नरेंद्र मोदींनी…भारत-पाकमध्ये शस्त्रसंधी होताच काँग्रेसची मोठी मागणी!
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य स्थिती सध्या निवळली आहे. कारण या दोन्ही देशांनी शस्त्रसंधी केली असून ही शस्त्रसंधी 10 मे रोजीच्या 5 वाजेपासून लागू झाली आहे.

India Pakistan War : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य स्थिती सध्या निवळली आहे. कारण या दोन्ही देशांनी शस्त्रसंधी केली असून ही शस्त्रसंधी 10 मे रोजीच्या 5 वाजेपासून लागू झाली आहे. म्हणजेच आता दोन्ही देश एकमेकांवर कोणत्याही प्रकारचा हल्ला करणार नाहीत. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर विरोधी पक्षातील काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी मोठी मागणी केली आहे. त्यांनी संसदेचे विशेष सत्र आयोजित करून सरकारने पहलगाम हल्ल्यानंतर काय काय घडलं याची सविस्तर माहिती द्यावी, असं जयराम रमेश यांनी म्हटलंय.
सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घ्यावं
जयराम रमेश यांनी एक्स या समाजमाध्यमावर एक ट्विट केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी ही मागणी केली आहे. त्यांनी “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली एक सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी. या बैठकीच्या माध्यमातून त्यांनी देशातील सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घ्यावं. अशा संकटाच्या स्तितीत राष्ट्रीय हीत आणि राष्ट्राचे रक्षण होण्यासाठी सरकारने हे करावे,” अशी मागणी जयराम रमेश यांनी केली आहे.
देशाने एकजूट होऊन…
तसेच त्यांनी संसदेचे विशेष सक्ष आयोजित करावे, असेही म्हटले आहे. “संसदेचे विशेष सत्र आयोजित करावे. गेल्या अठरा दिवसांत विशेषत: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून ते आजपर्यंतच्या स्थितीवर सविस्तर चर्चा करावी. या विशेष सत्रात देशाची आगामी भूमिकाही निश्चित केली जावी. देशाने एकजूट होऊन सामूहिक संकल्पाचा संदेश जाण्यासाठी सरकारने संसदेचे हे विशेष सत्र आयोजित करावे,” असे जयराम रामेश यांनी म्हटले आहे.
12 मे रोजी होणार चर्चा
दरम्यान, आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली असली तरी या दोन्ही देशांतील वाद पूर्णपणे मिटलेला नाही. येत्या 12 मे रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्या डीजीएमओ यांच्यात चर्चा होणार आहे. या चर्चेत शस्त्रसंधीच्या अटी तसेच इतर महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा होणार आहे.