‘अटलजींचा आत्मा ढसाढसा रडत असेल’, उद्धव ठाकरेंचा रत्नागिरीत भाजपवर घणाघात
"अटलजींचा आत्मा वरुन रडत असेल. ते बोलले होते की, अशी सत्ता मला मिळत असेल तर मी चिमटीतही पकडणार नाही. आता अटलजींचा आत्मा ढसाढसा रडत असेल. नाकार्तांच्या हातामध्ये भाजप पक्ष गेला आणि भाजप पक्ष संपवून टाकला", असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज रत्नागिरीत जाहीर सभा पार पडली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंची रत्नागिरीत सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली. “कोकणामध्ये प्रचार करायची गरज आहे का? मग थांबू इकडेच? मी मुद्दाम आलो. कारण मला कल्पना आहे, कोकण हे शिवसेना आणि आम्हा ठाकरे कुटुंबियांचं हृदय आहे. विनायक राऊत आहेत, भास्कर जाधव आहेत, वैभव नाईक, राजन विचारे आहेत, तुम्ही सगळे जण आहात. मला तुमचा अभिमान आहे. शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला. पण तुम्ही जागच्या जागी उभे आहात. हा डाव कसा आहे ते बघा. एकतर शिवसेना फोडली, शिवसेना चोरली, गद्दाराकडे धनुष्यबाण दिलं. गद्दारीची पूर्ण तंगडदोड केली, जागा कापल्या. उमेदवार बदलले”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
“तुम्ही इतके वर्षानुवर्षे जीवापाड जपलेला धनुष्यबाण चोरला आणि कोकणात तो सुद्धा गायब करुन टाकला. म्हणजेच काय त्या लाचाऱ्यांना, खोक्यात जे बसले आहेत, हे गद्दारांचे दिल्लीत जे दोन मालक बसले आहेत ते शिवसेनेबरोबरचं कोकणचं नातं तोडायला निघाले आहेत. त्यांना माहिती नाही अजून की, कोकणात जांबा दगड आहे. हा जांबा दगड एकेकाळी लाव्हारस होता. याचा अर्थ असा नाही तो पुन्हा लाव्हा होणार नाही. आज संपूर्ण कोकणात नाही, आख्ख्या महाराष्ट्रात भाजपच्या विरोधात लाव्हारस उसळून आला आहे. मोदींना अजून काही तो सूरच लागत नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘आता त्या छातीमधील हवा गेली’
“सध्या आयपीएलचे दिवस सुरु आहेत. मॅच बघताना, पंचायत होते की, हा खेळाडू आपल्याकडे होता, तर नाही तो तिकडे गेला. अरे तो तिकडे होता, नाही तो आता तिकडे गेला. तसं आता भारताच्या राजकारणात झाला. आयपीएलमध्ये इनडीयन पॉलिटीकल लीग असंच झालं आहे. मोदी काहीही बोलतील, पण त्यांना आधी 2019 आणि 2014 चा आत्मविश्वास दिसत नाही. आपण फसलो होतोच. मोदींचा आधी काय रुबाब होता? कारण शिवसेना सोबत होती. त्यांचं एक वाक्य होतं, एक अकेला सबपे भारी. अशी मस्ती होती. छाती छप्पन इंचाची होती. आता त्या छातीमधील हवा गेली. एक अकेला सब पे भारी आणि आजूबाजूला सब भ्रष्टाचारी”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
‘अटलजींचा आत्मा ढसाढसा रडत असेल’
“अटलजींचा आत्मा वरुन रडत असेल. ते बोलले होते की, अशी सत्ता मला मिळत असेल तर मी चिमटीतही पकडणार नाही. आता अटलजींचा आत्मा ढसाढसा रडत असेल. नाकार्तांच्या हातामध्ये भाजप पक्ष गेला आणि भाजप पक्ष संपवून टाकला. अरे शिवसेना आख्खी तुमच्यासोबत होती तेव्हा मोदी आणि शाह यांना महाराष्ट्रात कितीवेळा यावं लागलं होतं? कारण आख्खी शिवसेना त्यांच्यासोबत होती”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.