उशीरा आल्याने नियोजीत बैठकच रद्द, तर कुठे सिगरेट ओढताना पकडले…जगभरात फिरून आलेल्या खासदारांचे ते किस्से
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पक्षभेद बाजूला सारत अनेक देशांना भेटी दिल्या आणि भारताची भक्कम बाजू मांडली. पण या शिष्टमंडळातील काही सदस्यांनी शिष्टाचाराचे भान ठेवले नाही. भारताची बाजू मांडण्यासाठी गेलेल्या खासदारांचे ते किस्से आता व्हायरल होत आहेत.

PM Narendra Modi : पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाडला. भारताची दहशतवादाविरोधी बाजू जगाला पटवून देण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ केंद्र सरकारने जगभरात पाठवल. विविध देशात 7 सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळ पाठवण्यात आले. त्यात देशातील अनेक ज्येष्ठ आणि अनुभवी खासदारांचा समावेश होता. त्यांनी जागतिक मंचावर भारताची बाजू मांडली आणि पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड केला. पण यादरम्यान काही खासदारांना शिष्टाचाराचे भान उरले नाही हे पण समोर आले आहे.
पक्ष भेद विसरून सर्व आले एकत्र
भारत सरकारने दहशतवादी प्रकरणात वैयक्तिक भेद, पक्ष भेद बाजूला ठेवत देशातील विविध पक्षातील खासदारांचे शिष्टमंडळ जगातील विविध देशात पाठवले. खासदारांचे 7 शिष्टमंडळं विविध देशात गेली. अर्थात काही ठिकाणी त्यांना काही पेच प्रसंगांचा सामना करावा लागला पण त्यांनी भारताची भक्कम बाजू मांडली. अनेक देशांच्या मनातील अढी, पाकिस्तानविषयीचा उमाळा दूर केला. त्यांनी पाकिस्तानमधील दहशतवादी फॅक्टरी समोर आणली. या खासदारांनी जोरकस प्रयत्न केले. त्याला अनेक ठिकाणी यश सुद्धा आले. यापूर्वी पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रांचे मन आणि मत परिवर्तन घडले.
राफेल खरंच पाकने पाडलं?
फ्रान्सच्या राफेलने भारताची बाजू सक्षमपणे लढवली. पाकिस्तानला अद्दल घडवण्यात या फायटर जेटने भारताला साथ दिली. पाकिस्तानातील 9 दहशतवादी अड्डे बेचिराख करण्यात आपल्याला यश आले. पण पाकिस्तानने भारताचे राफेल पाडल्याचा दावा करण्यात आला. भारतीय शिष्टमंडळाला सुद्धा याविषयी अनेक देशात प्रश्न विचारण्यात आला. अनेक राजकीय कुटनीतीचे प्रश्न समोर आणले. खासदारांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारण्यात आले. तरीही न डगमगता भारतीय खासदारांनी त्याला तितक्याच दमदारपणे उत्तर दिले. भारतीय डीजीएमओने दिलेले उत्तर खासदारांनी त्यावेळी दिले. अनेक अवघड प्रश्नांना तितकीच चोख उत्तरं देण्यात आली.
काही ठिकाणी गडबड
इटलीतील उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री यांच्याशी भेटीची वेळ निश्चित झाली होती. पण खासदारांना वेळेत त्यांना भेटता आले नाही. अवघ्या काही मिनिटांची चुकामूक झाली. मग इटलीच्या उपपंतप्रधानांनी शिष्टमंडळाला भेटीला एका अधिकारी पाठवला आणि त्याने भारताची बाजू मांडली आणि त्याने ती पुढे मांडली. इतर देशात वेळेला किती महत्त्व आहे हे खासदारांच्या शिष्टमंडळाला अनुभव आला. इटलीच नाही तर जर्मनीत सुद्धा वेळेला अत्यंत महत्त्व असल्याचे खासदारांच्या लक्षात आले.
तर युरोपातील एका देशात शिष्टमंडळ मोठ्या उद्यानात पोहचले. तिथे एका महापुरुषाला त्यांनी अदरांजली वाहिली. त्यावेळी एका खासदाराला सिगारेटची तलफ आली. त्याने या पार्कमध्येच एका कोपऱ्यात सिगारेट शिलगावली आणि तो सिगारेट पित शतपावली करू लागला. त्यावेळी सुरक्षा रक्षकाने त्याला हटकले. या खासदाराला चूक उमगली. त्याने लागलीच त्याच्या कृतीवर खेद व्यक्त केला आणि पुढील पेचप्रसंग निवाळला.
