चिदंबरम यांच्या त्या विधानावरून काँग्रेसमध्ये नाराजी, मग तेव्हाच का राजीनामा दिला नाही? नेत्यानं सुनावलं
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांनी 26/11 ला मुंबईवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात मंगळवारी मोठं वक्तव्य केलं आहे. या विधानावरून आता काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांनी 26/11 ला मुंबईवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात मंगळवारी मोठं वक्तव्य केलं आहे. तेव्हा आंतरराष्ट्रीय दबाव होता, म्हणून तत्कालीन यूपीए सरकारने या हल्ल्यानंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर न देण्याचा निर्णय घेतला, असं चिदंबरम यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यानंतर आता चिदंबरम यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे नेते राशिद अल्वी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यांनी यावरून चिदंबरम यांच्यावर जोरदार हल्लाबोला केला आहे. 16 वर्षांनंतर चिदंबरम हे असं विधान का करत आहेत? मग त्यावेळी त्यांनी राजीनामा का दिला नाही? असा सवाल यावेळी राशिद अल्वी यांनी केला आहे.
यावेळी बोलताना राशिद अल्वी यांनी म्हटलं की, याचा अर्थ असा होता का की? तेव्हा चिदंबरम हे अमेरिकेच्या दबावाखाली काम करत होते, त्यांच्या अशा विधानामुळे भाजपला फायदा होईल. चिदंबरम 16 वर्षांनी असं वक्तव्य का करत आहेत? तेव्हाच जर ते सहमत नव्हते तर मग त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता, काँग्रेसमध्येच असे काही लोक आहेत, जे पक्षाला कमजोर करू इच्छित आहेत. हे तर असं झालं की आपल्याच घरात ठेवलेल्या दिव्यामुळे घराला आग लागली असं यावेळी अल्वी यांनी म्हटलं आहे.
चिदंबरम यांनी नेमकं काय म्हटलं?
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी एका पॉडकास्टमध्ये बोलताना मोठा दावा केला आहे, जेव्हा मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा मला व्यक्तिगत पातळीवर पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं पाहिजे, असं वाटत होतं. मात्र तेव्हाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातील सरकारने हा प्रश्न कुटनीतीच्या माध्यमातून सोडवायचा या पर्याचा अवलंब केला, आणि त्याच दृष्टीकोणातून पुढे जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी त्यावेळी सांगितलं की अमेरिकेसह बलाढ्य देशांची अशी इच्छा आहे की भारतानं पाकिस्तानसोबत युद्ध करू नये, असा दावा चिदंबरम यांनी केला होता. दरम्यान मुंबईवर जेव्हा हल्ला झाला त्यानंतर लगेचच चिदंबरम यांना गृहमंत्री करण्यात आलं होतं, त्यापूर्वी ते अर्थमंत्री होते.
