जांबाज जनरलवर आज अंत्यसंस्कार होणार, पंतप्रधानांसह देशवासियांकडून भावपूर्ण श्रद्धांजली, इतर मृतकांच्याही अंत्यसंस्काराची तयारी
त्यानंतर दुपारी 12.30 ते 1.30 ह्या वेळेत सैन्य अधिकारी श्रद्धांजली देण्यासाठी येतील. त्यानंतर दुपारी 2 वाजता पार्थिवांना दिल्लीच्या कॅंट बराक चौकात अंत्यसंस्कारासाठी घेऊन जातील. तिथंच जनरल रावत यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.
भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यावर आज दिल्लीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी मधूलिका रावत यांनाही आजच शेवटचा निरोप दिला जाईल. इतर मृतकांच्याही अंत्यसंस्काराची तयारी आहे. ज्यांची अजूनही ओळख पटवण्यात अडचणी आहेत, त्यांची डीएनए चाचणी होणार आहे. त्यानंतरच अंत्यसंस्कार होतील. दरम्यान काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथसिंग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह कुटुंबियांनी रावत यांना दिल्लीच्या पालम विमानतळावर श्रद्धांजली अर्पण केली.
कुणाचा मृत्यू? तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात एकूण 13 जणांचा जीव गेलाय. त्यात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी मधूलिका रावत, लेफ्टनंट हरजिंदरसिंह, विंग कमांडर पीएस चौहान, स्क्वाड्रन लीडर के सिंह, जेडब्ल्यूओ दास, जेडब्ल्यूओ प्रदीप ए, हवालदार सतपाल, नाईक गुरसेवक सिंह, नाईक जितेंद्रकुमार, लान्स नाईक विवेककुमार, लान्स नाईक साई तेजा यांचा समावेश आहे.
आज अंत्यसंस्कार तामिळनाडूतल्या हेलिकॉप्टर अपघात होऊन आज तिसरा दिवस आहे. पहिला दिवस तर पूर्णपणे बचावकार्य आणि इतर गोष्टीत संपला, काल रात्री रावत यांच्यासह इतरांचे मृतदेह दिल्लीत आणले गेले. पंतप्रधानांसह इतरांनी आदरांजली वाहिली. देशभरातही विविध ठिकाणी श्रद्धांजली वाहिली जातेय. आज त्यातल्या काही मृतकांवर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार जनरल रावत, मधूलिका रावत, ब्रिगेडीयर एल एस लिद्दर, विवेककुमार यांच्या पार्थिवांची ओळख पटलेली आहे. इतरांच्या पार्थिवांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. त्यासाठी कुटुंबियांची डीएनए टेस्ट होतेय. त्यानंतरच मृतदेहांना कुटूंबियांना सोपवून अंत्यसंस्कार होतील. आजच्या कार्यक्रमानुसार सकाळी 11 ते 12.30 च्या दरम्यान सामान्य जनता रावत दाम्पत्यांना श्रद्धांजली अर्पित करु शकतील. त्यानंतर दुपारी 12.30 ते 1.30 ह्या वेळेत सैन्य अधिकारी श्रद्धांजली देण्यासाठी येतील. त्यानंतर दुपारी 2 वाजता पार्थिवांना दिल्लीच्या कॅंट बराक चौकात अंत्यसंस्कारासाठी घेऊन जातील. तिथंच जनरल रावत यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. अपघाताचं कारण काय? जनरल रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात कसा झाला ह्या प्रश्नाचं उत्तर अजून देश शोधतोय. त्यासाठी अधिकृत चौकशी एअरफोर्सकडून केली जातेय. पण तज्ञांच्या आतापर्यंतच्या अंदाजानुसार हेलिकॉप्टरच्या बिघाडाची शक्यता कमीच वर्तवली जातेय. वातावरण खराब होतं. आणि एवढच्या ढगाळ वातावरणात समोरचं दिसण्याची क्षमता खूप कमी झालेली होती. त्यातूनच हा अपघात झाल्याचा अंदाज सध्या तरी वर्तवला जातोय. हेलिकॉप्टरचा जो एकमेव व्हिडीओ हाती लागलाय, त्यातून नेमकं काय घडलं असावं याचा अंदाज येत असल्याचं जाणकारांचं म्हणनं आहे.
हे सुद्धा वाचा: Election: महापालिकेनंतर आता जिल्हा परिषदेतील गटांचीही संख्या वाढणार, वाच काय होणार बदल?