महापालिका निवडणुकीआधी उद्धव ठाकरे गटाला भाजपाचा मोठा धक्का, कोकणातील नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश
महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन वळण आले आहे. मालवण नगरपालिकेतील तीन प्रमुख नगरसेवक, त्यात माजी बांधकाम सभापती, माजी नगराध्यक्ष आणि माजी आरोग्य सभापती यांचा समावेश असून, भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. हा पक्षप्रवेश रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत होणार आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी या पक्षातून त्या पक्षात उडी मारत असताना दुसरीकडे भाजपने एक अत्यंत महत्त्वाची खेळी केली आहे. भाजपने थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच मोठे खिंडार पाडले आहे. मालवण नगरपालिकेतील ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष मंदार केणी यांच्यासह १० प्रमुख पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी आज अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईत पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.
ठाकरे गटाला कोकणात जबरदस्त धक्का
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने ठाकरे गटाला कोकणात जबरदस्त धक्का दिला आहे. मालवणमधील ठाकरे गटाचे काही महत्त्वाचे नेते आज मुंबईतील भाजपच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात भाजपमध्ये सामील झाले. या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे ठाकरे गटाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगलाच धक्का बसला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोकणातील मोठे नेते रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महत्त्वाचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची यादी
- मंदार केणी – माजी नगराध्यक्ष
- यतीन खोत – माजी नगरसेवक, बांधकाम सभापती
- दर्शना कासवकर – माजी नगरसेविका, आरोग्य सभापती
- भाई कासवकर – शाखा प्रमुख
- नंदा सारंग – महिला उपशहर प्रमुख
- नितीन पवार – शाखा प्रमुख
- सई वाघ – शाखा प्रमुख
- अमन घोडावले – उपशाखा प्रमुख
- संजय कासवकर – शाखा प्रमुख
- सेजल परब – माजी नगरसेविका
यावेळी पक्षप्रवेशानंतर बोलताना माजी नगराध्यक्ष मंदार केणी यांनी रवींद्र चव्हाण यांच्या कामाचे कौतुक केले. “खऱ्या अर्थाने अडीच वर्षांत रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केले. त्याठिकाणी जे काम त्यांनी केले, त्यामध्ये आम्हाला कधीच विरोधी पक्षाची वागणूक दिली नाही. मालवण शहर हे पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. त्याचा आताही विकास होईल असा आम्हाला विश्वास आहे. पर्यटनदृष्ट्या आम्हाला मालवणचा विकास व्हावा यासाठीच आज आम्ही भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहोत.”
सिंधुदुर्गातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता
भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून रवींद्र चव्हाण हे कोकणातील राजकारणावर जास्त लक्ष देत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील कोकणातील अनेक महत्त्वाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. या महत्त्वाचे नेते आणि कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणून स्थानिक पातळीवर शिवसेनेची ताकद कमी करण्यासाठी भाजपने ही योजना आखली आहे. सध्या ही योजना यशस्वी होताना दिसत आहे. मालवणमधील या मोठ्या पक्षबदलामुळे येत्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता या पक्षप्रवेशाचा ठाकरे गटात काही परिणाम होतो का, हे पाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
