टॅरिफबद्दल संघाची भूमिका काय? मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?
RSS : मुंबईतील विविध क्षेत्रातील निमंत्रित करण्यात आलेल्या मान्यवरांना आरएसएसचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी नवे क्षितिज या व्याख्यानमालेतून संबोधित केले. यावेळी त्यांनी टॅरिफवर आरएसएसची भूमिकाही स्पष्ट केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत संवाद कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील विविध क्षेत्रातील निमंत्रित करण्यात आलेल्या मान्यवरांना आरएसएसचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी नवे क्षितिज या व्याख्यानमालेतून संबोधित केले. यावेळी त्यांनी देशातील विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच अमेरिकन टॅरिफबद्दलही संघाची भूमिका स्पष्ट केली. टॅरिफबद्दल मोहन भागवत नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
आपण स्वदेशी स्वीकारले पाहिजे – भागवत
टॅरिफच्या मुद्द्यावर बोलताना मोहन भागवत म्हणाले की, आपण जगापासून अलिप्त राहू शकत नाही, परंतु जर आपण व्यवहार केले तर आपण ते स्वेच्छेने करू. आपण कोणाच्याही दबावाखाली असे करणार नाही किंवा टॅरिफवर आधारित निर्णय घेणार नाही. आपण जे काही खरेदी करतो ते आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करेल. आपण स्वदेशी स्वीकारले पाहिजे. जिथे परदेशात जाण्याशिवाय पर्याय नाही आणि दुसरा पर्याय नाही तिथे परदेशी वस्तू वापरता येतात. धोरण पातळीवर, आपण म्हणतो की आंतरराष्ट्रीय व्यापारात व्यवहार करावे लागतात. धोरण हळूहळू पुढे जात आहे. धोरण बदलते आणि स्वतःच्या गतीने प्रगती करेल, परंतु देशांतर्गत पातळीवर, आपण स्वदेशी लागू करू.
संघाचं काम कसं आहे?
संघाच्या कामावर बोलताना भागवत म्हणाले की, संघाच काम हे वेगळं काम आहे. पूर्ण जगात असं काम नाही असं आधी आम्ही म्हणायचो, आता आम्ही काम करत असताना देखील अनुभवत आहोत. जगातील लोकं संघाचं काम पहायला येत आहेत. आफ्रिका, अमेरिका, कोरिया या देशातील लोकं म्हणतात तुमच्या कामा प्रमाणे आम्हाला आमच्या देशात युवकांसाठी काम करायचं आहे, आपण आम्हाला ते शिकवाल का? तथागत बुद्धांनंतर असं काम कुणी केलेलं नाही. असं काम करणारा दुसरा कोणी उपलब्धच नाही. आकाश कसं आहे तर आकाशा सारखा आहे दुसर उदाहरण नाही. समुद्र कसा आहे समुद्रा सारखा आहे दुसरं उदाहरण नाही. अगदी असंच संघाचं काम आहे.
संघाचं काम संघासाठी नसून संपूर्ण देशासाठी आहे
मोहन भागवत आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, ‘संघाला इतर पक्ष आहे, विचारधारा यासोबतच जोडू पाहत आहेत ते चुकीच आहे. संघाला वरून आणि लांबून पाहाल तरी सुद्धा गैरसमज निर्माण होतात. संघ कवायती करतो परंतु संघ पॅरामिलिट्री ऑर्गनायझेंशन नाही. संघाचे स्वयंसेवक लाठी काठी शिकतात परंतु ते कोणताही आखाडा नाही. संघ अखिल भारतीय संगीत शाळा नाही संघाचे स्वयंसेवक राजकारणात आहेत मात्र संघ राजकीय पक्ष नाही. काही गोष्टी वरून पाहिल्या की गैरसमज निर्माण होतो त्यामुळे संघाला आतून जाणून घेणे गरजेचे आहे. साखर कशी आहे हे अनुभवायला केवळ एक चमचा साखर खाल्ली तरी कळत साखर कशी आहे. परंतु असं काही खायचं असेल तर त्याची परीक्षा घेणे गरजेचे नाही एवढ तरी कळायला हवं. यामुळे 100 वर्षानंतर आम्ही तुम्हाला सांगत आहोत की संघ काय आहे? संघाच काम हे संघासाठी नाही ते संपूर्ण देशासाठी आहे.’
संघाला प्रसिद्धी नको आहे
पुढे बोलताना भागवत म्हणाले की,’संघ काय आहे हे जाणून घेण्यासाठी संघ काय नाही हे जाणून घेणे गरजेचे आहे. संघ दुसऱ्या कोणत्याही संघटनेसोबत स्पर्धा करण्यासाठी निघाला नाही आणि जाणार ही नाही. संघ कोणत्या विशिष्ट परिस्थितीत प्रतिक्रिया म्हणून निर्माण झालेला नाही. संघ कोणाच्या विरोधात चाललेला नाही. संघच काम कोणाचा ही विरोध न करता काम करत चालत राहणारा आहे. संघाला प्रसिद्धी नको आहे. संघाला ताकद नको आहे. संघ जी देशात चांगली कामे सुरू आहेत ती पूर्ण करण्यासाठी काम करत आहे.’
