भारत पाकिस्तान युद्धजन्य स्थितीत शेजारी चीन,नेपाळ देश कोणासोबत? इराण-तुर्की आणि सौदीची भूमिका काय?
भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य स्थिती आहे. आतापर्यंत भारत पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत आहे. दोन्ही अण्वस्त्रधारी देश असून जगभरात चिंता वाढली आहे. त्यामुळे दहशतवादाला खतपाणी घालणं बंद करा असा सज्जड जगभरातील अनेक देशांनी दिला आहे. पण असं असूनही काही देश पाकिस्तानच्या पाठीशी उभे आहेत.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्याही युद्ध पेटू शकतं अशी स्थिती आहे. अजूनही भारत संयमितपणे पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याचं उत्तर देत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतर दहशतवादी पुरस्कृत पाकिस्तान सरकार खवळलं आहे. तसेच भारतावर हल्ले करत आहे. भारताने आतापर्यंत पाकिस्तानने केलेले सर्व हल्ले परतवून लावले आहेत. भारतीय सैन्य दलाचं सुदर्शन प्रत्येक हल्ल्याचं जसात तसं उत्तर देत आहे. भारताने पाकिस्तानच्या लष्कराचा कणा असलेल्या जेएफ16 आणि एफ 16 ही विमानं पाडली असून त्यांना इंगा दाखवला आहे. त्यामुळे तणावपूर्ण स्थिती पाहता कधीही युद्ध पेटू शकतं अशी स्थिती आहे. जगातील अनेक देश दहशतवादाविरुद्ध भारतासोबत उभे आहेत. पण असं असताना दहशतवाद पुरस्कृत पाकिस्तानसोबत तुर्की उभा आहे. तुर्कीने उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. पाकिस्तान भारतावर भ्याड हल्ले करत असताना दुसर्या बाजूला तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान पाकिस्तानच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करत होते.
काय म्हणाले तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान?
एर्दोगन यांनी एक्सवर पोस्ट करत लिहिलं की, ‘आम्हाला काळजी आहे की क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव पूर्णपणे संघर्षात बदलू शकतो, ज्यामुळे मोठ्या संख्येने नागरिकांचे बळी जातील.हल्ल्यात प्राण गमावलेल्या आपल्या बांधवांवर दया करण्यासाठी मी अल्लाहकडे प्रार्थना करतो आणि मी पुन्हा एकदा पाकिस्तानच्या बंधू लोकांप्रती आणि पाकिस्तानप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो.’ इतकंच काय तर एर्दोगनने तणावपूर्ण स्थितीत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी फोनवरून चर्चाही केली.
चीन आणि नेपाळ ही राष्ट्र कोणासोबत?
भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्यानंतर चीन पाकिस्तानच्या बाजूने भूमिका घेण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत संपूर्ण मुद्द्यावर तटस्थ आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, ‘भारत आणि पाकिस्तान एकमेकांचे शेजारी आहेत आणि ते नेहमीच शेजारी राहतील. दोन्ही देश चीनचे शेजारी आहेत. चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाला विरोध करतो. चीनने दोन्ही बाजूंना शांतता राखण्याचे, संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.’ दुसरीकडे, नेपाळ भारतासोबत उभं आहे. पहलगाम हल्ल्यात नेपाळच्या एका नागरिकाचा बळी गेला होता. त्यामुळे नेपाळने ठाम भूमिका घेत दहशतवादाविरुद्ध आहोत आणि आपली भूमी शत्रू शक्तीला वापरू देणार नाही हे स्पष्ट केलं आहे.
सौदी अरब आणि इराण कोणासोबत?
सौदी अरब एक काळ पाकिस्तानचा जवळचा मित्र होता. पण दोन्ही मुस्लिम आणि सुन्नी देश आहेत. त्यामुळे धर्माच्या आधारावर जवळचे होते. पण धार्मिक समीकरणं बाजूला ठेवून सौदी अरेबिया भारताचा मित्र झाला आहे. तसेच दोन्ही देशात व्यापारी संबंध आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण स्थिती असताना सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री अदेल अल-जुबैर गुरुवारी अचानक भारत दौऱ्यावर आले. त्यांनी परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची भेट घेतली आणि दोन्ही पक्षांना तणाव कमी करण्याचे आवाहन केले. दुसरीकडे, भारत-पाकिस्तान तणावपूर्ण स्थितीत इराण पूर्णपणे तटस्थ राहण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी भारत आणि पाकिस्तान दोघांनाही संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.काश्मीर मुद्द्यावर इराण पाकिस्तानसोबत आहे पण अलिकडच्या तणावादरम्यान इराणने घेतलेली भूमिका कौतुकास्पद आहे.