काँग्रेसमध्ये सर्वात मोठा राजकीय भूकंप? 18 आमदार एकवटले; थेट मंत्र्याविरोधातच…
तेलंगणा काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. १८ आमदारांनी एकत्र येत मंत्री कोंडा सुरेखा यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डींच्या समर्थकांनी सुरेखा पक्षाविरोधात बोलत असल्याचा आरोप केला आहे. यामुळे पक्षातील अंतर्गत वाद शिगेला पोहोचला असून, काँग्रेस हायकमांडच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तेलंगना काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. पक्षातील अंतर्गत धुसफुशीचा ज्वालामुखी अखेर फुटला आहे. एक दोन नव्हे तर तब्बल 18 आमदार आणि विधान परिषद सदस्यांनी मंत्री सुरेखा कोंडा यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या 18 आमदारांनी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेऊन थेट सुरेखा यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी केली आहे. त्यामुळे तेलंगना काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मंत्री कोंडा सुरेखा यांच्या विरोधात एकवटलेले हे सर्व आमदार मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे समर्थक असल्याचं सांगितलं जात आहे. कोंडा सुरेखा सहीत पक्षातील काही ज्येष्ठ नेते वारंवार मुख्यमंत्र्यांविरोधात बोलत आहेत. त्यामुळे अशा नेत्यांवर तात्काळ कारवाई करावी. पार्टी हायकमानने यात लक्ष घालावं, अशी मागणी या आमदारांनी केली आहे.
टीका करणं पुरे
वारंगळ पश्चिम मतदारसंघातील आमदार नाइनी राजेंद्र रेड्डी यांनी कोंडा सुरेखा यांच्यावर अत्यंत तिखट शब्दात टीका केली आहे. पार्टीतीलच काही लोक सुरेखा यांचं समर्थन करत आहेत. आणि मला काँग्रेस सोडण्यास मजबूर करत आहेत, असं राजेंद्र रेड्डी म्हणाले. रेवंत रेड्डींवर टीका करणं आता पुरे झालं. तुमच्यासाठी पार्टी सोडणं हेच योग्य ठरेल, असं सांगतानाच पक्ष नेत्यांचा वारंवार अपमान झाला तर शांत बसणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला आहे.
तिघांना निलंबित करा
काँग्रेसचे आमदार वेदमा भोज्जू यांनीही कोंडा सुरेखा यांच्यासरह आमदार कोमाटिरेड्डी राजगोपाल रेड्डी आणि ज्येष्ठ नेते चिन्ना रेडी यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. या तिन्ही नेत्यांना पक्षातून निलंबित करण्याची मागणी केली आहे.
शिस्तभंगाची कारवाई करा
देवरकोंडाचे आमदार बालू नाइक यांनी काँग्रेस हायकमांडने याबाबत कठोर पावलं उचलण्याची मागणी त्यांनी केली आहे. जो कोणी नेता मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या विरोधात बोलेल, त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करायला हवी, अशी मागणी नाइक यांनी केली आहे.
अंतर्गत चढाओढ
18 आमदार आणि विधान परिषद सदस्यांनी एकत्र येणं म्हणजे तेलंगना काँग्रेसमधील अंतर्गत वाद शिगेला पोहोचला असल्याचं मानलं जात आहे. यापूर्वी पक्षातील नेत्यांमधील मतभेद समोर येत होते. मात्र, यावेळी पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ एवढ्या मोठ्या प्रमाणावर नेते एकत्र आले आहेत. त्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर होत आहे. आता काँग्रेस श्रेष्ठी यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच कोंडा सुरेखा यांच्या विरोधात काय कारवाई केली जाते याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, कोंडा सुरेखा यांची कन्या कोंडा सुष्मिता हिने काल मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली होती. परकलमधून तिकीट न मिळाल्याने सुष्मिता नाराज आहेत. त्यांनी आपण या मतदारसंघातून अपक्ष उभे राहणार असल्याची घोषणा करतानाच कुणाचा बाप आला तरी मला रोखू शकणार नाही, असं म्हणत थेट मुख्यमंत्र्यांवरच शरसंधान साधलं होतं.
