पंढरपूर पाठोपाठ देगलूरमध्ये क्रांती होणार, सदाभाऊ खोतांचा दावा; अशोक चव्हाणांवर घणाघात

| Updated on: Oct 04, 2021 | 3:32 PM

माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर टीकास्त्र डागलं.

पंढरपूर पाठोपाठ देगलूरमध्ये क्रांती होणार, सदाभाऊ खोतांचा दावा; अशोक चव्हाणांवर घणाघात
सदाभाऊ खोत, माजी मंत्री
Follow us on

नांदेड : देगलूर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील यांच्या उपस्थितीत सुभाष साबणे यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. या पक्षप्रवेशानंतर भाजपचा मेळावाही पार पडला. या मेळाव्यात बोलताना माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर टीकास्त्र डागलं. (Sadabhau Khot’s criticism of Mahavikas Aghadi government, Ashok Chavan)

विधानसभा गाजवणारा नेता म्हणून सुभाष साबणे यांची ओळख आहे. मला खात्री आहे की पंढरपूरनंतर देगलूरमध्ये क्रांती होणार. तीन पक्षाचे अलिबाबा आणि चाळीस चोर मतदान मागण्यासाठी येणार. त्यांनी पीक विम्याचे चार हजार कोटी रुपये वाटून खाल्ले. अतिवृष्टीनंतर आता आम्हाला हे काय देणार? मला खात्री आहे हे काही देणार नाहीत, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय.

‘मुख्यमंत्री होते पण लाचार होऊन मंत्रिमंडळात मंत्री झाले’

अशोक चव्हाण हा भाग्यवान माणूस, पण सरपंचाचा शिपाई झाला. मुख्यमंत्री होते पण लाचार होऊन मंत्रिमंडळात मंत्री झाले, असा टोला सदाभाऊ खोत यांनी चव्हाणांना लगावलाय. सरकारमधील लोक नोटा मोजून थकली. या पोटनिवडणुकीत पैशांचा महापूर येणार आहे. लक्ष्मी आली की दरवाजा उघडा ठेवा. हे शपथ मागतात तेव्हा खोटी शपथ घ्यायची. मशीनने मोजलेले पैसे घ्यायचे, पण मतदान साबणेंना द्यायचं, असं आवाहन खोत यांनी देगलूरमधील मतदारांना केलंय.

‘शेतकऱ्यांना मदत द्या, मग मतदान मागा’

महाविकास आघाडी सरकारमध्ये ज्यांच्याकडे बांधकाम खातं आहे त्यांच्याच जिल्ह्यात खड्डे आहेत. डांबर खाल्लं, मुरुम खाल्ला, असा घणाघात खोत यांनी चव्हाणांवर केलाय. शेतकऱ्यांना मदत द्या मग मतदान मागा. घोटभर दारू, वाटीभर रस्सा आणि पाच वर्षे बोंबलत बसा असं होऊ देऊ नका, असा सल्लाही खोतांनी मतदारांना दिलाय. एफआरपी दिला नाही. शेतकऱ्याकडे मुलाबाळांच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत. बारा बलुतेदारांना मदत नाही. वीज कनेक्शन कट करायला या, या निवडणुकीत आम्ही तुम्हाला कट केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच खोतांनी दिलाय.

‘चाबकाचा फटका काढून सगळा हिशेब घ्यायचा आहे’

आम्ही बोलायला लागलो की कोरोनाचे नियम आठवतात. आम्ही घरात बसल्यावर काय माती खाणार का? आम्ही आम्ही घरात बसल्यावर तुम्ही माती खाणार आहात का? तुम्हाला जेसीबीद्वारे फुलं टाकलेली चालतात. आम्हाला मात्र सोशल डिस्टन्सिंग पाळायला सांगता. पोटनिवडणुकीत सुभाष साबणे यांना निवडून द्या. या निवडणुकीत चाबकाचा फटका काढून सगळा हिशेब घ्यायचा आहे, असंही खोत म्हणाले.

इतर बातम्या :

Lakhimpur Kheri Violence : कुणाचा जीव जात असेल तर जबाबदारी कुणाची? सुप्रीम कोर्टाचा सवाल

“वेलकम बॅक टू स्कुल…” धनंजय मुंडेंकडून ‘शिक्षणोत्सवानिमित्त’ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत

Sadabhau Khot’s criticism of Mahavikas Aghadi government, Ashok Chavan