खेला होबे! ममता दीदींच्या 3 मुस्लिम खासदारांनी वाढवला NDA चा बीपी, TMC मध्ये घरवापसी?
TMC-BJP-NDA: पावसाळी अधिवेशनात भाजपच्या अनेक योजनांवर पाणी फेरले गेले. एका मंत्र्याची विकेट पडली. अनेक महत्त्वपूर्ण विधेयकं रखडली. आता पश्चिम बंगालमधील टीएमसीतून बंड केलेल्या तीन मुस्लिम खासदारांनी भाजपची डोकेदुखी वाढवली आहे. एका दाव्यानुसार हे खासदार ममता दीदींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये घरवापसीच्या प्रयत्नात आहेत. काय आहे मोठी अपडेट?

Rebel TMC Muslim MPs Absent From NDA Mangal Milan Meet: संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण तापले. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीने(एनडीए) एक उच्चस्तरीय मंगल मिलन बैठक बोलावली होती. तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) बंडाचा झेंडा उभारलेल्या खासदारांपैकी तीन मुस्लिम खासदारांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. संसद परिसरात असतानाही हे तीनही खासदार या बैठकीकडे फिरकले नाहीत. हे तीनही खासदार ममता दीदींकडे परत जाण्याची शक्यता असल्याचा दावा करण्यात येत आहे.
कोण आहेत हे तीन खासदार?
मंगल मिलन बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. बैठकीला गृहमंत्री अमित शाह, जे. पी. नड्डा यांच्यासह एनडीएचे अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्री सुकांत मजूमदार यांच्या आधारे दिलेल्या वृत्तात टेलिग्राफ इंडियाने या तीन अनुपस्थिती खासदारांची नावं समोरं आणली आहेत. हे तीनही खासदार संसद परिसरात उपस्थित होते. पण ते बैठकीकडे फिरकले नाहीत.
1. यूसुफ पठाण (माजी भारतीय क्रिकेटर आणि खासदार)
2. अबू ताहेर खान (मुर्शिदाबाद)
3. खलीलुर रहमान
TMC खासदार सौगत रॉय यांचा मोठा दावा
तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ खासदार सौगत रॉय यांनी एनडीएच्या बैठकीवर निशाणा साधला. मुर्शिदाबाद आणि जवळपासच्या क्षेत्रातून जे मुस्लिम खासदार निवडून आले आहेत. त्यांना एनडीएची विचारधारेशी जुळवून घेणे कठीण होत असल्याचा दावा त्यांनी केला. आपण स्वतंत्र आणि धर्मनिरपेक्ष विचारधारेची व्यक्ती आहोत, असे रॉय म्हणाले. एनडीए आघाडी ही त्यांच्या विचाराशी फारकत घेणारी आहे. यामुळेच अनेक खासदार पुन्हा ममता दीदींच्या खेम्यात परतू इच्छित आहेत. जर टीएमसीकडे त्यांनी साधा अर्जही दिला तरी वरिष्ठ नेतृत्व त्यांच्याविषयी योग्य निर्णय घेऊ शकते, असे मोठे वक्तव्य रॉय यांनी केले.
’20 गद्दार’ पोस्टर चर्चेत
तृणमूल काँग्रेसमधून बंडाळी केलेल्या खासदारांना निलंबित करण्याची मागणी पक्षाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केली आहे. पक्षांतर विरोधी कायद्यातंर्गत (Anti-Defection Law) या खासदारांवर कारवाईची मागणी पक्षाने केली आहे. तर संसदेबाहेर टीएमसीचे निलंबित खासदार कल्याण बॅनर्जी यांनी त्यांच्या गळ्यात ’20 गद्दार’ असे पोस्टर लटकवले होते. त्यांनी सरकारचा तीव्र निषेध केला. टीएमसी नेते कुणाल घोष यांनीही मोदी सरकारवर टीएमसी तोडण्याचा आरोप केला.
