Maharashtra Breaking News LIVE 27 May 2025 : पावसामुळे टरबूज पिक उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान, धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांच्याकडून पाहणी
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 27 मे 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

सोमवार प्रमाणे आज देखील मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसाचा फटका मध्ये रेल्वेला बसला होता. सोमवारी दुपारपर्यंत मध्य रेल्वे ठप्प झाली होती. मात्र आज देखील मध्य रेल्वे मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावत आहेत. मुसळधार पावसामुळे शक्यतो घराच्या बाहेर पडू नये असे प्रशासनाने आव्हान केले आहे. तर वसई विरार नालसोपाऱ्यात मंगळावारी सकाळी पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र आभाळ पूर्णपणे भरून आले आहेत. मध्यरात्री रिमझिम पावसाने लावली हजेरी होती. सकाळी विरारहून चर्चगेटला जाणाऱ्या काही लोकल 5 मिनिटं उशिराने धावत आहेत तर काही लोकल सुरळीत सुरू आहेत. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील नंददीप इमारतीचे 50 ते 60 वर्ष जूने बांधकाम तिसऱ्या मजल्याच्या जिन्याचा गॅलरीचा काही भाग मध्यरात्री कोसळला आहे. यामध्ये कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. मुंबईत सोमवारी झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे राज्याच्या प्रशासनाचे हृदय समजल्या जाणाऱ्या मंत्रालयात गुडघाभर पाणी साचले होते. गार्डन गेट, आरसा गेट परिसरात शासकीय वाहनं पाण्यात अडकली होती. पावसामुळे कालचं कामकाज बंद ठेवावं लागलं. मात्र आता पाणी ओसरलं असून, पुन्हा एकदा मंत्रालय परिसरात कामकाज सुरू झालं आहे. सफाई कर्मचारी सकाळपासूनच साचलेला गाळ, कचरा आणि पाणी काढण्याचं काम युद्धपातळीवर करताना दिसून येत आहेत. आवारातील रस्त्यांवरून पुन्हा वाहनांची वर्दळ सुरू झाली आहे.यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा..
LIVE NEWS & UPDATES
-
बुलढाण्याला पावसानं झोडपलं, वादळी वाऱ्यासह पाऊस
बुलढाण्याला पावसानं झोडपलं, वादळी वाऱ्यासह पाऊस
शेगाव, संग्रामपूर व नांदुरा तालुक्यात गेल्या तासभरापासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस
रस्त्यांवर अनेक झाडे कोसळली, वाहतूक ठप्प
-
जालन्याला पावसानं झोडपलं, सर्वदूर पावसाची हजेरी
जालन्याला पावसानं झोडपलं
अकोला देव परिसरात झालेल्या पावसामुळे जीव रेखा नदीला पूर
नागरिकांचा नदीच्या पुलावरून जीव धोक्यात घालून प्रवास
-
-
पावसामुळे टरबूज पिक उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान, धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांच्याकडून पाहणी
राज्यभरात अनेक ठिकाणी गेले काही दिवस पावसाचा जोर कायम पाहायला मिळतोय. मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. धाराशिव जिल्ह्यातील एकुरका गावात टरबुजाच्या बागेचं नुकसान झालं. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी आज पावसाने नुकसान झालेल्या टरबुजाच्या शेताला भेट दिली आणि नुकसानीची पाहणी केली. शेतात पाणी साचल्याने टरबूज सडायला सुरुवात झालीय. शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान तर झालेच. तसेच आता पेरणीसाठी ते पीक शेताबाहेर कसं काढायचं हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
-
चित्रा वाघ यांच्याकडून महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची पाठराखण
भाजपच्या चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची पाठराखण केली आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात फक्त महिला आयोगाला टार्गेट करून चालणार नाही. तर वैष्णवीची जाऊ मयुरी जगताप यांनी ज्या ज्या ठिकाणी हगवणे कुटुंबियांवरोधात तक्रारी केल्या होत्या त्या सगळ्या यंत्रणांची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली. तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची पाठराखण केली आहे.
मयुरी जगताप हिने पोलीस विभागाकडे तसेच भरोसा सेल कडे तक्रार केली होती. त्यावेळी तिथे कोण अधिकारी होते? त्यांनी काय कारवाई केली याची चौकशी करण्यात येत आहे. असं दावा चित्रा वाघ यांनी केला आहे.
-
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी राजेंद्र हगवणे याला मदत करणाऱ्या 5 आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या 5 आरोपींनी राजेंद्र हगवणे फरार असताना त्याला मदत करत आसरा दिला होता.
-
-
आयकर विभागाने आयटीआर भरण्याची अंतिम तारीख वाढवली
आयकर विभागाने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलैवरून 15 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. आयकर विभागाच्या या निर्णयामुळे लाखो लोकांना दिलासा मिळणार आहे.
-
नांदेडच्या हदगाव तालुक्यात मुसळधार पाऊस
नांदेडच्या हदगाव तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. वरवट गावातील ओढ्याला आलेल्या पुरात आईसह मुलगी व पुतणी गेली वाहून गेल्याची घटना घडली आहे. शेतातून घरी येत असताना हा प्रकार घडला. 10 वर्षीय दुर्गा बळवंत शकिर्गे हिचा मृतदेह सापडला असून अरुणा बळवंत शकिर्गे वय 37 व समीक्षा विजय शकिर्गे वय 7 वर्ष यांचा शोध सुरू आहे. हदगावच्या तहसीलदार सुरेखा नांदे घटनास्थळावर तळ ठोकून आहेत तीन पथकाच्या माध्यमातून शोधकार्य सुरू आहे.
-
पंजाबची कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे, मुख्यमंत्री झोपले आहेत- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
भटिंडा, पंजाब: अमृतसर स्फोटावर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग म्हणतात, “‘एक धमाका थोडा ही हुआ है’… दररोज हातबॉम्बचा वापर केला जात आहे. एक ग्रेनेड मनोरंजन कालिया यांच्या निवासस्थानी पडला, एक मंदिरात पडला आणि एक पोलिस स्टेशनमध्येही पडला. दररोज स्फोट होत आहेत. पंजाबची कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. मुख्यमंत्री झोपले आहेत आणि केंद्रही याची कोणतीही जबाबदारी घेत नाही…”
-
नर्मदा नदीत आंघोळ करताना 3 जणांचा बुडून मृत्यू
मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यात मंगळवारी नर्मदा नदीत आंघोळ करताना तीन जणांचा बुडून मृत्यू झाला. तिमर्णी पोलीस स्टेशन हद्दीतील लाछोरा घाटापासून काही अंतरावर ही घटना घडल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. ही घटना घडली जेव्हा प्रथम दोघे जण आंघोळीसाठी नदीत उतरले, दोघेही बुडू लागले, नंतर त्यांना वाचवण्यासाठी एका व्यक्तीने नदीत उडी मारली पण दुर्दैवाने तिघेही बुडाले.
-
जम्मू आणि काश्मीर: पहलगामच्या आसपासची पर्यटन स्थळे उघडली
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामच्या आसपासची काही पर्यटन स्थळे आज उघडण्यात आली आहेत. आता पर्यटक बेताब व्हॅलीचा आनंद लुटू शकतात. या निर्णयामुळे काश्मीर फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आनंद मिळेल.
-
जळगावच्या अमळनेर तालुक्यात गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान
अमळनेर तालुक्यात निम, पाडळसरे तांदळी, बोहरे या गावांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. अचानक आलेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. एकूणच झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
-
शरद पवार जास्त कोणाबरोबर टिकत नाही- नारायण राणे
नारायण राणे यांनी नुकताच पत्रकार परिषद घेतली. वेळी ते म्हणाले की, जर ते अजित पवार यांच्या बरोबर आले तर साहजीकच आमचा फायदा होईल. आमचा पक्ष मोठा आहे. आम्ही ठरवू काय आणि कसं करायचं.’
-
चंद्रपुरमध्ये वाघाच्या घातक हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू
आज सकाळी भगवानपूरच्या जंगलात एका महिलेला वाघाने ठार केले होते. याच हल्लास्थळापासून फक्त 200 मीटर अंतरावर गुराख्याचा मृतदेह आढळून आलाय. कांतापेठ गावातील सुरेश सोपनकर असे मयताचे नाव आहे. दरम्यान वनपथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
-
सिद्धांत शिरसाट यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेनी दिली प्रतिक्रिया
सामाजिक न्यायमंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. लग्नासाठी मला धमकावण्यात आले तसेच माझा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला, असा आरोप या महिलेने केला होता. तसेच मला 7 दिवसांच्या आत नांदायला घेऊन जावे अन्यथा कायदेशीर कारवाई करेल, अशी नोटीस या महिलेने आपल्या वकिलांमार्फत केला होता. त्यानंतर आता आरोप करणारी हीच महिला समोर आली आहे. मला हे प्रकरण वाढवायचं नाही. हे माझं वैयक्तिक प्रकरण आहे, असं या महिलेनं म्हटलं आहे.
-
राज्याला पावसाने झोडपलं आहे; अनेक गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला
राज्याला पावसाने झोडपलं आहे. शिराळा तालुक्यात पावसामुळे भात शेतीला तळ्याचं स्वरुप आलं आहे. तर पुण्यात मुळशीच्या चाले गावातील पुलावर पाणी साचलं आहे, त्यामुळे जवळपास 16 गावांचा संपर्क तुटला आहे. कोल्हापूरमध्येही पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. राधानगरीतील राऊतवाडी धबधबा प्रवाहित झाला आहे. पर्यटकांना तिथे जाण्यात सक्त मनाई करण्यात आली आहे. तर लातूरमध्येही तुफान पाऊस सुरु असून अहमदपूर तालुक्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला आहे तर, 6 जण जखमी झाले आहेत.
-
आदित्य ठाकरेंनी अजून बाळसं धरलं नाही: खासदार नारायण राणे
आदित्य ठाकरेंनी मुंबईत पावसामुळे झालेल्या परिस्थितीबद्दल सरकारवर टीका केली. त्यानंतर खासदार नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिल आहे. ते म्हणाले की, “आदित्यला नीट मराठीही बोलता येत नाही. आदित्य ठाकरेंनी संजय राऊतांच्या नादी लागू नये. आदित्य ठाकरेंनी अजून बाळसं धरलं नाही. आम्ही उद्धव ठाकरेंची नक्कल केली तर काय होईल? बरं उद्धव ठाकरेंनी नुकसानग्रस्तांनी कधी मदत केली नाही” असं म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंपासून संजय राऊत ते आदित्य ठाकरेंपर्यंत सर्वांवरच हल्लाबोल केला आहे.
-
देशात करोना वाढतोय; महाराष्ट्रात 787 रुग्ण, तर 5 जणांचा मृत्यू
देशात करोना झपाट्याने वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 787 रुग्ण आढळले असून 5 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. तर एकूण देशात बघायचं झालं तर देशात कोरोनामुळे आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे तर 1 हजार 45 रुग्णांची नोंद आढळली आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
-
परशुराम घाटची संरक्षक भिंत कोसळली
मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाच्या वेळेला परशुराम घाटात मोठ्या प्रमाणात खुदाई करण्यात आली. काही ठिकाणी भराव देखील करण्यात आला आणि काँक्रीटचा महामार्ग तयार करण्यात आला. याच वेळेला तीनशे मीटर लांबीची संरक्षक भिंत सिमेंट काँक्रीटची उभारण्यात आली. मात्र मुसळधार पावसामुळे संरक्षण भिंत देखील कोसळायला लागल्या आणि परशुराम घाटातील रस्त्याला धोका निर्माण झाला.
-
पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात
पुण्यात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. पुणे हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. पुणे शहरात विविध भागात जोरदार पाऊस सुरू झाला आहे.
-
वैष्णवीला आठवडाभरापासून मारहाण?
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील आरोपी पती, सासू आणि नणंदेच्या पोलीस कोठडीत २८ मे पर्यंत वाढ करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. शवविच्छेदांना अहवालात आढळून आलेल्या धक्कादायक माहितीची चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती. दरम्यान पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या ३० खुणा आढळल्याचे सांगितले.
-
सरकारच्या तिजोरीतून नुकसान भरपाई द्या
काल मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबलं. त्यामुळे ज्यांच्या घरात आणि दुकानात पाणी गेले, त्यांना सरकारच्या तिजोरीतून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे आदित्य ठाकरे यांनी केली.
-
पुण्यात हेलीपोर्ट सुरु करण्याचा विचार
पुण्यात हेलिकॉप्टरची संख्या सर्वाधिक असल्याने भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून हेलीपोर्ट सुरू करण्याचा विचार सुरू आहे. या प्रकल्पासाठी हडपसर येथील ग्लायडिंग सेंटरच्या जागेचा पर्याय आहे. ही जागा सद्यस्थितीला विमानतळ प्राधिकरणाकडे हस्तांतरित होण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुण्यात २० हेलिकॉप्टर असून १३ हेलिपॅड आहे आणि हीच संख्या पाहता हेलिपोर्ट बनवण्याचा विचार सुरू आहे.
-
पंढरपूरात आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा
पंढरपूरात आलेल्या पुराची कोणतीही सूचना प्रशासनाने न दिल्याने चंद्रभागा नदीतील 8 ते 10 होड्या वाहून गेल्या तर चंद्रभागा वाळवंटातील अनेक छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. चंद्रभागा नदी काठावर भाविकांना स्नान करताना कोणतीही सूचना दिली जात नाही, लाईफ गार्डची व्यवस्था नाही,आपत्ती व्यवस्थापनाची कोणतीही व्यवस्था चंद्रभागा तिरावर नसल्याने आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा उडाल्याचे दिसत आहे.
-
सोलापूरात मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान
सोलापूरातील बार्शी तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेती घरे आणि सरकारी दवाखान्याचं मोठं नुकसान झाले. तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. वैरागसह 54 गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरेल आहेत. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातल्या वैरागमध्ये पावसामुळे हाहाकार उडाला आहे. वैरागमधील तडवळे गावात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने धान्याचे मोठे नुकसान झाले आहे.
-
शरद पवारांनी आता अजित पवारांच्या भूमिकेचं समर्थन करावं- कोकाटे
“शरद पवारांनी ५५ ते ६० वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात घालविली आहेत. शरद पवारांनी आता अजित पवारांच्या भूमिकेचं समर्थन करावं. अजितदादांचं समर्थन केलं तर माझ्यासारख्या अनेक प्रामाणिक कार्यकर्त्यांना आनंदच होईल,” असं माणिकराव कोकाटे म्हणाले.
-
पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात
पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. पुणे शहरात विविध भागात जोरदार पाऊस सुरू आहे.
-
फिन्ले मिल कर्मचाऱ्यांचं वेतनासाठी चिमणीवर चढून आंदोलन
अमरावतीच्या अचलपूरमध्ये फिन्ले मिल कर्मचाऱ्यांचं वेतनासाठी चिमणीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू आहे. अनेक महिन्यांचं थकीत वेतन मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांचं अनोखं आंदोलन सुरू आहे. फीन्ले मिलमध्ये काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्याही केल्या आहेत. दरम्यान जोपर्यंत वेतन देणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
-
चिपळूणमधे NDRF ची टीम दाखल
पावसाळ्यात चिपळूणमध्ये पूरस्थिती निर्माण होते. या पार्श्वभूमीवर NDRF ची टीम नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तैनात करण्यात आली आहे. ऑगस्टपर्यंत चिपळूणमध्ये एनडीआरएफ जवान राहणार आहेत. चिपळूणमधील शासकीय निवासस्थान परिसरात एनडीआरएफची टीम तैनात राहणार आहे.
-
धुळ्यातील रोकड प्रकरणी भास्करराव जाधव यांचं विधानसभा अध्यक्षांना पत्र
धुळ्यातील रोकड प्रकरणी शिवसेना नेते, आमदार भास्करराव जाधव यांनी विधानपरिषद सभापती आणि विधानसभा अध्यक्षांना खरमरीत पत्र लिहिले आहे. धुळे प्रकरणामुळे महाराष्ट्र विधिमंडळाच्या गौरवशाली लौकिकाला गालबोट लागले आहे. महाराष्ट्राच्या संसदीय परंपरेला आणि विधिमंडळाच्या पवित्रतेला कलंक लावणारी घटना आहे. विधिमंडळाच्या अंदाज समितीवर झालेल्या गंभीर आरोपांबाबत उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
-
सांगलीच्या कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ
सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून सतत पाऊस पडल्यामुळे सांगलीच्या कृष्णा आणि वारणा नदी पात्रामध्ये वाढ झाली होती. काल सांगलीच्या कृष्णा नदीची पातळी ही 16 फुटांवर पोहोचली होती. मात्र आज कृष्णाची पातळी ही जवळपास 15 फुटांपर्यंत आली आहे. एक फुटाने कृष्णेची पातळी उतरली आहे. त्यामुळे सांगलीकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र कृष्णा आणि वारणा नदीपात्रावरील चार बंधारे अद्यापही पाण्याखालीच आहेत. तर जिल्ह्यातील शेतीमध्ये काही ठिकाणी पाणी साचल्याचे चित्रही पहावयास मिळत आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे.
-
आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने नर्स सासूने घरातच सुनेचा गर्भपात केला
नाशिक – आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने नर्स सासूने घरातच सुनेचा गर्भपात केला. प्रेमविवाह केलेल्या युवतीचा पतीसह नर्स सासू आणि नणंदने बळजबरीने गर्भपात केला. याप्रकरणी ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करत सासू-सासरे पती आणि नंदेला पोलिसांनी अटक केली.
-
अचलपूरमध्ये मिल कर्मचाऱ्यांचे वेतनासाठी चिमनी वर चढून शोले स्टाईल आंदोलन
अमरावतीच्या अचलपूर मध्ये फिरले मिल कर्मचाऱ्यांचे वेतनासाठी चिमनी वर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू आहे. अनेक महिन्यांचे थकीत वेतन मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांचे अनोखे आंदोलन असून यापूर्वी कर्मचाऱ्यांनी याच चिमणीवर चढून आंदोलन केले होते. फीनले मिलमध्ये काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांनी आता पर्यंत आत्महत्याही केल्या. जोपर्यंत वेतन देणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
-
मुंबईत समुद्राला उधाण; चार ते पाच मीटर उंच लाटा, किनाऱ्यांवरून दूर राहण्याचा इशारा
मुंबईत समुद्राला उधाण; चार ते पाच मीटर उंच लाटा, किनाऱ्यांवरून दूर राहण्याचा इशारा पालिकेेन दिला आहे. आज दुपारी १२ वाजता मुंबईत समुद्राला मोठी भरती येणार आहे. चार ते पाच मीटर उंच लाटा उसळून समुद्राचे रौद्रस्वरूप दिसेल. मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्यांवर मोठी गर्दी केली असून पालिकेने किनाऱ्यांपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच मरीन ड्राईव्ह, जुहू, गेटवे परिसरात पालिकेचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
-
मुंबईत काल झालेल्या मुसळधार पावसाचा महालक्ष्मी रेसकोर्सलाही बसला फटका
मुंबईत काल झालेल्या मुसळधार पावसाचा महालक्ष्मी रेसकोर्सलाही फटका बसला आहे. महालक्ष्मी रेसकोर्सला तळ्याचं स्वरूप आलं असून संपूर्ण मैदानात पाणी साचलं आहे. घोड्यांची शर्यत होणारा ट्रॅकही पाण्याखाली गेला आहे.
-
कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाविरोधात गंभीर आरोप
कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाविरोधात गंभीर आरोप, फसवणूक केल्याचा तसेच मानसिक-शारीरिक छळ केल्याचा गंभीर आरोप विवाहीत महिलेने केला आहे.
-
वाघाच्या हल्ल्यात ग्रामस्थ ठार
चंद्रपूर जिल्ह्यात तेंदू आणि मोहफूल वेचणीचा हंगाम अवकाळी पावसाने थंडावला असताना वाघाच्या हल्ल्यात ग्रामस्थ ठार होण्याची मालिका मात्र सुरूच आहे. ताज्या घटनेत मूल तालुक्यातील चिरोली येथील महिला वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली.
-
मुंबई-गोवा महामार्गाची पहिल्याच पावसामध्ये दुरावस्था
महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे चिखलमेय परिस्थिती. खड्ड्यातूनच आणि चिखलातूनच वाहन चालकांना काढावा लागतो मार्ग. लोकप्रतिनिधींच्या दाव्याची पोलखोल. गेल्या पंधरा वर्षापासून रत्नागिरीतील मुंबई गोवा महामार्गाची अवस्था बिकट. वाहन चालकांकडून नाराजीचा सूर.
-
5 हजार एसटी ई-बस कंत्राट रद्द करण्याच्या सूचना
मुंबईतील एसटी महामंडळाच्या भाडे तत्वावर 5,150 इलेक्ट्रिक बस पुरवण्याच्या कंत्राटासाठी जबाबदार असलेली कंपनी निष्क्रिय ठरल्यामुळे तिच्याशी केलेले कंत्राट रद्द करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करावी, असे निर्देश राज्याचे परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले.
-
पावसामुळे वैरागसह 54 गावातील जनजीवन विस्कळीत
सोलापूरच्या बार्शी तालुक्यात मुसळधार पावसामुळे वैरागसह 54 गावातील जनजीवन विस्कळीत. वैरागमधील तडवळे गावात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने धान्याचे मोठे नुकसान. तडवळे गावातील जाधव कुटुंबियांच्या घरातील सर्व धान्य पाण्यात गेले. वैरागमध्ये सायंकाळी पाचच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात. अनेक घरांमध्ये शिरले पाणी तर गावांमध्ये पूरजन्य परिस्थिती. सोलापूर जिल्ह्यात झालेल्या मान्सून पूर्व पावसामुळे साठवणूक करण्यात आलेला गहू, ज्वारी , मका यासह अन्य शेती पिकांचे मोठे नुकसान.
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट
सिंधुदुर्ग पावसाचा जोर वाढला आहे. नदीच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच हवामान खात्याने आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. 40 ते 50 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहण्याच्या सूचना केल्या आहेत.
-
बीडमधील बिंदुसरा नदीला पूर
बीड जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसाने शहरातून जाणाऱ्या बिंदुसरा नदीला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. नदीपात्राची स्वच्छता न केल्याने नदीपात्रातील झाडे आणि कचरा पुलाला अडकल्याने शहरातील दगडी पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
-
अमित शाह आज मुंबईत
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईत दौऱ्यावर आहे. गिरगावमधील लक्ष्मी नारायण मंदिराच्या कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहेत. या मंदिराला 150 वर्ष पूर्ण झाली आहेत.
-
कसारा घाटात दरड कोसळली
नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात दरड कोसळली. रात्रभर झालेल्या पावसाने कसार घाटात दरड कोसळली. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. महामार्ग पोलीस केंद्रातील कर्मचाऱ्यांनी दरड बाजूला करत रस्ता सुरु केला.
-
एमपीएससीची आजपासून तीन दिवस परीक्षा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा मुख्य परीक्षा आज 27, 28 व 29 मे होत आहे. सकाळी 9 ते 12 व दुपारी 4 ते 6 या दोन सत्रात परीक्षा घेतल्या जाणार आहे. परीक्षा सेंटरच्या हद्दीत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.
-
कोकणात मुसळधार पाऊस.. डोंगरदऱ्यातील धबधबे प्रवाहित
सह्याद्रीच्या कडे कपारीतून वाहणारा रत्नागिरीतील पानवल धबधबा प्रहवाहित… धबधब्याचे नयमरम्य असे दृश्य… पर्यटकांसाठी सुरक्षित मानला जाणारा धबधबा… रत्नागिरी शहरापासून काही किलोमीटर अंतरावरती असलेला धबधबा…
-
नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात दरड कोसळली
नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात दरड कोसळली… रात्रभर झालेल्या पावसाने दरड कोसळली… दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत… महामार्ग पोलीस केंद्र घोटिच्या कर्मचाऱ्यांनी हाताने ढकलत पडलेली दरड केली बाजूला… वाहतूक झाली सुरळीत
-
मुंबईत सकाळपासून रिमझिम सरी, समुद्राला हाय अलर्ट
मुंबईत सकाळपासून रिमझिम सरी, समुद्राला हाय अलर्ट…. दुपारी उंच लाटांचा इशारा… कालच्या मुसळधार पावसानंतर आज रिमझिम पावसाला सुरुवात… वाहतूक आणि रेल्वे सेवा सुरळीत; जनजीवन पूर्वपदावर… समुद्राला हाय अलर्ट, १२ वाजता ६ मीटर उंच लाटांची शक्यता
-
नाशिक मध्ये बहिणीला प्रपोज मारल्याने तरुणाचा खून
बहिणीला प्रपोज केला म्हणून भावासह त्याच्या तीन साथीदारांनी बेदम मारहाण केलेल्या युवकाचा मृत्यू… नसीम शहा असे मारहाणीत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव… सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली होती घटना रात्री उशिरा पर्यंत सुरू होत गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम… बहिणला प्रपोज टाकतो का असे विचारत केली होती बेदम मारहाण… मारहाणीत डोक्याला गंभीर मार लागल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात करण्यात आले होते दाखल मात्र डॉक्टरांनी तपासून केले मृत घोषित
Published On - May 27,2025 8:42 AM
