मृत्यूची चाहूल साठीतच, भारतीयांचं आयुर्मान सात वर्षांनी घटण्याचा धोका
2016 मधील आकडेवारीनुसार भारतीयांचं सरासरी आयुर्मान 68.56 वर्ष आहे. मात्र हे घटून जेमतेम साठीवर येण्याची भीती आहे.
मुंबई : प्रदूषण हे मृत्यूला कारणीभूत ठरण्यात जगात अग्रक्रमी असल्याचं ‘युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात समोर आलं आहे. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात प्रदूषित देश असल्यामुळे भारतीयांचं सरासरी आयुर्मान (life expectancy rate decrease) कमाल सात वर्षांनी घटण्याचा धोका उद्भवतो आहे.
जगातील 225 देशांच्या क्रमवारीत भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात प्रदूषित देश ठरतो. यादीत नेपाळ पहिल्या क्रमांकावर असून टॉप पाचही देश आशिया खंडातील असणं ही चिंतेची बाब आहे. 2016 मधील आकडेवारीनुसार भारतीयांचं सरासरी आयुर्मान 68.56 वर्ष आहे. म्हणजेच हे घटून जेमतेम साठीवर येण्याची भीती आहे.
भारत आणि चीन यांची एकत्रित लोकसंख्या जगातील एकूण लोकसंख्येच्या 36 टक्के म्हणजेच एक तृतीयांशपेक्षा अधिक आहे. या दोन देशांमध्ये प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचं प्रमाण 73 टक्के असल्याची माहिती आहे.
पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, चंदिगढ, बिहार आणि पश्चिम बंगाल या सात राज्यांमध्ये भारताची 40 टक्के लोकसंख्या आहे. या राज्यांची एकूण लोकसंख्या 48 कोटींच्या घरात आहे. मात्र प्रदूषणाची पातळी वधारल्यामुळे या राज्यातील नागरिकांचं आयुर्मान सात वर्षांनी घटण्याचा धोका आहे.
मुंबई 2050 पर्यंत पाण्याखाली बुडणार?
1998 ते 2016 या अठरा वर्षांच्या कालावधीत सरासरी आयुर्मान घटण्याचा दरही दुपटीवर पोहचला आहे. 1998 मध्ये 3.7 वर्षांनी घटलेलं सरासरी आयुर्मान आता सातवर आला आहे.
भारतीयांचं सरासरी आयुर्मान दहा वर्षांनी घटण्याचा धोका असलेल्या चौदा शहरांमध्ये 12 शहरं एकट्या उत्तर प्रदेशात आहेत. याशिवाय हरियाणातील फरिदाबाद आणि राजधानी दिल्ली यांच्यावर ही टांगती तलवार आहे. मात्र भारतातील इतर शहरंही या विळख्यातून (life expectancy rate decrease) सुटण्याची चिन्हं नाहीत.