नकली आधार कार्ड, भरपूर पैसा अन् पुण्यात… राज्यात मुलींच्या तस्करीचं मोठं रॅकेट? व्हायरल क्लिपमधील नावांनी खळबळ
यवतमाळ जिल्ह्यात मुलींच्या तस्करीचे रॅकेट कार्यरत असल्याच्या ऑडिओ क्लिपमुळे खळबळ उडाली आहे. बनावट आधार कार्ड बनवून मुलींना पुण्याला पाठवले जात असल्याचा आरोप भाजपने केला असून या प्रकरणातील धक्कादायक संवाद समोर आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच आता यवतमाळ जिल्ह्यात आदिवासी मुलींची तस्करी करणारे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा खळबळजनक आरोप भाजपने केला आहे. याबद्दलची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिपचा हवाला देत भाजप जिल्हाध्यक्षांनी हा दावा केला आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, संबंधित ऑडिओ क्लिपबद्दल टीव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही.
नेमके प्रकरण काय?
भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, एका तरुण आणि तरुणीमधील संवादाची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. या क्लिपमध्ये तरुणी आपल्या मित्राला मुलींच्या तस्करीबद्दल धक्कादायक माहिती देताना दिसत आहे. यात ती तरुणी तिच्या मित्राला मुलींना पुण्यात नेले जात असून, यामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे सांगताना दिसत आहे. या संवादानुसार, मुलींना फूस लावून बाहेर नेण्याचे काम काही ठराविक लोक करत आहेत. यामध्ये काही महिलांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. या तस्करीसाठी मुलींचे नकली आधार कार्ड तयार केले जात असल्याची धक्कादायक माहिती तरुणीने दिली आहे. यात तीन-चार जण नसून अनेक लोक सामील आहेत, हे एक मोठे रॅकेट आहे, असेही या तरुणीने सांगितले आहे. कामात भरपूर पैसा मिळत असला तरी हे काम शाप देणारे आहे, असे तरुणीने सांगताना दिसत आहे.
ऑडिओ क्लिपमधील संवाद
मुलगा: काय म्हणते, काय चाललंय? मुलगी: मी पोरींना घेऊन पुण्याला कामासाठी चालले आहे. मुलगा: अच्छा-अच्छा. मुलगी: मी एकटी नाहीये, मग काय दहा जण नेणार का? शुभम मामा आहे ना… पोरी काढणारा (पुरवणारा). मुलगा: शुभम मामा कोण? कुठला आहे तो? मुलगी: आपल्याच गावातला आहे, फुकट नगरचा. मुलगा: ते कल्याणी आत्या करते ना हे काम? मुलगी: हो, तीच. मुलगा: तिने काम सोडलं होतं ना? मुलगी: नाही गं, सोडलं नाहीये. मुलगा: ती आपल्या गावात घरापाशीच दिसते… कल्याणी आत्या. मुलगी: ती आता सगळं काम मोबाईलवरूनच करते. मुलगा: अच्छा, असं आहे का? मुलगी: तिला या कामासाठी आधी जेल झाली होती, तेव्हापासून ती फक्त मोबाईलवरूनच सगळं हाताळते. तिचं काम नील (निकाली) झालं की ती आता जाईलच. मुलगा: तिचा नवरा? मुलगी: कल्याणी आत्याच्या बापाने तिचं लग्न लावून दिलं होतं, तिथून ती निघाली होती. मुलगा: मजहर कुरेशी? मुलगी: हो, त्याच्यासोबत करून दिलं होतं. हे फार खतरनाक काम आहे. मुलगा: मदन कुरेशी हे काम करतो का? मुलगी: हो, ते कुरेशी हेच काम करतात. पैसा लय भेटतो, पण लोकांची बदुआ लागते. मुलगा: मग तुला काय वाटतं, हे चांगलं काम आहे का? मुलगी: मला चांगलं नाही वाटत बा, मी फक्त सांगत आहे. पैसा मिळतो पण बदुआ लागते. मुलगा: अच्छा, मग मुली काढण्यात आणि विकण्यात हे तिघे-चौघेच आहेत का? मुलगी: बापरे! तिघे-चौघे नाही, यात लय जण आहेत. हे पूर्ण रॅकेट आहे. यात पूनम आत्या आहे, आणखी किती जण आहेत हे मी सांगूच शकत नाही. मुलगा: बापरे! मग यात मेन (प्रमुख) कोण आहे? मुलगी: यात कुणी एक मेन नाही, जे काम लावून देतात ते मेन आहेत. माझ्या आईची पोरगी, पूनम आत्या आणि कल्याणी आत्या काम लावून देतात. मग त्यांना घेऊन जावं लागतं. त्यासाठी आधार कार्ड लागतं, माझ्या आईचं नकली आधार कार्ड बनवलं आहे… आणि आता मम्मी पुण्याला चालली आहे.
कडक कारवाई करा
दरम्यान भाजप जिल्हाध्यक्षांनी या प्रकरणी कडक कारवाईची मागणी केली आहे. आदिवासी भागातील निरागस मुलींना अशा प्रकारे जाळ्यात ओढून त्यांची विक्री किंवा तस्करी केली जात असेल, तर हा अत्यंत गंभीर गुन्हेगारी प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन पोलिसांनी तात्काळ अटक करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये ‘शुभम मामा’, ‘कल्याणी आत्या’ आणि ‘मजहर कुरेशी’ अशा काही नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. हे सर्वजण या रॅकेटचे भाग असल्याचा आरोप केला जात आहे. आता पोलीस या प्रकरणी काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
