उमेदवार दाम्पत्याला अपात्र ठरवण्यासाठी मृत अपत्याचीही गणना, कोर्टाचा निर्णय…
तीन अपत्यांमुळे उमेदवारी अर्ज बाद झालेल्या नंदुरबारच्या गावित दाम्पत्याला औरंगाबाद खंडपीठाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
औरंगाबाद : उमेदवारी अर्ज भरताना जिवंत असलेली अपत्यच ग्राह्य धरणं आवश्यक आहे, असा निर्वाळा औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज बाद झालेल्या नंदुरबारच्या गावित दाम्पत्याला (Aurangabad Couple Candidature) मोठा दिलासा मिळाला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत सुभाष गावित आणि त्यांच्या पत्नी सविता गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र तीन अपत्य असल्याचं कारण देत गावित दाम्पत्याचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला होता. या निर्णयाविरोधात गावित दाम्पत्याने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.
उमेदवारी अर्ज भरत असताना उमेदवारांची जितकी अपत्यं अस्तित्वात आहेत, तितकीच अपत्यं गृहित धरता येतील, असा निर्णय मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला. त्यामुळे याचिककर्ते सुभाष गावित आणि सविता गावित यांना दिलासा मिळाला आहे.
राणे-मुंडेंच्या वादात विलासराव मुख्यमंत्री, 1999 च्या पुनरावृत्तीची चिन्हं?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उमेदवारांना अपात्र ठरवताना मयत अपत्य किंवा जन्मतः मृत अपत्यांची गणना करु नये, असं औरंगाबाद खंडपीठाने स्पष्ट केलं.
सविता गावित यांना 2002 मध्ये झालेल्या मुलाचा 2003 मध्ये मृत्यू झाला होता. त्यांची दोनच अपत्यं हयात असल्यामुळे तेच ग्राह्य धरावं अशी याचिका दाखल (Aurangabad Couple Candidature) करण्यात आली होती.
महिलेची किती वेळा प्रसुती झाली, हे महत्त्वाचं नसून नामनिर्देशनपत्र भरताना तिची किती अपत्ये हयात आहेत, याचीच गणना व्हावी. कारण जन्मलेले अपत्य किती दिवस जगेल यावर संबंधितांचे नियंत्रण नसून, या सर्व बाबी निसर्गाच्याच अधीन आहेत, असं याचिकाकर्त्यांच्या वतीने सांगण्यात आलं.