तुम्ही कोण? आमचे मामा की काका?; आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल
फडणवीस हे मस्टर मंत्री नाहीत, ते मास्टर आहेत. त्यांच्याच मास्टर स्ट्रोकमुळे तुम्हाला घरी बसावं लागलं, असा हल्लाच चंद्रशेखर बावनकुळे यांनी चढवला आहे.

मुंबई | 7 ऑगस्ट 2023 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली होती. देवेंद्र फडणवीस हे मस्टर मंत्री असल्याची घणाघाती टीका केली होती. उद्धव ठाकरे यांची ही टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. ठाकरे यांच्या टीकेला भाजप नेते आशिष शेलार यांनी उत्तर दिलं आहे. मुंबईसाठी आम्ही काय केलं हे विचारणारे तुम्ही कोण? आमचे मामा की काका? असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.
आशिष शेलार यांनी ट्विट करून हा हल्ला चढवला आहे. मुंबईसाठी आम्ही काय करतोय आणि केले हे मुंबईकरांना माहिती आहे…त्यांना सगळा हिशेब देऊच. तुम्हाला सांगायला तुम्ही आमचे कोण? मामा की काका? तुमचा कारभार रोज उघडा पडतोय तो आधी झाका, असा हल्लाच आशिष शेलार यांनी चढवला.
काँग्रेसने साठ वर्षात काय केले?
अफजलखान, औरंगजेब याच्या उचक्या ज्यांना रोज लागतात त्यांना आजच्या भाषणात इंग्रजांची उचकी लागली होती. म्हणे इंग्रजांनी मुंबईचा विकास केला, भाजपाने मुंबईसाठी काय केले? मैत्री दिन आहे, मग हेच जरा तुमचे जीवश्चकंठश्च असलेल्या काँग्रेसला विचारा ना… त्यांनी साठ वर्षात काय केले? तुम्ही मुंबईवर 25 वर्षे राज्य केलेत तुम्ही काय केलेत ते सांगा?, असा सवाल आशिष शेलार यांनी केला.
तुमची लायकी नाही
शेलार यांच्या हल्लाबोलनंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. फडणवीस हे मस्टर मंत्री नाहीत, ते मास्टर आहेत. त्यांच्याच मास्टर स्ट्रोकमुळे तुम्हाला घरी बसावं लागलं, असा हल्लाच चंद्रशेखर बावनकुळे यांनी चढवला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करून उद्धव ठाकरे यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे.
तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधून ठेवली होती. जी प्रामाणिक शिवसैनिकानं मुक्त केली आणि बाळासाहेबांचा भगवा झेंडा पुन्हा अभिमानाने महाराष्ट्रावर फडकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची तुमची लायकी नाही हे अनेकदा तुम्हीच सिद्ध केले आहे. देवेंद्रजी मस्टर मंत्री नाही तर मास्टर आहेत. त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावं लागलं, असा हल्लाच चंद्रशेखर बावनकुळे यांनी चढवला आहे.
आता प्रभूरामाची आठवण येतेय का?
ज्यांना वडिलांनी स्थापन केलेला पक्ष टिकवता आला नाही ते उद्धव ठाकरे म्हणत आहेत की, भाजपमध्ये राम उरला नाही. तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवलं. आता प्रभू श्रीरामचंद्रांची तुम्हाला आठवण येत आहे, असा चिमटा बावनकुळे यांनी काढला. राम मंदिराचं भूमीपूजन झालं तेव्हा जल्लोष करणाऱ्या रामभक्तांवर तुमच्या सरकारनं राज्यभर गुन्हे दाखल केले होते हे तुम्ही विसरलात की काय?, असा सवालही बावनकुळे यांनी विचारला आहे.
तोपर्यंत उदो उदो करत बसा
औरंग्याच्या प्रवृत्तीसोबत कोण बसलं आहे? हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलंय. औरंग्याच्या सत्तेला जसा छत्रपती शिवरायांनी सुरुंग लावला. तसाच सुरूंग जनतेनं तुमच्या सत्तेला लावला आहे. 2024 सालीही जनता पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांच्या शिवसेनेला आणि भाजपला निवडून देईल. तोवर तुम्ही औरंग्या, अफझल खान आणि इंग्रजांचा उदो उदो करत बसा. कारण लोकांनी तुम्हाला सध्या तेवढंच काम दिलंय, अशी टीका त्यांनी केली.
