आहेत.
LIVE NEWS & UPDATES
-
हे चित्र पाहून मनाला वेदना होतात, जयंत पाटील असं का म्हणाले?
इस्लामपूरमधील राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयातील नवीन आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह आणि अत्याधुनिक जिम्नॅशिअमचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. यासाठी जयंत पाटील आणि नितीन गडकरी एकत्र होते. यावरुन आता नितीन गडकरी राष्ट्रवादी मध्ये येणार अश्या बातम्या चालवू नका, असं आवाहन जयंत पाटील यांनी पत्रकारांना केलं आहे. गेल्या काही दिवसात काही चर्चा सुरू झाल्या. त्यावर नामांकित पत्रकार सुधा बोलू लागले याच आश्चर्य वाटतं, असंही जयंत पाटील म्हणाले. दोन वेगवेगळ्या पक्षातील लोक चांगल्या कामासाठी एकत्र येऊ शकत नाहीत अशीच पत्रकारांची धारण झालेली दिसते.हे चित्र पाहून मनाला वेदना होतात, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं.
-
अकोल्यातील बाळापुरात 2 गटात तुफान राडा
अकोल्यातून मोठी बातमी समोर आली आहे. अकोल्यातील बाळापुराताल हातरुण गावात 2 गटात तुफान राडा झालाय. दोन्ही गटात किरकोळ कारणावरुन राडा झाला. त्यानंतर दोन्ही गटांकडून दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत काही जण जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
-
-
पंचांनी दिलेला निर्णय काहींना पटत नसतो, सुनील तटकरेंकडून भरत गोगावले यांना टोला
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन भरत गोगावले यांना टोला लगावला आहे. पंचांनी दिलेला निर्णय काहींना पटत नसतो, असं म्हणत तटकरे यांनी गोगावले यांना टोला लगावला आहे. रायगडमध्ये शिवसेनेच्या आमदारांनी जाहीर विरोध दर्शवल्यानंतर आदिती तटकरे यांची पालकमंत्री म्हणून केलेली नियुक्ती रोखण्यात आली. तेव्हापासून राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना यांच्यात पालकमंत्रिपदावरुन रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
-
तहसीलदारांच्या केबिनमध्ये एक जणाचा आत्मदहनाचा प्रयत्न
तुळजापूर तहसीलदारांच्या केबिनमध्ये एक जणाचा आत्मदहनाचा प्रयत्न केला. अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. तुळजापूर शहरातील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी हे टोकाचे पाऊल उचलले. परंतु पोलिसांनी दाखवलेल्या समय सूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला.
-
जयंत पाटील भाजपमध्ये येण्याची चर्चा
सांगलीत भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आज एकाच व्यासपीठावर येणार आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा जयंत पाटील हे भाजपात जाणार का ? अशी चर्चा सुरू झालेली आहे,
-
-
मधमांशाचा हल्ला, अंत्ययात्रेतील नागरीक शव सोडून पळू लागले
जळगावच्या पारोळा तालुक्यात नगाव गावात स्मशान भूमीकडे जात असलेल्या अंत्ययात्रेत सहभागी नागरिकांवर अचानक मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली. मधमाशांनी केलेला हल्ल्यात अंत्ययात्रेत सहभागी तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मधमाशांनी हल्ला केल्यानंतर स्वतः चा बचाव करण्यासाठी अंत्ययात्रेत सहभागी शोकाकुल नातेवाईक शव सोडून वाट मिळेल तिकडे पळाले.
-
ठाकरेंच्या शिवसेनेची पुण्यात बैठक
ठाकरेंच्या शिवसेनेतून अनेक जण पक्ष सोडून जात आहे. यामुळे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी पुण्यातील शिवसेना भवनात बैठक होत आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी ठाकरे गटाची बैठक होत आहे.
-
प्रयागराज- महाकुंभाच्या मेळा परिसरातील सेक्टर 8 मध्ये भीषण आग लागली
प्रयागराज: महाकुंभ मेळा परिसरातील सेक्टर ८ मध्ये भीषण आग लागली आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
-
यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी नाती कायम जपायची असतात- भास्कर जाधव
यश मिळाल्यानंतर पाठ थोपटणारी नाती कायम जपायची असतात असं स्टेटस भास्कर जाधव यांनी ठेवलं आहे. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या स्टेटसची चर्चा रंगली आहे. भास्कर जाधव यांचा रोख कोणाकडे आहे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
-
खासदार अरविंद सावंत आणि वैभव नाईक मातोश्रीवर दाखल
उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आणि वैभव नाईक हे मातोश्रीवर दाखल झाले आहेत. एसीबीच्या ससेमिऱ्यानंतर वैभव नाईक मातोश्रीवर दाखल झाले आहेत.
-
पंचांनी दिलेला निर्णय काही लोकांना पटत नसतो- तटकरे
पालकमंत्रिपदावरून सुनिल तटकरेंनी गोगावलेंवर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. काही लोकांना निर्णय परत एकदा पाहीजे , असं सुनिल तटकरे म्हणाले. त्यावर संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं. निर्णय चुकला तर काय होतं हे पुण्याची पंचांवरून आपण पाहीलं आहे.
-
दिल्लीत सरकार स्थापनेसाठी भाजपची आज संध्याकाळी बैठक होणार
दिल्लीत सरकार स्थापनेबाबत भाजप आज संध्याकाळी बैठक घेणार आहे आणि त्यात मुख्यमंत्र्यांच्या नावावर विचार केला जाईल.
-
तब्बल 71 वर्षानंतर दिल्लीत साहित्य संमेलन; पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सरहद पुणे-दिल्ली आयोजित 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे होत आहे. 21,22 आणि 23 फेब्रुवारीला हे साहित्य संमेलन होणार आहे. तब्बल 71 वर्षानंतर साहित्य संमेलन होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहाणार आहेत. उद्घाटन सोहळा दिल्लीच्या विज्ञान भवनात पार पडणार आहे. ग्रंथ दिंडीने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
-
जालन्यात शासकीय कंत्राटदार संघटनेकडून आजपासून काम बंद आंदोलन; 50% निधी मिळाला तरच कामाला सुरुवात
400 कोटीची देयके थकल्याने कंत्राटदारांनी आपली सर्व वाहने सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आणून उभी केली आहेत. या आंदोलनात मोठ्या संख्येने कंत्राटदार उपस्थित आहेत. 50% निधी आल्यानंतरच पुढील कामाला सुरुवात करणार असल्याच कंत्राटदारांनी सांगितलं आहे. जालना जिल्ह्यातील सरकारी कंत्राटदारांची जवळपास 400 कोटी रुपयांची बिले सरकारकडे थकीत आहे.हे थकित बील लवकरात लवकर मिळाव यासाठी जालना जिल्ह्यातील सरकारी कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर आज काम बंद आंदोलन केलंय.
-
‘छावा’ चित्रपट टॅक्स फ्री करा अन्यथा…;मराठा क्रांती मोर्चाचा इशारा
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शित झालेला ‘छावा’ चित्रपट टॅक्स फ्री करण्याबाबत मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज यांच्या वतीने जिल्हाधिकारी महसूल विभागाला निवेदन देण्यात आलं आहे. ठाणे जिल्ह्यात छावा चित्रपट टॅक्स फ्री न झाल्यास दोन दिवसात आंदोलन करणार असल्याचा इशारा सकल मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.
-
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पहिल्यांदाच सुप्रिया सुळे मस्साजोगमध्ये
बीड- धनंजय देशमुख आणि कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी परळीमध्ये जाऊन महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेणार आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पहिल्यांदाच सुप्रिया सुळे या मस्साजोगमध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत.
-
बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांचा नैतिकतेचा बुरखा फाटलाय- संजय राऊत
“बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांचा नैतिकतेचा बुरखा फाटला आहे, हे स्पष्ट मी बोलतो. धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यायचा की नाही यापेक्षा कोणी घ्यायचा आहे ठरवलं पाहिजे. तो अजित पवारांनी घ्यायचा की देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायचा? कोणाला वाचवत आहात हे स्पष्ट मत आहे. मराठा आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सुरेश धस हा मोहरा पुढे आणला,” अशी टीका संजय राऊतांनी केली.
-
युट्यूबर रणवीर अलाहबादियाला केंद्रीय महिला आयोगाकडून नोटीस
नवी दिल्ली- ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमधील वादग्रस्त टिपण्णी प्रकरणी युट्यूबर रणवीर अलाहबादियाला केंद्रीय महिला आयोगाने नोटीस बजावली आहे. रणवीरला दुपारी १२ वाजता चौकशीला हजार राहण्याच्या सूचना करण्यात आली आहे.
-
संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या अश्रूंचा बाजार केला- संजय राऊत
“संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या अश्रूंचा बाजार केला. बिहार टाईप माफिया टोळीचं नेतृत्व कोण करत आहे, हे सुरेश धस यांनी महाराष्ट्र आणि देशाला सांगावं. मुख्य सूत्रधार मुंडे आणि त्यांनाच रात्री भेटायला जातात मग संशय निर्माण होणारच,” असं संजय राऊत म्हणाले.
-
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलानंतर आता पुणे शहराध्यक्ष बदलाची चर्चा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलानंतर आता पुणे शहराध्यक्ष बदलाची चर्चा सुरू झाली. पुणे शहराध्यक्ष बदलाची नवीन प्रदेशाध्यक्षांकडे शहरातील काही पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. 21 तारखेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत पुण्यातील पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत नवीन शहराध्यक्ष पदावर चर्चा होण्याची शक्यता आहे. नवीन शहराध्यक्ष पदासाठी चंद्रकांत कदम, दत्ता बहिरट आणि आमदार रवींद्र धंगेकर यांच्या नावाची चर्चा आहे.
-
Maharashtra News: आम्ही कुणालाही बोलवत नाही, लोक स्वतःहून आमच्या पक्षात येतात – चंद्रशेखर बावनकुळे
आम्ही कुणालाही बोलवत नाही, लोक स्वतःहून आमच्या पक्षात येतात… मोदींनी केलेली विकासकामं पाहून लोक आमच्या पक्षात येतात… विकासाच्या मुद्द्यावर महाराष्ट्राला पुढे नेण्याचा आमचा संकल्प… असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.
-
Maharashtra News: अग्निशमन वाहन खरेदीसाठी महापालिकेकडे पैसे नाही
अत्याधुनिक अग्निशमन वाहन खरेदीसाठी 35 कोटींच्या अनुदानाची मागणी… जिल्हा नियोजन समितीला प्रस्ताव देण्यात येणार आहे… अत्याधुनिक अग्निशमन वाहन खरेदीसाठी ठाणे महापालिकेला आता शासनाच्या अनुदानावर अवलंबून राहावे लागणार… अग्निशमन केंद्रामध्ये वाहनांचे 15 प्रकार असून एकूण 68 वाहने उपलब्ध आहे… उंच इमारती उभारण्यासाठी सर्रासपणे परवानगी देण्यात येतात मात्र या उंच इमारतीच्या सुरक्षिततेविषयी कोणत्याही प्रकारचा विचार केला जात नाही…
-
Maharashtra News: अमेरिकेतून बेड्या घालून भारतीयांचं तिसरं विमान आलं – संजय राऊत
अमेरिकेतून बेड्या घालून भारतीयांचं तिसरं विमान आलं… अमेरिकेतून भारतात 3 लष्करी विमानं आले… मोदी सरकार करतंय काय? संजय राऊतांचा आरोप… न्यू इंडिया बँक लुटली, मुलुंडचा पोपटलाल गेला कुठे? असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
-
जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी सुरेश धसांना पुढे आणलं – संजय राऊत
धनंजय मुंडेंचा राजीनामा कोणी घ्यायचा हे आधी ठरवलं पाहिजे. मनोज जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी सुरेश धसांना पुढे आणलं. न्यू इंडिया बँक लुटली गेली, त्यात सगळे भाजपचे लोक. न्यू इंडिया बँक लुटली गेली, मुलुंडचा पोपटलाल कुठे? संजय राऊत यांचा गंभीर आरोप
-
बोरांमधून शेतकऱ्याला 12 ते 15 लाखांचं उत्पन्न
30 एकरामध्ये धुळे तालुक्यातील शिवारात शेतकऱ्याने केली एप्पल व उमरान जातीच्या बोरांची लागवड. पारंपारिक शेतीची कास सोडत फळपीक लागवडीकडे धूळ्यातील शेतकरी. न्याहळोद शिवारातील बोरं थेट दिल्लीत. 800 झाड एप्पल बोरं, तर अडीचशे झाडं उमरान जातीची. दररोज साधारण दोन टन बोरांची आवक. बोरांना 30 रुपये भाव दिल्लीचे व्यापारी गावात येऊन घेऊन जातात बोरं. शेतकऱ्यांला 12 ते 15 लाखाचं उत्पन्न मिळतं.
-
उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदार-खासदारांची बैठक
ठाकरे गटाच्या खासदारांची येत्या 20 फेब्रुवारीला तर आमदारांची 25 तारखेला बैठक होणार आहे. खासदार-आमदारांना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. पक्षातील अनेक पदाधिकारी ठाकरेंची साथ सोडत असताना उद्धव ठाकरे यांनी बोलवली आमदार खासदारांची बैठक.
-
धाराशिवमध्ये शिवजयंती उत्सवात गरजू विधवा महिलांना शेळ्यांचे वाटप
शिवजयंती निमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. धाराशिव येथील शिवराज्याभिषेक सोहळा समितीकडून गरजू विधवा महिलांना मदतीचा हात देण्यात आला आहे. शिवजयंती समितीकडून 51 विधवा गरजू महिलांना शेळ्यांचं वाटप करण्यात आलं.
-
ठाण्यात अग्निशमन वाहन खरेदीसाठी महापालिकेकडे पैसे नाही
अत्याधुनिक अग्निशमन वाहन खरेदीसाठी 35 कोटीच्या अनुदानाची मागणी. जिल्हा नियोजन समितीला प्रस्ताव देण्यात येणार आहे. अत्याधुनिक अग्निशमन वाहन खरेदीसाठी ठाणे महापालिकेला आता शासनाच्या अनुदानावर अवलंबून राहावे लागणार. अग्निशमन केंद्रामध्ये वाहनांचे 15 प्रकार असून एकूण 68 वाहने उपलब्ध आहेत. उंच इमारती उभारण्यासाठी सर्रासपणे परवानगी देण्यात येतात. मात्र या उंच इमारतीच्या सुरक्षिततेविषयी कोणत्याही प्रकारचा विचार केला जात नाही.
-
समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा अपघात, एकाचा मृत्यू
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा अपघात झाला आहे. वनोजा ते मालेगावच्या दरम्यान हा अपघात घडला. राजलक्ष्मी कंपनीची साईरथ नावाची खाजगी बस पुण्यावरून नागपूरकडे जात होती. त्यावेळी हा अपघात घडला. यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर 15 ते 20 प्रवाशी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या बसमध्ये एकूण 30 ते 35 प्रवाशी होते. वाशिमचे आमदार श्याम खोडे आणि शेलूबाजार येथील युवक मदतीसाठी अपघातस्थळी दाखल झाले आहेत. सध्या रुग्ण वाहिकेतून जखमी प्रवाशांना कारंजा आणि अकोला इथे उपचारासाठी पाठवण्यात येत आहे.
-
बीडमध्ये ब्रेक निकामी झाल्याने ट्रक पलटी, 12 जण जखमी
बीड जवळील कोळवाडी गावाजवळ ब्रेक निकामी झाल्याने हरभरा घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. त्यानंतर अनेक वाहने एकमेकांवर आदळली. घटना धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे. या अपघातात तब्बल 12 जण जखमी झाले आहेत. जखमींवर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
-
डोंबिवलीत 65 इमारतींच्या कारवाई आदेशावरुन ठाकरे गट आक्रमक, सर्वोच्च न्यायालयात घेणार धाव
डोंबिवलीतील 65 इमारतींच्या कारवाई आदेश वरून ठाकरे गट आक्रमक झाला आहे. फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई नाही, मात्र रहिवाशांवर अन्याय होत असल्याचा सवाल ठाकरे गटाने केला आहे. साडे सहा हजार कुटुंबांना बेघर होऊ देणार नाही यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार असा इशारा दीपेश म्हात्रे यांनी दिला आहे. आदित्य ठाकरे आणि इतर पदाधिकारी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती दीपेश म्हात्रे यांनी दिली.
-
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक योगेश बोसमियांनी घेतली पालकमंत्री गणेश नाईक यांची भेट
वसई : पालघर जिल्ह्यातील विकासासाठी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक योगेश बोसमिया यांनी पालकमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. नवी मुंबईप्रमाणे पालघर जिल्ह्याचा ही विकास व्हावा. नव्याने होत असलेल्या वाढवन बंदर, बुलेट ट्रेन, मुंबई वडोदरा एक्स्प्रेस महामार्ग, जे एन पी टी कॅरिडॉअर सारखे प्रकल्पामुळे जिल्ह्यातील बांधकाम व्यवसाय कसा विश्वासदर्शक वाढेल, यावर चर्चा केली आहे. रश्मी बिल्डर योगेश बोसमिया यांचे घर हो तो ऐसा या नावाने वसई, विरार, नायगाव, मुंबई, अंधेरी, आणि पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी बांधकाम प्रोजेक्ट्स चालू आहेत.
Published On - Feb 17,2025 8:22 AM
