होय, होय… रनवे दिसत आहे… पायलट आणि ATC मध्ये काय झालं शेवटचं संभाषण? अजितदादांचं प्लेन क्रॅश होण्यापूर्वी काय काय घडलं?
Ajit Pawar Plane Crash : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले. मुंबईहून चार्टर्ड विमानाने बारामतीला जात होते. आता पायलट आणि एअर ट्राफिक कंट्रोलर यांच्यात शेवटचं संभाषण काय झालं याची माहिती समोर आली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले. बारामती विमानतळाजवळ झालेल्या या अपघातात एकूण 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्तांमध्ये अजित पवार यांचे वैयक्तिक सहाय्यक, सुरक्षा कर्मचारी आणि पायलट यांचा समावेश आहे. या अपघातानंतर संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून चार्टर्ड विमानाने बारामतीला जात असताना हा अपघात झाला. आहे. आता या अपघाताचे कारण शोधण्याचे प्रयत्न केले जात आहेत. अशातच आता पायलट आणि एअर ट्राफिक कंट्रोलर यांच्यात शेवटचं संभाषण काय झालं याची माहिती समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?
अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, आज सकाळी एक लिअरजेट 45 (व्हीटी-एसएसके) विमान मुंबईहून उड्डाण घेऊन बारामतीकडे निघाले. सकाळी 8:18 वाजता, पायलटने बारामती एअर ट्राफिक कंट्रोलरशी संपर्क साधला. त्यावेळी एअर ट्राफिक कंट्रोलरने हवामान ठीक आहे, वारा शांत आहे तसेच दृश्यमानता सुमारे 3000 मीटर असल्याची माहिती दिली. त्यानंतर विमान बारामती विमानतळाजवळ पोहोचले. विमान लँडिंग करण्याचा प्रयत्न करत असताना पायलटला रनवे स्पष्टपणे दिसत नव्हता. कारण वातावरणात धुके असल्यामुळे दृश्यमानता कमी होती.
पायलटचे शेवटचे शब्द काय?
रनवे दिसत नसल्यामुळे पायलटने पहिल्या प्रयत्नात लँडिंग टाळले. पायलटने विमान परत वर नेले. थोड्या वेळाने, लँडिंगचा दुसरा प्रयत्न करण्याचा निर्णय झाला. यावेळी सुरुवातीला रनवे दिसत नव्हता. ट्राफिक कंट्रोलरने तुम्हाला धावपट्टी दिसते का? असा प्रश्न पायलटला विचारला. यावर पायलट म्हणाला ‘अजून नाही’. मात्र काही क्षणानंतर पायलटने ” होय होय, आता रनवे दिसत आहे” अशी माहिती दिली. यानंतर विमानाला उतरण्याची परवानगी देण्यात आली. मात्र विमान सुरक्षित उतरू शकले नाही. हे विमान बारामती विमानतळाच्या जवळच कोसळले आणि मोठा स्फोट झाला. यात अजित पवार यांचा मृत्यू झाला.
उद्या अंत्यसंस्कार होणार
दरम्यान, आता उद्या सकाळी 11 वाजता अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी आज बारामतीत अजित पवार यांच्या चाहत्यांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. राज्यात 3 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच राज्यातील अनेक भागात कडकडीत बंद पाळण्यात आला.
