‘मदरसा कुठेही असो, दहशतवादालाच खतपाणी’, भाजप नेत्याचा वक्तव्याने तापले वातावरण, अभ्यासक्रमात मोठा बदल?
Keshav Prasad Maurya on Madarsa Terrorism: उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी मदरशाविषयी वक्तव्य केले आहे. या वक्तव्यावरून देशभरात वातावरण तापले आहे. उत्तर प्रदेशात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वीच राजकीय वातावरण तापवले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मदरसा शिक्षण मंडळात मोठ्या फेरबदलाची घोषणाही सरकारने केली आहे.

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या वक्तव्याने देशभरात वातावरण तापले आहे. मदरसा शिक्षण पद्धतीवर त्यांनी आक्षेप घेतला आहे. मदरसा कुठलाही असो, त्यामुळे दहशतवादाला खतपाणी मिळते असा दावा त्यांनी केला. त्यावर विरोधी पक्षांनी त्यांच्यावर निशाणा साधला. तर सत्ताधारी भाजपने हा राजकीय विचारधारेशी हे वक्तव्य जोडले आहे. उत्तर प्रदेश विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्याचवेळी राज्य सरकारने मदरसा शिक्षण प्रणालीत मोठ्या बदलाची तयारी सुरू केली आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा बार उडणार आहे. त्यापूर्वीच वातावरण तापवण्यात येत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. लेखिका तस्लीमा नसरी यांनी कोलकात्यात नुकतेच मोठे वक्तव्य केले होते. मदरसे हे जिहादी घडवणारे कारखाने असल्याचा आरोप त्यांनी केला होता. सरकारने हे कारखाने बंद करून धर्मनिरपेक्ष शाळा सुरू कराव्यात अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर आता मौर्य यांचे वक्तव्य चर्चेत आले आहे.
काय म्हणाले केशव प्रसाद मौर्य?
लखनऊमध्ये पत्रकारांशी बोलताना, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी हे वक्तव्य केले. मदरसे हे बांगलादेशात असोत की पाकिस्तान आणि भारतात, मदरसे हे एकप्रकारे दहशतवादाला खतपाणी घालतात, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधक तुटून पडले आहेत. सरकार एका शिक्षण पद्धतीला आणि समुदायाला निशाणा करत असल्याचा आरोप विरोधकांनी लावला. तर भाजप नेत्यांनी या वक्तव्यावर विविध प्रतिक्रिया देताना सरकारची बाजू लावून धरली. सरकारमधील काहींनी सपक तर काहींनी तिखट प्रतिक्रिया दिली.
मदरसा शिक्षण प्रणालीत मोठ्या बदलाची तयारी
केशव प्रसाद मौर्य यांच्या वक्तव्याने राजकारण तापले आहे. आता उत्तर प्रदेश सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यात सरकार मदरसा शिक्षण प्रणालीत मोठ्या बदलाची तयारी करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मदरसामधील डिग्री कोर्स पूर्णपणे बंद करण्याची कॅबिनेटची तयारी आहे. प्रस्तावानुसार, मदरशांमध्ये केवळ इयत्ता 12वीपर्यंत शिक्षणाची व्यवस्था असू शकते. अर्थात सरकारकडून याविषयी कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. जर कॅबिनेटने या प्रस्तावाला मंजूरी दिली तर उत्तर प्रदेशातील मदरसा शिक्षण प्रणालीत मोठा बदल होईल.
विधानाला महत्त्व का?
सरकार मदरसा शिक्षण प्रणालीत मोठा बदल करण्याच्या तयारीत
उत्तर प्रदेश विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार
पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी
तस्लीमा नसरीन यांच्यानंतर लागलीच मदरशांवर वक्तव्य
